Tuesday, August 30, 2011

निश्चयाचे बळ



ग्रामीण भागातील आणि तेदेखील शेतकरी असलेल्या तरुणाच्या हातात लॅपटॉप आणि मोबाईल पाहिल्यावर आश्चर्य वाटणं स्वाभाविक आहे. रत्नागिरी जिल्ह्यात लांजा तालुक्यातील खरवसे गावातील मिलींद माने या तरुण शेतकऱ्याला भेटल्यावर एखाद्या इंजिनिअरींगच्या विद्यार्थ्याला भेटल्यासारखं वाटतं. कॉलेजिअन तरुणाची वेशभूषा, हातात लॅपटॉपची बॅग, अंगात कोट, बाईकवर स्वारी...त्यांचा दुसरा सहकारी प्रविण जेधे मात्र पारंपरिक कोकणी वेषात...बनिअन आणि हाप पँट..तिसरे शरद चव्हाण मात्र शेतीवर काम करणारे वाटतात. तिघांची भेट घेतल्यावर वेगवेगळ्या क्षेत्रातील त्यांच्या क्षमतेमुळे त्यांनी उभा केलेला 'प्रभात ऍ़ग्रोटेक' हा कृषि प्रकल्प यशस्वी झाल्याचं लक्षात आलं.

खरं तर हे तिन्ही राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात व्यस्त राहणारे. प्रत्येकाची राजकीय विचारधारा वेगळी. मात्र कोकणातल्या लाल मातीत राबताना एकत्रितपणे घाम गाळून ओसाड माळरानावर पीक घेण्याचा निश्चय यांनी २००८ मध्ये केला. तत्पूर्वी सरपंच असलेल्या माने आणि चव्हाण यांनी ग्रीन हाऊस प्रकल्प करून पाहिला. त्यात त्यांना यश आले नाही. मात्र त्यांची धडपड पाहून त्यांचा तिसरा मित्र जेधे त्यांच्या मदतीला आला. कोकणात शेतीसाठी मोठी जमीन मिळणे फार कठीण असते. अशावेळी जेधे यांच्या परिवाराने भाडेपट्टयाने या तिघांना शेती करण्यासाठी जमीन दिली.

शोभिवंत मासे


शोभिवंत माशांच्या टाक्यांचे सध्या सर्वत्र मोठे आकर्षण आहे. मोठमोठ्या हॉटेल, रेस्टॉरंटबरोबरच अनेक घराघरांमध्येही अशा टाक्या हमखास आढळतात. आपल्याकडच्या टाकीत रंगीबेरंगी, आकर्षक आणि अत्यंत दुर्मिळ मासे असावेत, असा अनेकांचा अट्टाहास असतो. त्यासाठी हजारो रूपये खर्च करण्याचीही अनेकांची तयारी असते. केवळ एकच गोल्डफिश असणाऱ्या मोहक बाऊल पासून वीस-तीस विविध प्रकारचे मासे सामावणाऱ्या चार-सहा फुटी काचेच्या पेटीपर्यंत अनेक प्रकार पाहायला मिळतात. मोठ्या हॉटेलात तर प्रचंड मोठ्या टाक्या असतात.

अशा या टाक्यांमध्ये सोडण्यासाठीचे शोभिवंत मासे चक्क परदेशातूनही आणले जातात. मात्र त्यांची निर्मिती करण्यासाठी जिल्ह्यातही आता प्राथमिक स्तरावर प्रयत्न सुरु झाले आहेत. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुळदे (ता. कुडाळ) येथील संशोधन केंद्रात शोभिवंत मासेनिर्मितीचा प्रकल्प उभारण्यात आला आहे. असे प्रकल्प जिल्ह्यात अनेक ठिकाणी अगदी परसदारातही उभारता येण्यासारखे आहेत. लाखो रूपयांचे उत्पन्न मिळविण्याची संधी या माध्यमातून उपलब्ध झाली आहे.

एका दिवसात शंभर वीज जोडणी


ग्रामीण भागातील वाढत्या वीज चोरीमुळे महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनीला तोटा सहन करावा लागतो. त्याचबरोबर शेतकऱ्यांना वीज कनेक्शन देतानाही अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. ह्या सर्व बाबी विचारात घेऊन महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने नुकताच सांगली जिल्ह्यातील सावळज परिसरातील एकूण २६ गावांत मागेल त्याला वीज जोडणी देण्यासाठी महावितरण आपल्या दारी हा उपक्रम सुरु केला.

