Pages

Wednesday, February 16, 2011

कशी रोखली गेली चिनी कांद्याची घुसखोरी!

विविध चिनी वस्तुंनी देशातील बाजारपेठा सजल्या असताना अलिकडेच त्यात ‘महाकाय’ कांद्याची देखील भर पडली असली तरी तो डोळ्यात अश्रु आणण्याइतपत तिखट नसल्याने त्याची भुरळ भारतीय खवय्यांना पडू शकली नसल्याचे पुढे आले आहे. देशी कांद्याच्या तुलनेत आकाराने जवळपास दुप्पट असणाऱ्या चिनी कांद्याचा ‘जायका’ भारतीयांना पसंत न पडल्याने अखेर राष्ट्रीय फलोत्पादन संशोधन व विकास प्रतिष्ठानने त्याचे स्थानिक पातळीवर उत्पादन करण्यासाठी हाती घेतलेली संशोधन प्रक्रिया गुंडाळली आहे.यानिमित्ताने किमान कांद्यापुरती का होईना, भारतीय भूमीत चीनची होणारी घुसखोरी रोखली गेल्याची चर्चा स्थानिक उत्पादकांमध्ये रंगली आहे.
जागतिक बाजारातील नेमक्या गरजा लक्षात घेऊन त्या दृष्टीने नियोजन करण्यात वाकब्गार असणाऱ्या चीनने दोन महिन्यांपूर्वी भारतात निर्माण झालेल्या टंचाईच्या पाश्र्वभूमीवर, आपल्या कांद्याचे मार्केटींग करण्याचा प्रयत्न केला होता. भारतीय कांद्याच्या तुलनेत आकाराने भलामोठा दिसणारा अन् रंगातही वेगळेपण अधोरेखीत करणाऱ्या चिनी कांद्याचे जेव्हा मुंबईच्या बाजारात आगमन झाले, तेव्हा भल्याभल्यांचे लक्ष वेधले गेले. कांदा उत्पादनात वेगवेगळे प्रयोग करणारी नाशिकस्थीत राष्ट्रीय फलोत्पादन संशोधन व विकास प्रतिष्ठान संस्थाही त्यास अपवाद राहिली नाही. उलट आकारमानामुळे जादा उत्पादनाची शाश्वती देणारा कांदा स्थानिक पातळीवर कसा उत्पादीत करता येईल, याचे संशोधन करण्याकडे संस्थेने लक्ष केंद्रीत केले होते. परंतु, वेगवेगळ्या कारणांमुळे प्राथमिक टप्प्यात हा विचार सोडून द्यावा लागल्याची माहिती प्रतिष्ठानचे संचालक आर. पी. गुप्ता यांनी ‘लोकसत्ता’ला दिली. या कांद्याचे उत्पादन स्थानिक पातळीवर शक्य असले तरी त्याचे बीज केवळ थंड प्रदेशातील हवामानात तयार होवू शकते. त्याकरिता दिवसातील १४ ते १५ तास सूर्यप्रकाशाची गरज भासते. यामुळे जम्मू काश्मीर सारख्या थंड प्रदेशात प्रथम बीज तयार करून ते महाराष्ट्रात लागवडीसाठी आणावे लागेल. ही बाब आर्थिकदृष्टय़ा किफायतशीर ठरणार नाही. शिवाय, फारसा स्वाद नसलेल्या चिनी कांद्यास पुरेसे ग्राहक नसल्याने इतका ‘द्राविडी प्राणायाम’ करून फारसे काही साध्य होणार नसल्याचा निष्कर्ष फलोत्पादन प्रतिष्ठानने काढला आहे.
स्थानिक बाजारात दाखल झालेल्या चिनी कांद्याविषयी बरीच चर्चा झाली असली तरी त्यास ग्राहकांचा प्रतिसाद मिळू शकला नाही. त्याची सौम्य चव हे त्यामागील प्रमुख कारण असल्याचे गुप्ता यांनी नमूद केले. भारतीय कांद्याप्रमाणे तो तिखट नसल्याने स्थानिक पातळीवर उत्पादन घेतले तरी ग्राहक लाभणे अवघड आहे. यामुळे प्रतिष्ठानने चिनी कांद्याच्या संशोधनास पूर्णविराम दिला आहे. दुसरीकडे पाकिस्तानी कांद्याचे नमुने तपासून ते त्रयस्थ देशातील बीजाचा वापर करत आहेत काय, याची छाननी सध्या प्रतिष्ठान करत आहे.

आभार-लोकसत्ता. 

No comments:

Post a Comment