Pages
▼
Wednesday, July 13, 2011
परभणीच्या रेशीमाचे बंध
रेशीम धाग्याच्या उत्पादनात राज्याचा वाटा पाहिजे त्या प्रमाणात नाही. त्यामुळे हा वाटा वाढविण्यासाठी परभणीसह मराठवाड्यातील रेशीम उद्योग आता नव्याने कात टाकीत आहे. परभणी जिल्ह्यातील शेतक-यांचा रेशीम धागा आता हायटेक सिटी म्हणून ओळखल्या जाणा-या बंगलोरनजीक रामनगरच्या बाजारपेठेत पोहचला आहे. विशेष म्हणजे येथील रेशीम धाग्याला प्रती क्विंटल ३५ हजार रुपयांचा भाव मिळाल्याने येथील शेतकरी रेशमाचे हे बंध जपण्यासाठी सरसावला आहे.
रेशीम किटकाचे संगोपन करुन कोष तयार करणारा रेशीम उद्योग चीन आणि भारतामध्ये मोठ्या प्रमाणात केला जातो चीनमध्ये ८० टक्के तर भारतामध्ये १३ टक्के क्षेत्र रेशीम उद्योगाने व्यापले असून उर्वरित ७ टक्के क्षेत्र जपान, बांगलादेश व अन्य देशांमध्ये आहे. रेशीम कीटकाचे तुती रेशीम, टसर रेशमी, इरी, रेशमी, मुगा रेशमी हे ४ प्रकारचे रेशीम भारतामध्ये घेतले जातात.
मुगा रेशीमचा धागा सोनेरी असून मुगा रेशीम आसाम व परिसरात घेतल्या जाते. भारतात ९५ टक्के तुती रेशीम व ५ टक्के इतर रेशीमाचे उत्पादन केले जाते. यामध्ये ५० टक्के रेशीम उद्योग कर्नाटकात त्या खालोखाल आंध्रप्रदेश, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, जम्मू-काश्मीर येथे रेशीम उद्योग क्षेत्र आहे. ३० वर्षांपासून महाराष्ट्रात रेशमी उद्योग चांगल्या प्रकारे स्थिरावला असून मराठवाड्यात बीड आणि जालना जिल्हा रेशीम उद्योगामध्ये आघाडीवर आहे.
गतवर्षी देशात ३ हजार २०० एकर रेशीम लागवड करण्यात आली होती. तर यावर्षी ९ हजार ३०० एक्कर क्षेत्रावर रेशीम लागवड करण्यात आली असून रेशीम उत्पादनात बारामती आघाडीवर आहे. उद्योगाची ३ टप्प्यामध्ये विभागणी असून प्रथम तुती लागवड, तद्नंतर रेशीम कीटक संगोपन करुन कोषापासून रेशीम धागा काढून वस्त्र तयार करणे ही प्रक्रिया असते.
मराठवाडयात रेशीम उद्योग उभारी घेत असून या उद्योगाच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध असून दर महिन्याला शेक-यांच्या हाताला रेशीम उद्योगाच्या माध्यमातून पैसा मिळत आहे. जुलैपासून मार्चपर्यंत रेशीम उद्योग करता येतो. एका एकरमध्ये ६ क्विंटल कोषाचे उत्पादन होते. यातून सरासरी १५ हजार रुपये क्विंटल या भावाने शेतक-यांना एकरी ९० हजार रुपये मिळतात. उत्पादन खर्च जावून शेतक-यांना एकरी ५० हजार रुपये उत्पादन होत आहे.
हाच भाव बेंगलोर नजीकच्या रामनगर येथील बाजारात जादा असल्याने परभणी तालुक्यातील धसाडी-अंगलगाव येथील शेतक-यांसह सोनपेठ तालुक्यातील सायखेडा येथील शेतक-यांनी उत्पादित केलेला रेशीम धागा या बाजारात पोहचला आहे.
अपंग, वृध्द, स्त्रीपुरुष यांना हा उद्योग करणे सहज शक्य आहे. रेशीम किड्यानी खावून उरलेला तुतीचा पाला दुभत्या जणावरांसाठी चांगले खाद्य होऊ शकते. याशिवाय रेशीम किडीची विष्ठा शेतीसाठी चांगले खत म्हणूनही उपयोगात आणता येते. एकंदरीत मराठवाड्याचा रेशीम उद्योग कात टाकत असून शेतक-यांच्या हातातही यामुळे पैसा येऊ लागला आहे.
No comments:
Post a Comment