या उपक्रमांतर्गत ज्या शेतकऱ्यांना शेती पंपासाठी वीज हवी आहे अशा शेतकऱ्यांनी सातबारा उतारा व लागणारे किरकोळ शुल्क भरुन आपल्या नजिकच्या कार्यालयात मागणी करताच त्याच दिवशी त्याला शेतीपंपासाठी जोडणी देण्यात येईल असा हा उपक्रम आहे. पहिल्याच दिवशी १०० कनेक्शन देण्यात आली.

Friday, August 26, 2011

शासकीय दूध खरेदी व विक्री दरात १ सप्टेंबरपासून वाढ




शासकीय दूध खरेदी व विक्री दरात दि. १ सप्टेंबर २०११ पासून वाढ करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

गाईचे दूध खरेदी करण्याचा दर १६ वरुन १७ रुपये करण्यात आला आहे, तर म्हशीचे दूध खरेदीचा दर रुपये २३ वरुन २५ रुपये करण्यात आला आहे. त्यामुळे गाईच्या दूध खरेदीत रु. १ तर म्हशीच्या दूध खरेदीच्या दरात २ रुपयाची वाढ करण्यात येणार आहे.

दूध खरेदी दरात वाढ झाल्याने गाईचे दूध व टोण्ड दूध प्रति लिटर विक्री दरात रुपये १.५० व म्हशीचे दूध व फूलक्रिम दूधाच्या विक्री दरात प्रति लिटर ३ रुपयाने वाढ करण्यात येणार आहे.

सध्या राज्यातील सहकारी संस्था, संघ, बहुराज्यीय संघ व एमएमपीओ नोंदणीकृत प्रकल्प यांच्या कमिशनमध्ये २.४० रुपयावरुन २.९० रुपये केल्याने कमिशनमध्ये ५० पैशांनी वाढ करण्यात येणार आहे.

Thursday, August 25, 2011

कुक्कुट पक्षी पालनातून रोजगाराकडे वाटचाल




राज्याच्या सन २००९-१० च्या एका अहवालानुसार राज्यात एकूण ५४५ हजार मेट्रीक टन पशुपक्षापासून मांस उत्पादन झाले. यापैकी ३९००० मेट्रीक टन म्हणजे ५७ टक्के सर्वाधिक मांस हे मांसल कुक्कुट पक्षांचे आहे. सर्वसाधारण अनुमानानुसार राज्याला दर वर्षी ४८० हजार मेट्रिक टन कुक्कुट मांसाची आवश्यकता आहे. ही गरज विचारात घेऊन शासनाने कंत्राटीपध्दतीने कुक्कुट पक्षी पालन व्यवसायाला चालना देण्यासाठी राज्यस्तरीय नाविण्यपूर्ण योजना कार्यान्वित केली आहे.

राज्यातील अविकसीत, नक्षलग्रस्त, आदिवासी व ग्रामीण भागात रोजगार निर्मितीचा उद्देश समोर ठेवून या योजनेच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली आहे. सर्वसाधारण योजना, अनुसूचित जाती उपयोजना आणि आदिवासी उपयोजनेअंतर्गत या प्रकल्पाची कार्यवाही करण्यात येणार आहे त्यामुळे राज्यातील अत्यल्प भूधारक, अल्पभूधारक, सुशिक्षीत बेरोजगार, महिला बचत गटातील लाभार्थी यांना आर्थिक उन्नतीची संधी मिळेल.

योजनेची वैशिष्ट्य
हा प्रकल्प ९ लाख रुपये खर्चाचा आहे. कुक्कुट पक्षी पालक आणि कंत्राटदार कंपनीच्या समन्वयाने तो राबविण्यात येत आहे. यामध्ये प्रत्येक लाभार्थीला ४ हजार ब्रॉयलर पक्षांचे संगोपन करावे लागेल. यासाठी त्यालाभार्थीकडे स्वत:चे किंवा भाडे तत्वावरील १० गुंठे जागा असावी. याजागेत ४ हजार चौरस फुट आकाराचे पक्षी गृह बांधणे, तसेच इतर सुविधांमध्ये स्टोअर रुम, पाण्याची व्यवस्था, निवास व्यवस्था, विद्युतीकरण आदि बाबीसाठी ८ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. तर आवश्यक यंत्रसामुग्री घेण्यासाठी १ लाख रुपये असे एकूण ९ लाख रुपये या प्रकल्पासाठी खर्च येणार आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थीला अनुदानाची तरतूद शासनाने केली आहे.

