Pages

Monday, May 30, 2011

सुप्त पाण्याच्या झ-याव्दारे ओंढेवाडीस मिळाले पाणी.




सर्वसामान्यांमध्ये एक प्रचलित उक्ती आहे गाव करी ते राव काय करी याप्रमाणे नाशिक जिल्हयातील सिन्नर तालुक्यातील औंढेवाडी या गावातील ग्रामस्थांनी ७० दिवस श्रमदान करुन स्वत: पुरुष , स्त्री मुले राबत राहून गावासाठी पूर्ण पाण्याचा स्त्रोत शोधला आणि आपल्या गावासाठी पाणी पुरवठा करण्याची योजना कार्यान्वीत केली. हे खरोखरच आदर्शवत काम आहे.


सिन्नर तालुक्यातील सिन्नर घोटी महामार्गापासून १२ किलोमीटर अंतरावर असलेले औंढेवाडी हे आदिवासी बहुल वस्तीचे गाव. पाटबंधारे विभाग, मेरी यांच्या सहकार्याने युवामित्र या समाजसेवी संस्थेच्या प्रयत्नाने येथील डोंगरावरील नैसर्गिक ढोल्या झ-याचे पाणी गावात पोहविण्याचे महत्वपूर्ण काम करुन गावास पाणी उपलब्ध करुन देण्यात आले.


औंढेवाडी हे ८०० लोकवस्तीचे गाव असून या प्रयत्नाने गावाची पाणी टंचाई दूर होणार असून ग्रामस्थांना पाण्यासाठी दीड ते दोन किलोमीटर पायपीट करण्याची गरज उरली नाही. औंढेवाडी जवळील डोंगरावर सुप्त पाण्याचा झरा होता. याची माहिती युवामित्र संस्थेचे प्रमुख सुनील पोटे व मनीषा पोटे यांना मिळाली. त्यांनी स्थानिक ग्रामस्थ, पाटबंधारे खात्याचे अभियंता अविनाश लोखंडे व मेरीचे कार्यकारी अभियंता डॉ. संजय बेलसरे यांच्या मदतीने या झ-याचा शोध घेतला. 


हा झरा खुप जुना असून त्यात बारामाही पाणी असते. मात्र या झ-याचा आवाज होऊन पाणी लुप्त होत असते. या पाण्याचा आवाज होत असल्याने त्याला ढोल्या झरा असे नाव पडले. या झ-याचा उपयोग करुन गावाची पाणी टंचाई दूर करता येईल. या विचाराने पोटे यांनी सर्व ग्रामस्थांना प्रेरित केले. पुण्याचे युवा उद्योजक सोमदत्त लाड यांनी या प्रकल्पासाठी एक लाख रुपये दिले तर पुण्यातील एचडीएफसी बँकेतील अधिकारी ज्युडा रॉड्डीज यांनी बँकेतील इतर कर्मचा-यांच्या सहकार्याने ७० हजार रुपये मदत मिळवून दिली. त्या आधारे पाईप, सिमेंट वाळू इत्यादीची जमवाजमव करुन ग्रामस्थांनी परिश्रम घेऊन एक महिन्यातच १२० मीटर उंचीवरुन हे पाणी गावात आणले.


या पाणी योजनेसाठी दररोज २० ग्रामस्थ व शेवटच्या काही दिवसात रोज ७० लहान थोर, स्त्री पुरुष गावकरी राबत होते. यामुळे गावास दररोज दीड लाख लिटर पाणी उपलब्ध होत आहे. गावाच्या गरजेच्या मानाने हे पाणी तिप्पट असून, जादा पाण्याचा वापर शेतीसाठीही करण्यात येणार आहे. 

सामूहिक प्रयत्नातून व ग्रामस्थांच्या प्रबळ इच्छाशक्तीमुळे गावासाठी पाणी योजनेचे मोठे यश उभे राहिले आहे तसेच रस्ते , वीज, आरोग्य विषयक , विविध कामे करुन ओंढेवाडी गाव आदर्श करण्याचा संकल्पही ग्रामस्थानी केला. यासाठी ग्रामस्थांचे कौतुकच करावयास हवे. 

No comments:

Post a Comment