Pages

Wednesday, October 26, 2011

रेशीम शेती....फायदा किती

प्रत्‍येक क्षेत्रात महिला ह्या पुरुषांबरोबर खांद्याला खांदा लावून प्रगती करीत आहेत. शेतीमध्‍ये महिला केवळ निंदण, वखरण, मशागत आदी कामे करीत नाहीत तर या कामासोबतच संपूर्ण शेतीचा डोलारा आपल्‍या खांद्यावर घेतात. रेशीमच्‍या उत्‍पादनातून एकरी एक लाख रुपयांचे उत्‍पन्‍न घेण्‍याची किमया वरखेडच्‍या कुसुमताई ढगे यांनी केली आहे.

परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्‍यातील वरखेड येथील श्रीमती ढगे यांनी रेशीम उद्योगात आदर्श निर्माण केला असून एकरी एक लाख रुपयांचे उत्‍पन्‍न मिळविले आहे. पाच वर्षात त्‍यांनी हा पल्‍ला गाठला आहे. पाथरीपासून १५ कि.मी. अंतरावर वरखेड शिवारात रामदास ढगे हे शेतातच राहतात. त्‍यांच्‍या पत्‍नी कुसूमताई यांना सुरुवातीपासूनच शेतीची आवड होती. त्‍यांनी पारंपरिक शेतीबरोबरच रेशीम शेतीला प्राधान्‍य दिले. पाच वर्षापासून त्‍या यशस्‍वीरित्‍या रेशीम शेती करीत आहेत. कुसूमताईंनी अडीच एकरात तुतीची लागवड केली असून त्‍यापासून त्‍यांना दरवर्षी सुमारे दोन लाख रुपयांचे रेशीम कोषाचे उत्‍पन्‍न मिळत आहे.

दीड लाख रुपये खर्चून बांधलेल्‍या ५० गुणिले २० फूट आकाराच्‍या कीटक संगोपनगृहात दरमहा २०० अंडी पुंज्‍यापासून १२० ते १२५ किलो रेशीम कोषाचे उत्‍पन्‍न मिळत आहे. वर्षभरात एकूण ७ ते ८ पिके घेतली जातात. अडीच एकर तुती लागवडीपासून सुमारे ८०० किलो दुबार जातीच्‍या रेशीम कोषाचे उत्‍पादन त्‍या काढत आहेत. गतवर्षी त्‍यांच्‍या रेशीम कोषाला कर्नाटकात चांगला भाव मिळाल्‍यामुळे कुसुमताईंनी बंगलुरू येथील बाजारपेठेत कोषाची विक्री केली. सरासरी २७० रुपये प्रतिकिलोप्रमाणे दोन लाख रुपयांचे उत्‍पन्‍न त्‍यांनी मिळविले. तुती बियाणे विक्रीपासून ७ हजार ५०० रुपयांचे उत्‍पन्‍नही मिळाले. हलक्‍या प्रतीच्‍या जमिनीत तुतीची लागवड करुन चांगले उत्‍पन्‍न मिळविता येते, हे त्‍यांनी सिध्‍द केले.

जोडवळ पट्टा पध्‍दतीने ३ गुणिले ६ फुट अंतरावर तुतीची लागवड करुन ठिबक संचाद्वारे पाण्‍याचे नियोजन त्‍यांनी केले. एकरी दहा गाड्यांप्रमाणे दरवर्षी एकदा शेण खत, दर दोन महिन्‍यांची एकरी एक बॅग डीएपी, एक बॅग पोटॅश किंवा दीड बॅग १०:२६:२६ रासायनिक खत पेरणी करुन दिली जाते. चांगल्‍या प्रतीचा व हिरवागार पाला मिळावा म्‍हणून दरमहा एकरी एक बॅग युरियाद्वारे नत्र खताचा पुरवठाही करण्‍यात येतो. विशेष म्‍हणजे, तुती बागेस कोणत्‍याही प्रकारची किटकनाशक फवारणी त्‍यांनी केली नाही. या व्‍यवसायात रेशीम उत्‍पन्‍नाच्‍या २५ टक्‍के निविष्‍टाचा खर्च, २५ टक्‍के मजुरी खर्च जाता ५० टक्‍के निव्‍वळ नफा यामधून मिळतो. रेशीम शेतीचा हा आदर्श इतरांना प्रेरणादाणी आहे.