संत्रा शेतीशाळा




नागपूर जिल्ह्यातील नागपुरी संत्राला जगभरात मानाचे स्थान आहे. संत्र्याचे उत्पादन या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात होते. परंतु गेल्या काही दिवसापासून संत्रा झाडावर फायटोपथोरा ही बुरशी चढत असल्यामुळे संत्र्याच्या उत्पादनाला ग्रहण लागले आहे. यामुळे संत्रा उत्पादक हवालदिल झाला आहे. संत्र्याला वाचविण्यासाठी कृषी खात्याने संत्रा शेतीशाळा घेऊन बुरशीचे ग्रहण हटविण्याचा आटोकाट प्रयत्न कृषी खात्यातर्फे होत आहे.

जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यात असलेल्या घोराड या गावी सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणात संत्रा पिकाचे क्षेत्र ६० हेक्टर आर. निवडण्यात आले. या परिसरात असलेल्या गावांची निवड संत्रा शेतीशाळेसाठी करण्यात आली. या गावातील ३० शेतकऱ्यांची शेतीशाळेसाठी निवड करण्यात आली.

कोकणात हळद लागवडीला ‘आत्मा’ देणार गती




जागतिक बाजारपेठेत हळदीला असलेली मागणी पाहता शेतकऱ्यांना निश्चितच चांगला मोबदला मिळू शकतो. कोकणात मुळातच हळदीची लागवड फार कमी प्रमाणात होताना दिसते. परंतु गेल्या काही वर्षात गुहागर, चिपळूण, दापोली या तालुक्यांमध्ये हळद लागवडीचे प्रयोग काही शेतकऱ्यांनी केलेले आढळतात. कोकणातील भौगालिक परिस्थिती, पर्जन्यमान व हवामान हळद लागवडीसाठी पूरक आहे. सरासरी ६४० ते ४ हजार २०० मि.मि. वार्षिक पर्जन्यमान असलेल्या व स्वच्छ सूर्यप्रकाश असलेल्या भागामध्ये या पिकाची वाढ चांगल्या प्रकारे होते. या पिकासाठी १८ ते २८ सेंटीग्रेट तापमान आवश्यक असते. समुद्र सपाटीपासून ४५० ते ९०० मीटर उंचीवर या पिकाची लागवड होऊ शकते. कोकणातील समुद्र किनाऱ्यालगतच्या तालुक्यांमध्ये या पिकाची लागवड उत्तम पध्दतीने होऊ शकते.

सांगलीत मोबाईलवर पूर्व सूचना देणारी हवामान केंद्रे

सांगली जिल्ह्यातील बागायतदारांची हवामान केंद्र सुरु करण्याची मागणी जिल्हा प्रशासनाने मान्य केली असून जिल्ह्यात एकाच दिवशी १६ हवामान केंद्रे सुरु करण्यात आली आहेत. देशातील हा पहिलाच महत्वाकांक्षी प्रयोग आहे. मानवी शरिरास जशी अन्न, पाण्याची गरज असते त्याचप्रमाणे शेतीलाही योग्य असे हवामान लागते. योग्य हवामानाअभावी शेती करणे शेतकऱ्यांना शक्य होणार नाही. द्राक्षासारख्या संवेदनशील नगदी पिकाच्या बाबतीत हवामानाची माहिती मिळणे ही अत्यावश्यक बाब आहे. या सर्व अंतर्गत बाबी लक्षात घेऊनच जिल्ह्यात १६ केंद्रे उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे ९ कि.मी. क्षेत्रातील शेतकऱ्यांना त्यांच्या मोबाईलवर हवामानाची पूर्वसूचना मिळणार आहे.

Sunday, August 21, 2011

हिरवाई नर्सरी




एकीचे बळ हे नेहमीच मोठे असते. या बळातून सर्वसामान्य माणसेसुध्दा सहजपणे एखादे मोठे काम करतात. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कट्टा, ता. मालवण येथील सात मित्रांनी एकत्र येत या एकीच्या बळावरच हिरवाई नर्सरी फुलविली आहे.

कट्टा येथील विकास म्हाडगुल, किशारे शिरोडकर, शरद बोरसकर, दीपक पावसकर, राघो गावडे, महेंद्र माणगावकर व नारायण बिडये हे बालमित्र. लहानपणापासून एकत्र खेळले, बागडले. महाविद्यालयीन शिक्षणही एकत्रित पूर्ण केले. एकदुसऱ्याच्या सुखदु:खात सहभागी झाले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर जो-तो पोटापाण्यासाठी नोकरीच्या शोधात वेगवेगळ्या ठिकाणी गेलं. सुदैवाने सर्वांनाच चांगली नोकरीही मिळाली. लौकिक अर्थाने प्रत्येकजण आपल्या संसारात रममाण झाला.

