Pages

Sunday, May 1, 2011

राज्याचे दरडोई उत्पन्न चौपट करण्याचा प्रयत्न - मुख्यमंत्री

राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वच क्षेत्रांतील वैचारिक नेतृत्त्वाकडून योगदान आवश्यक आहे. सन २०२० पर्यंत राज्याचे दरडोई उत्पन्न चौपट करण्याच्या दिशेने राज्य शासनाचे प्रयत्न आहेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.

'स्टार माझा' वाहिनीने परळ येथील ग्रँड मराठा हॉटेलमध्ये आयोजित केलेल्या 'माझा महाराष्ट्र २०२०' कार्यक्रमाच्या उद्घाटनाच्या सत्रात मुख्यमंत्री बोलत होते.

श्री.चव्हाण म्हणाले की, महाराष्ट्रात मोठय़ा प्रमाणात क्षमता आहे. राज्याने स्वातंत्र्यानंतर देशाला वैचारिक नेतृत्व दिले. राज्यात सहकार चळवळीच्या माध्यमातून विकास झाला. रोजगार हमी योजना, महिला धोरण आणि माहितीच्या अधिकाराचा कायदा ही राज्याने केलेली विशेष कामगिरी आहे. पण याचबरोबर कला, क्रीडा, साहित्य, सांस्कृतिक या क्षेत्रांतही भरीव कामगिरी होण्याची आवश्यकता आहे.

भारत आर्थिक महासत्ता होण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, देशाला महासत्ता व्हायचे असेल तर ज्ञानाधारित समाजरचना हवी. त्यासाठी शिक्षणाचा दर्जा उंचवावा लागणार आहे. शिक्षणाचा दर्जा सुधारण्याबरोबरच मनुष्यबळ विकास कसा करता येईल, याचाही विचार करण्याची आवश्यकता भासणार आहे.

शेतीवरचा भार कमी करण्याबरोबरच सेवा आणि उत्पादन क्षेत्राचा वाटा ढोबळ उत्पादनात वाढत असताना त्यासाठी आवश्यक असणार्‍या सर्व पायाभूत सुविधा यांचाही विचार करावा लागणार आहे. शासन त्यादृष्टीने धोरणे आखत आहे, त्याची अंमलबजावणी करीत आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

नागरिकरणाचे भविष्यात मोठे आव्हान असणार आहे, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, नागरिकरणामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. पण यावर उपाययोजना करण्याचे शासन प्रयत्न करीत आहे. तथापि, सर्वच शासनाने करावे, अशी भूमिका उपयोगाची नाही. त्यासाठी समाजाच्या सर्वच क्षेत्रातील वैचारिक नेतृत्त्वाने योगदान देण्याची आवश्यकता आहे.

यावेळी माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू, ज्येष्ठ पत्रकार 'दिव्यमराठी'चे संपादक कुमार केतकर, संशोधक, लेखक डॉ.बाळ फोंडके यांनीही आपले विचार मांडले. 'स्टार माझा'चे संपादक राजीव खांडेकर यांनी प्रास्ताविक आणि निलेश खरे यांनी सूत्रसंचलन केले.

No comments:

Post a Comment