Pages

Saturday, February 5, 2011

शंभर टक्के बायोगॅस योजना राबविणारी बरगेवाडी..





तंटामुक्त गावाबरोबरच बायोगॅसचा वापर करणारं आदर्श निर्मल गाव म्हणून बरगेवाडी या गावाचा उल्लेख अग्रक्रमानं केला जातो. चहुबाजूंनी डेंगराआड लपलेलं, हिरवाईन नटलेलं बरगेवाडी हे कोल्हापूर जिल्ह्यातील सुंदर असं गाव ! राधानगरी तालुक्यात निर्मल ग्राम अभियानाबरोबरच १०० टक्के बायोगॅस योजनेची सुरवातही याच गावात झाली आहे. केवळ ७०४ लोकवस्ती असूनहे शासनाच्यू बहुतांशी योजना राबवून एकजुटीनं विकासासाठी झटणारं अनोखं गाव !

रस्त्याच्या दुतर्फा झाडे, गावची स्वागत कमान व कमानी पासून कांही अंतरावर असलेलं ग्रामदेवतेचं मंदीर बाहेरुन येणार्‍या व्यक्तिंचे लक्ष वेधून घेते. शेती हा इथल्या गावकर्‍यांचा प्रमुख व्यवसाय असून शेतीच्या जोडीला भाजीपाला, दुग्ध व्यवसायही केला जातो. ऊस, भात, नाचणी, भुईमुग ही प्रमुख पिके इथल्या शेतीत शेतकरी घेत असून वांगी, मेथी, पोकळा, भेंडी, दोडका, काकडी या भाज्याचे पिक घेतले जाते. 

खरं तर जेमतेम अर्धा एकराच्या आसपास शेती असूनही इथल्या शेतकर्‍यांनी कणकवली-सिंधुदुर्ग या कोकण भागात भाडे तत्वावर ऊस व अन्य पिकांची शेती कष्टाने करुन कौटुंबिक आर्थिक स्थिती सुधारली आहे. बहुतांशी घरे सिमेंटची असून प्रत्येक घराच्या परस बागेत बायोगॅसचे खड्डे खोदले आहेत. बायोगॅसच्या वापराबाबत बोलताना ग्रामपंचायत सदस्या शोभा बरगे म्हणाल्या, बायोगॅसमुळे इंधनाची बचत होत असून पोटाचे विकार तसेच साथीचे रोगही कमी झाले आहेत. स्ंांगिता बरगे म्हणाल्या, यामुळे चूल पेटविण्यासाठी लागणारा वेळ व धूराच्या त्रासापासून सुटका झाली आहे. बायोगॅसमुळे शेतीसाठी रासायनिक खतांचा वापर कमी झाल्याचे सांगून पोलीस पाटील रामचंद्र बरगे म्हणाले, शेणखतामुळे शेतात उत्पादन अधिक होवू लागले आहे.

गावात वाचनालय, दुध डेअरी, शाळा, व्यायाम शाळा तसेच बचतगटांची स्थापना झाली आहे. गावच्या प्रगतीसाठी सर्वांनी कोर्ट कचेरीवरील खर्च थांबवायला हवा, हे जाणून गावकर्‍यांनी तटांमुक्त अभियानात सहभाग नोंदवला आणि २००८-०९ ला तंटामुक्त पुरस्कार प्राप्त केला. यामुळे सामंजस्याची भावना वाढण्याबरोबरच एकोप्याने विविध विकास योजना गावात राबविल्या जावून गावची प्रगतीही होवू लागली. गावात १०० टक्के महसूली वसूली करण्यात आली आहे.

तंटामुक्ती अभियानात बरगेवाडीने चमकदार कामगिरी केली असून दिवाणी फौजदारी खटले गावपातळीवर मिटविण्यात तंटामुक्त समितीने यश मिळविले आहे. राधानगरी पंचायत समितीचे सभापती संजय गोविंदराव कलिकते यांच्याबरोबरच सरपंच हिंदुराव बरगे यांनी गावात विविध योजना राबवून गावची सर्वांगिण प्रगती साधली आहे. पर्यावरण संतुलीत गाव योजनेतही गावाने सहभाग नोंदविला असून या योजनेतही गावची वाटचाल प्रगतीच्या दिशेने सुरु आहे. गावकर्‍यांनी आजवर ७६ टक्के झाडे जगविली आहेत.शासनाच्या मदतीबरोबरच लोकवर्गणीतूनही गावची प्रगती साधली आहे.गावात दसरा सण खुप मोठय़ा प्रमाणात साजरा केला जातो. यावेळी शस्त्रे व काठय़ांची मिरवणूक निघते, असे सरपंच हिंदुराव बरगे यांनी सांगितले. 

जिल्हा परिषदेचे जिल्हा कृषि अधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, गट विकास अधिकारी घनश्याम जाधव, विस्तार अधिकारी अरविंद पाटील व श्री. भोई यांच्या मार्गदर्शनाखाली प्रगतीच्या दिशेने वाटचाल करणा-या गावच्या उपसरपंचपदी मयुरी बरगे तर ग्राम सेविका म्हणून नंदा कांबळे कार्यरत आहेत. सर्वांना प्रेरणादायी ठरणार्‍या बरगेवाडीची वाटचाल निश्चितच प्रगतीच्या दिशेने सुरु आहे.
'महान्यूज

No comments:

Post a Comment