Thursday, August 18, 2011

Support Anna Hazare Against Corruption.

    

Anna Hazare is one of India's well-acclaimed social activists. A former soldier in the Indian army, Anna is well known and respected for upgrading the ecology and economy of the village of Ralegaon Siddhi which is located in the drought prone Ahmednagar district of Maharashtra state. The erstwhile barren village has metamorphosed into a unique model of rural development due to its effective water conservation methods, which made the villagers self-sufficient. Earlier, the same village witnessed alcoholism, utter poverty and migration to urban slums. Inspired by Hazare’s unique approach of salvaging a hopeless village, the state government has implemented the `Model Village’ scheme as part of its official strategy. Hazare is now synonymous with rural development in India.
Support Anna Hazare Against Corruption. Don't Miss To Like On Facebook.
www.annahazare.org 

Sunday, August 14, 2011

२०११ - वसंतराव नाईक कृषी पुरस्कार जाहीर

शेती क्षेत्रामध्ये स्वयंचलित यंत्रणाच वाढता वापर.

शेतीचे मॅनेजर

खुल्या अर्थव्यवस्थेत आपल्या शेतीच्या कक्षाही रुंदावल्य़ायत. व्यवसाय म्हणून शेती केली आणि तिला योग्य व्यवस्थापनाची जोड दिली तर अनेकांच्या हाताला काम मिळू शकते. शेतमाल उत्पादन ते मार्केटिंगपर्यंत यात अनेक रोजगाराच्या संधी आहेत. या संधीचा फायदा गरवारे इन्स्टिट्यूटमधील एग्रीकल्चर बिजनेस मॅनेजमेंट कोर्समुळे मिळतो. मुंबई विद्यापीठाअंतर्गत सुरु असलेल्या या अभ्याक्रमातून शेतीला तरुण मॅनेजर्स मिळतायत.

Friday, August 12, 2011

धानोरा गावात अवतरली दूधगंगा




राष्ट्रीय कृषी विकास योजने अंतर्गत आता एकात्मिक दुग्ध विकास प्रकल्पाव्दारे दुग्ध विकासाला चालना दिली जात आहे. धानोरा येथील बालाजी दूध उत्पादक सहकारी संस्थेची निवड या प्रकल्पासाठी झाली. संस्थेतील ५० लाभार्थ्यांची निवड करुन प्रत्येक लाभार्थ्याला २ या प्रमाणे १०० गाई ५० टक्के अनुदानावर वाटपाची प्रक्रिया सुरु आहे. या प्रकल्पासाठी ४७ लाख १३ हजार रुपये खर्च होत आहे. त्यामध्ये गाईसाठी निवारा, वैरण गोडावून, पशूखाद्य, जनावरांच्या आरोग्याची देखभाल, दूध मशिन, एक हजार लिटर क्षमतेचा बल्क कुलर, संगणकीय वजन प्रणाली आदी सुविधांच्या समावेशामुळे शास्त्रोक्त पध्दतीने दूध संकलन शक्य आहे.

Thursday, August 11, 2011

युवा अभियंत्याची दुग्ध भरारी




नोकरीच्या मागे न लागता स्वमेहनतीने जिल्ह्यातील बेसखेडा (चांदुर बाजार) येथील व्यवसायाने इलेक्ट्रिकल इंजिनिअर असलेल्या युवकाने दुग्धव्यवसायात क्रांती घडविली आहे. पुणे येथील एका नामांकित कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी सोडून 'चॅलेंज' म्हणून त्याने दुग्धव्यवसाय स्विकारला आणि यशस्वीही करुन दाखविला. कुठल्याही शासकीय मदतीची अपेक्षा न बाळगता परिश्रमाने या व्यवसायात आपली वेगळी ओळख निर्माण करुन जिल्ह्यातील युवकांसाठी तो आदर्श ठरला आहे. रवी पाटील असे या होतकरु युवकाचे नाव आहे. कुटूंबाने शेतकरी असलेल्या या युवकाने शेतीला दुग्धव्यवसायाची जोड देऊन ही किमया साधली आहे.

