Pages

Thursday, January 27, 2011

कृषी विद्यापीठातील संशोधन स्पर्धात्मक आहे का ?

कृषी विद्यापीठे ही पांढरे हत्ती झाली आहेत इथपासून ते कृषी विद्यापीठे आता शेतकऱ्याच्या बांधावर इथपर्यंत घोषणा आपण ऐकल्या आहेत. कृषिप्रधान असलेल्या आपल्या देशात व विशेष म्हणजे महाराष्ट्रात अशी कृषी विद्यापीठे काय करतात व त्याचा लाभ कितपत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला याचा शोध घ्यावा लागेल. हे खरे असले तरी कृषी विद्यापीठे व तेथील संशोधकांनी केलेले काम दुर्लक्षित करताही येणार नाही. वस्तुत: कृषी विद्यापीठांचे काम, तेथील संशोधन अजूनही पुरेशा प्रमाणात शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही. त्यासाठी स्वतंत्र यंत्रणाही नाही. विशेष खेदाची बाब म्हणजे अशी काही व्यवस्था करण्याची गरज आहे, हाच मुद्दा मुळात दुर्लक्षित राहिला. जे शेतकरी कृषी विद्यापीठाच्या संपर्कात आले, त्यांना हवी ती माहिती मिळते. बाकीचे शेतकरी कोरडेच. म्हणजे शेतकरी कृषी विद्यापीठाकडे आला तर त्याला माहिती मिळते. असे शेतकरी थोडकेच असतात, हे वेगळे सांगायला नको. खेडय़ापाडय़ात राहणाऱ्या शेतकऱ्याच्या हातात जे बियाणे पडते, त्याचे मूळ कृषी संशोधकांपर्यंत पोहोचते. या संशोधनाचे महत्त्व अनन्यसाधारणच आहे. ते केवळ शेतकऱ्यांसाठी नव्हे तर मानवसमाजासाठी ते महत्त्व तितकेच असाधारण आहे. राहुरीच्या कृषी विद्यापीठात कोणीही जाऊन तेथील रानटी तुरीची संवर्धित झाडे पाहावी. सात-आठ प्रकारच्या या रानतुरी पाहून कोणी तुरीच्या डाळीचे वरण खाण्याचेही मनात आणणार नाही. याच मूळ वाणांच्या आधाराने संकर करून नवनव्या तुरीच्या वाणांची निर्मिती केली जाते. हे सारं लक्षात घेतल्यावर कृषी संशोधकांचे महत्त्व कमी लेखता येणार नाही, हे स्पष्ट आहे. या दृष्टिकोनातून पाहिले तर अनेक गोष्टींच्या मुळाशी आपल्याला जाता येते.
मध्यंतरी पुण्याच्या माहिती विभागाने राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा अभ्यासदौरा आयोजित केला होता. या कृषी विद्यापीठाचे काम मोठे आहे, यात शंका नाही. तब्बल आठ हजार एकराचा विस्तार घेतलेले हे विद्यापीठ वेगवेगळय़ा पातळय़ांवर काम करते आहे. अगदी घरगुती वाटाव्यात अशा काही अडचणी असल्या तरी आपण घरात जशी अडचण सोडवतो, तशाच पद्धतीने अडचणीतून मार्ग काढताना तेथे संशोधकही मागे राहात नाहीत, याचे अप्रूप वाटावे.

No comments:

Post a Comment