Pages

Sunday, June 3, 2012

खरबूज लागवडीचा यशस्वी प्रयोग

सिंधुदुर्गात होत असलेली कृषी क्रांती येथील समृद्धीचे कारण बनणार आहे. पारंपरिक शेतीला बाजूला ठेवून शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि नवनवीन प्रयोग करण्याची मानसिकता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये निर्माण होऊ लागली आहे. मालवण तालुक्यातील बिळवस येथील सिताराम सदाशिव सावंत यांनी असाच एक प्रयोग केला असून मुंबई येथील काम सुटल्यावर त्यांनी गावात येऊन दुसऱ्याची शेती भाडेतत्वावर घेऊन आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित असलेला कृषी उद्योग करण्यावर भर दिला आहे.

सावंत यांनी स्वतःच्या मालकीची शेतजमीन नसतानाही शेतीची आवड असल्याने दुसऱ्या शेतकऱ्याची सुमारे २५ गुंठे जमीन भाडेतत्वावर घेतली. या शेतीमध्ये खरबुजाची लागवड करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. खरबुजाच्या लागवडीचा जिल्ह्यातील हा त्यांचा पहिलाच प्रयोग होता. खरबुजाची जिल्ह्यात प्रथमच लागवड असल्याने मालवण पंचायत समितीच्या कृषी विभागाची सावंत यांनी लागवडीसाठी मदत घेतली. येथील कृषी विस्तार अधिकारी मदने यांनी खरबुजाच्या लागवडीसाठी सावंत यांना आधुनिक तंत्रज्ञानाविषयी मार्गदर्शन केले. 
खरबुजाची लागवड करताना श्री.सावंत यांनी सुरूवातीला सर्व जमीन तयार करून घेतली. त्यानंतर खरबुजाच्या कुंदन वाणाची लागवडीसाठी निवड केली. या बियांवर बीजप्रक्रिया करण्यात आली. जमीन तयार करताना ठिबक सिंचनचे पाईप व मल्चिंग पेपर जमिनीवर अंथरून बियाणे लावण्यात आले. खरबुजासाठी लिक्विड फर्टीलायझर ठिबकच्या साहाय्याने खताचे चार डोस झाडाच्या वेगवेगळ्या अवस्थेमध्ये आवश्यकतेनुसार घेण्यात आले. मल्चिंग पेपरचा वापर केल्यामुळे वातावरणात थंडीचे प्रमाण असले तरीही खरबुजाच्या बियाण्यांच्या उगवण क्षमतेवर कोणताही परिणाम झाला नाही. प्लॅस्टीक मल्चिंग पेपरमुळे मुख्य पिकांमध्ये तण उगवले नाही.

सिंचनासाठी ठिबक पद्धतीचा वापर केल्यामुळे खरबुजाच्या रोपांना योग्य प्रमाणात पाणी मिळाले व ठिबकमुळे पाणी आणि पाण्यांवर होणारा खर्चही कमी झाला. ठिबकमधून लिक्विड पद्धतीने खतांचा वापर केल्यामुळे खरबुजांच्या रोपांना योग्य प्रमाणात खत मिळाले. याचा परिणामही उत्पादनावरही दिसून आला. खरबुजाच्या वेलींची पूर्ण वाढ झाल्यानंतर प्रत्येक वेलीला चारच फळे ठेवण्यात आली. यामुळे काढतेवेळी प्रत्येक फळाचे वजन सरासरी दीड किलोचे भरले. 

फळांची पूर्ण वाढ होईपर्यंत कीड रोगांपासून बचाव करण्यासाठी कीटकनाशकांच्या दोन फवारण्या करण्यात आल्या. मात्र खरबुजांचे पीक काढण्याच्या शेवटच्या टप्प्यात असताना केवडा या रोगाचा प्रादुर्भाव दिसून आला. यामुळे सावंत यांच्या बागेतील खरबुजाच्या उत्पादनात थोड्या प्रमाणात घट दिसून आली. ज्या ठिकाणी साडेचार ते पाच टन पीक उत्पादन अपेक्षित होते. त्या ठिकाणी खरबुजाचे तीन टन उत्पादन मिळाले. या तीन टन खरबुजापैकी अडीच टन खरबूज १८ रूपये किलो या दराने गोव्यातील व्यापाऱ्यांनी जागेवर येऊन खरेदी केले. उर्वरीत फळांची विक्री सावंत यांना मालवण येथील स्थानिक बाजारामध्ये करावी लागली. 

खरबुजाच्या लागवडीसाठी सावंत यांना ड्रिप व मल्चिंग पेपर यासाठी मिळून सुमारे ३६ हजार रूपये एवढा खर्च आला. याच शेतीमध्ये श्री.सावंत हे कलिंगड लागवड करणार असल्यामुळे मल्चिंग पेपर व ठिबकचा खर्च वाचणार आहे. खरबुजाचे उत्पादन घेण्यासाठी सावंत यांना ७० दिवसांचा कालावधी लागला. चाकोरीबाहेर जाऊन सावंत यांनी मेहनत आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोरावर खरबुजाची शेती यशस्वी करून दाखविली आहे. परिसरातील शेतकऱ्यांसाठी ही शेती मार्गदर्शक ठरत आहे.

No comments:

Post a Comment