समाजसेवी संस्था म्हणून काम करतांना आलेल्या अनेक प्रकारच्या अनुभवातून पाटील यांनी दुग्ध व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. मात्र आर्थिक तरतूदी अभावी त्यांचा हा व्यवसाय सुरु होऊ शकला नाही. त्यांचे वास्तव्य असलेल्या चांदुर बाजार तालुका परिसरात अनेक भाकड गाई कसायामार्फत कटाईसाठी जात होत्या. या गाईंना कसायापासून सोडविण्याच्या कामास त्यांनी प्रारंभ केला

Sunday, August 7, 2011

भूमी अधिग्रहणाची सुरुवात व प्रक्रिया




भूमी अधिग्रहणाच्या संपादनाच्या प्रश्नावर संपूर्ण देशात आंदोलने ,सभा,मोर्चे, न्यायालयीन लढाई सुरु आहे. कुठे सिंगूर ,तर कुठे नोएडा ,शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्याहून शासन आणि शेतमालक यांचा संघर्ष सुरु आहे. अशावेळी सामान्य माणसाच्या मनात असा प्रश्न निर्माण होतो की हे भूमिअधिग्रहण म्हणजे नेमके काय, हे कशासाठी करण्यात येते. याचा कायदा केव्हा झाला ,असे एक ना अनेक प्रश्न शहरी व ग्रामीण जनतेच्या मनात निर्माण होतात. त्याचे उत्तर जेव्हा आपण शोधण्याचा प्रश्न करतो तेव्हा भूमिसंपादन अधिनियम १८९४ या कायद्याची अर्थउकल करण्याचा प्रयत्न होतो. वास्तविक पाहता हा कायदा इंग्रजांनी भारतात अंमलात आणला.

भारतात राजेरजवाडे असलेल्या काळापासून राजाचा भूमीवर हक्क सांगण्याची प्रथा होती. परंतु त्याकाळी प्रकल्प वा सार्वजनिक हिताचा कोणताही मोठा प्रकल्प होत नव्हता. सर्व जमीन शेतीखाली आणण्यासाठीचा आग्रह राहायचा. राजाला जरी एखादी जमीन मोठ्या मंदिराला देण्याचा प्रसंग आला तर खाजगी जमीन विकत घेऊन राजदान देत असल्याचे अनेक दाखले आपल्याला सापडतात.

सामुहिक शेती..फायदा किती!




कोकणातील डोंगराळ भागात शेती करणे हे कष्टाचे आणि तेवढ्याच जिकिरीचे काम असते. मुंबई आणि पुणे येथे होणाऱ्या स्थलांतरामुळे शेतीसाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ उपलब्ध होणे कठीण असते. शिवाय सातबारा उताऱ्यावर कुटुंबातील अनेकांची नावे असल्याने जमिनीच्या मालकीलाही मार्यादा येतात. शेतीच्या कामांसाठी वेळेवर मजूर उपलब्ध होत नाही. जमिनीच्या लहान तुकड्यामुळे शेती फायदेशीर ठरत नाही. शिवाय भूस्खलन आणि जंगली प्राण्यांमुळे होणाऱ्या शेतीच्या हानीलाही तोंड द्यावे लागते. अशा परिस्थितीला यशस्वीपणे तोंड देत फायद्याची शेती करण्यासाठी चिपळूण तालुक्यात पेढांबे गावातील तरूण शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन सामुहिक शेतीचा यशस्वी प्रकल्प राबविला.

सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेल्या पेढांबे गावातील बरीच जमीन पडीक होती. कोकणात साधारणपणे खरीपाच्या पिकानंतर जमीन पडीक स्वरूपात असते. पेढांबे गावात शेतीशाळेतील मार्गदर्शन आणि कृषिभूषण रणजित खानविलकर यांच्या प्रयत्नामुळे २५ तरुण शेतकरी एकत्र आले. दिपक शिंदे या प्रयोगशील शेतकऱ्याच्या नेतृत्वाखाली त्यांनी अशी जमीन फुलविण्याचे निश्चित केले. भौगोलिक स्थिती आणि शेतीकामातील मर्यादांवर मात करण्यासाठी सामुहिक शेतीची संकल्पना सर्वांनी स्वीकारली.

रोहयो अंतर्गत डाळींब बागेतून भरघोस उत्पन्न




जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यात तळेगाव येथील शिवाजी काशिनाथ शिवतारे यांनी डाळींब फळबाग लागवड करण्याचे ठरविले. ते यापूर्वी सतत १५ वर्षे जिल्हा परिषद सदस्य, शिक्षण सभापती या पदावर कार्यरत होते. त्यासोबतच त्यांना शेती करण्याचा छंद होता. त्यांनी रोजगार हमी योजने अंतर्गत ३ हेक्टर क्षेत्रावर डाळींब लागवड केली.

वेळोवेळी कृषि विभागाच्या अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन घेऊन डाळींब पिकामधील आदर्श व्यवस्थापन, एकात्मिक किड व रोग व्यवस्थापन तसेच सूत्रकृमीचे नियंत्रण, उच्च प्रतीच्या डाळींब उत्पादनासाठी फर्टिगेशनव्दारे खत व्यवस्थापन अशा प्रकारे नियोजन केले. लागवड करण्यापूर्वी मे महिन्यात खड्डे खोदून त्यामध्ये सेंद्रिय पालापाचोळा, शेणखत, लिंडेन पावडरने खड्डे भरुन घेतले. नंतर लगेच ३ हेक्टर क्षेत्रावर ठिबक सिंचन संच बसवून लागवड केली.

पाण्याचे व्यवस्थापन करुन गरजेनुसार डाळींब बागेला पाणी दिले. वर्षातून तीन ते चार वेळा खुरपणी करुन निघालेल्या तणाचे डाळींब पिकाच्या बुडख्यापाशी आच्छादन करुन पाण्याची बचत केली. ट्रायकोडर्मा, पी.एस.बी. हे शेणामध्ये मिश्रण करुन प्रत्येक झाडास दोन लिटर याप्रमाणे दिले. डाळींबाची छाटणी स्वत: दरवर्षी अनुभवी कामगारांकडून करुन घेतली. फांदीची फळे आकाराने मोठी असतात यामुळे पंजा छाटणी व पोट छाटणी अशा दोन प्रकारच्या छाटणी करण्यात येतात. छाटणीनंतर लगेच एक टक्का बोर्डी मिश्रणाची फवारणी करण्यात आली.

आधुनिक तंत्रज्ञान वापरुन एका झाडापासून ३५ किलो उत्पादन मिळते. एकूण २४०० झाडांपासून ८४ हजार किलो उत्पादन झाले. यावर्षामध्ये मिळालेला सरासरी बाजारभाव २० रुपये प्रति किलो प्रमाणे १६ लाख ८० हजार रुपये एवढे विक्रमी उत्पन्न मिळाले आहे. या सोबतच डाळींबाची पॅकींग, ग्रेडिंग करुनच बाजारपेठेमध्ये विक्रीसाठी पाठविले जाते.

शेतकऱ्यांकडून डाळींब रोपासाठी मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. मागणी प्रमाणे ७० हजार डाळींब कलमे तयार करुन प्रती रोप १५ रुपये दराने विक्री करण्यात येते. त्यापासून १० लाख ५० हजार रुपये मिळाले आहेत. डाळींब विक्रीपासून व डाळींब कलमापासून २७ लाख ३० हजार रुपयांचे उत्पन्न मिळाल्याचे श्री. शिवतारे यांनी सांगितले. 

Thursday, August 4, 2011

कृषी विज्ञान केंद्रामुळे झाली प्रगती




जालना जिल्ह्यातील घोडेगाव येथील रहिवाशी रामभाऊ सखाराम मोहिते यांच्याकडे ३.५ एकर कोरडवाहू जमीन आहे. या जमिनीत मूग, उडीद, ज्वारी, बाजरी, कापूस या पिकांच्या उत्पन्नातून त्यांच्या गरजा पूर्ण होणे कठीण होते.

सन १९९३-९४ मध्ये त्यांनी जालन्याजवळ असलेल्या कृषी विज्ञान केंद्र खरपुडी येथे कामगार म्हणून रोजंदारी सुरु केली. याच रोजंदारीबरोबर ते शेतीचेही धडे घेऊ लागले. तसेच या केंद्रातील विज्ञान मंडळाचे सदस्य झाले. कोरडवाहू शेतीत काहीतरी वेगळे करुन दाखवावे, असे त्यांनी ठरवले. नदीकाठी असलेल्या जमिनीत स्वकष्टाने विहीर पूर्ण करुन त्या पाण्यावर बागायत कापूस, गहू यासारखी पिके घेऊन कोरडवाहू जमीन पूर्ण बगायती केली.

कृषी विज्ञान केंद्र खरपुडी येथून त्यांनी प्रशिक्षण पूर्ण करुन आपल्या क्षेत्रावर मातृवृक्षाची लागवड करुन रोपे व कलमांची निर्मिती सुरु केली. यातूनच पुढे कृषी विभागाकडून रोपवाटिकेचा परवाना मिळवून 'अनुसया फळरोपवाटिका' सुरु केली. तसेच गांडूळ खत प्रकल्प उभा करुन स्वत:ची गरज भागवून गांडूळ खताची विक्री करु लागले.

आई-वडिलांनी आकार दिला, भाऊ लक्ष्मण व जावजय यांनी साथ दिली. तसेच पत्नी निरक्षर असूनही नेहमीच माझ्या कामात साथ देत आहे, असे सांगून श्री मोहिते यांनी आपल्या यशाचे सहस्य उलगडले. कृषी विज्ञान केंद्र, सामाजिक वनीकरण व कृषी विभाग यांनी मला वेळोवेळी केलेले मार्गदर्शन व सहकार्य यामुळेच माझी प्रगती व आर्थिक परिस्थिती सुधारली आहे, असेही ते अभिमानाने सांगतात. 

ठिबक सिंचनातून साधली उत्पादनाची किमया




जालना जिल्ह्यामध्ये शेतीचे सर्व अर्थशास्त्र कापूस या एका पिकावर अवलंबून व आधारलेले आहे. कापूस उत्पादन घेण्यासाठी केला जाणारा खर्च व त्यापासून मिळणारे उत्पादन याचा विचार करता कमी जमीन धारणा असणाऱ्या शेतकऱ्यांना यापासून फारच कमी उत्पादन मिळत असल्याचे चित्र आहे.

सध्याच्या काळामध्ये शासनाच्या विविध योजनांव्दारे जास्त उत्पादन घेण्याचे प्रयोग यशस्वी होताना दिसत आहेत. पण अशा उद्यमशील व प्रयोगशील शेतकऱ्यांची संख्या हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच आहे. या संख्येमध्येच गणना केली जाऊ शकते असे मौजे मनापूर, ता. भोकरदन, जि. जालना येथील तरुण शेतकरी देवीदास पिराजी दळवी आहेत. वडिलोपार्जित जमीन, मोठे एकत्रित कुटुंब आणि शेतामध्ये पारंपरिक पध्दतीने घेतली जाणारी कापूस, हरभरा, ज्वारी ही पिके यापासून मिळणाऱ्या उत्पन्नामध्ये त्यांच्या कुटुंबाची गरज भागविली जात होती.

द्राक्षांच्या जिल्ह्यात मोसंबीचं पीक




संत्रा, मोसंबी हे शब्द जरी कानावर पडले तरी ओठांवर जीभ फिरविण्याचा मोह कोणालाही आवरता येत नाही. द्राक्षांचा जिल्हा म्हणून नाशिकची ओळख दूरपर्यंत आहे. परंतु मोसंबी पिकाचं राज्य हे मराठवाड्यात आहे. असे असले तरी नाशिक जिल्ह्यातील भगूर या गावातील किरण देशमुख या तरुण शेतकऱ्याने निसर्गाचा समतोल राखत आपल्या शेतात मोसंबीची लागवड करुन आधुनिक शेतीचा अनोखा प्रयोग केला आहे.

निसर्गाच्या लहरीपणामुळे नाशिकचे द्राक्ष उत्पादक शेतकरी अतिशय हैराण झालेले आहेत. परंतु भगूरच्या किरण देशमुखने अत्यल्प खर्चात फळबागांचा अनोखा प्रयोग राबविण्याचे धाडस केले आहे. त्यांनी वडिलांच्या मार्गदर्शनाखाली आपले बी.ए. पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. त्यानंतर वडिलांनी घेतलेल्या शेतीवरच आपला उदरनिर्वाह करण्याचा निर्णय घेतला. वडील सेवानिवृत्त झाल्यानंतर ते पुन्हा आपल्या मूळगावी भगूर येथे राहण्यास आले. परंतु जालन्यात महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना आपल्याच मित्रांचे मोसंबीचे बाग कसे असतात याची माहिती चर्चेतून घेण्याचा प्रयत्न किरणने केला होता.

भगूरला आल्यानंतर वडिलांनी संपूर्ण कौटुंबिक जबाबदारी किरणवर सोपविली. त्याप्रमाणे शेती करायची पण ती परंपरागत न करता आधुनिक प्रकारची करायची असा निर्णय त्यांनी घेतला. प्रथमत: कमी उत्पन्नाचा फटका बसेल याची पूर्ण जाणीव मनाशी ठेवत शेती व्यवसायावर आपली नजर केंद्रित केली. त्यांनी शेताच्या बांधावर सागवानी झाडांची लागवड केली. त्याचबरोबर आंब्याच्या विविध जातीचे रोपटे लावले. त्याला काही फारसा खर्च आला नाही. परंतु जेव्हा या रोपट्याचे रुपांतर झाडात झाले तेव्हा खऱ्या अर्थाने त्यांचा आत्मविश्वास वाढला व शेतीला अजून वेगवेगळ्या प्रयोगातून प्रगतीपथावर कसे नेता येईल याकडे त्यांचे मन वेग घेऊ लागले.

त्याचे मन महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जालन्यात पाहिलेल्या मोसंबीच्या बागांपर्यंत जाऊन पोहोचले. जालना गाठून तेथे आपल्या महाविद्यालयीन मित्रांचा शोध घेऊन आपली नवीन कल्पना त्यांना बोलून दाखविली. मित्रांनाही ही कल्पना आवडली व त्यांनी लगेच मदतीचा हात पुढे केला. त्याप्रमाणे त्यांनी जालन्याहून सव्वाशे रंगपूर जातीचे मोसंबीचे कलम विकत घेतले. याची लागवड कशी करायची याची पूर्ण कल्पना नसल्याने त्यांनी जालन्याहून आपल्या सहकाऱ्यांना हे कलम लावण्यासाठी भगूरला आणले.

जवळच्या काही लोकांनी त्यांच्या प्रयत्नांची थट्टा केली. परंतु त्यांनी निंदकाचे घर असावे शेजारी या म्हणीप्रमाणे सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आपले काम सुरु ठेवले. या प्रयोगाला त्यांची पत्नी सुजाता देशमुख यांनी साथ दिली. जेव्हा या झाडाला निसर्गाच्या लहरीपणाचा कोणताही प्रादुर्भाव न होता चांगल्या प्रकारचे फळ आले तेव्हा अनेकांनी त्यांच्या शेतीत जाऊन व आधुनिक शेतीचा प्रयोग पाहून कौतुक आणि अभिनंदन केले.

मोसंबी पिकविण्याचे मनाशी बाळगलेले स्वप्न त्यांनी प्रत्यक्षात उतरविले आहे. मेहनतीचे चीज होते असा विचार ठेवून त्यांनी शारीरिक कष्टाबरोबरच बौध्दिक क्षमतेचा वापर केला. मोसंबी लागवडीचा प्रयोग यशस्वी करुन एक नवा पायंडा या तरुण शेतकऱ्याने पाडला आहे.

Popular Keywords

“पिवळी क्रांती अंजीर अंतरपिक अन्नधान्य अन्नसुरक्षा अभियान आदिवासी आधुनिक पोल्ट्री व्यवसाय आंबा आवळा इस्त्रो उपमुख्यमंत्री उस ऊस ऊसतोडणी ऍग्रो टुरिझम कर्जमाफी कात कांदा कापूस कारले कीडनियंत्रण कुक्कुटपालन कृषि उत्पन्न बाजारसमिति कृषि योजना कृषी दिन कृषी विद्यापीठ कृषीतंत्र कृषीमंत्री केळी कोकम कोळंबी खते खरबूज गहू जमिन जलसंधारन झरा ट्रक्टर ठिबक डाळिंब डाळींब महोत्सव - 2010 ढोबळी मिरची तलाव तुर तेल्या दुग्धव्यवसाय दॅट उपकरण द्राक्ष निर्यात निलक्रांती पाणी पाणी अडवा पाणी जिरवा पान पीक पुरंदर पृथ्वीराज चव्हाण प्रक्रिया उद्योग फलोत्पादन फळबाग फायटोप्थोरा बचत गट बटाटा बागाईतदार बाजारपेठ बाजारभाव बायोगॅस बियाणांची गुणवत्ता बी-बियाणे उपलब्धता बैल पोळा उत्साहात साजरा.Indian Farmer's Unique Festival. भाजीपाला. भात भेंडी मच्छिमार मजूर मत्स्य व्यवसाय मधशाळा मधुमक्षिका पालन मराठवाडा कृषी विद्यापीठ महा-रेन महाकृषी महाराष्ट्र महाराष्ट्रातील शेती कोण पिकवतो महिको महिला अणि कृषि क्षेत्र माती परीक्षण मिरची मोसंबी यशोगाथा रेशीम रेशीम उद्योग रोग-नियंत्रण. वनराई बंधारे वीज निर्मीती वृक्षायुर्वेद शिवामृत शेडनेट हाऊस शेतकरी शेततळे. शेती शेती व्यवसाय शेतीपूरक व्यवसाय शेतीशाळा शेतीसाठी हवामानाचा सल्ला समूह शेती साखर साखर कारखाना सिंचन प्रकल्प सीताफल सेंद्रिय शेती सोनेरी हळद सोयाबीन स्ट्रोबेरी स्वाभिमानी शेतकरी संघटना हरितक्रांती हळद