Pages

Wednesday, February 16, 2011

द्राक्ष बागेतल्या आंतरपिकातून कमाई.




सांगली जिल्ह्यातला वाळवा तालुका बागायत पिकांसाठी राज्यात प्रसिद्ध आहे. या तालुक्याचे वैशिष्ठ्य म्हणजे येथे अनेक अभ्यासू शेतकरी आपल्या छोटय़ाशा जमिनीत अनेक छोटे-मोठे प्रयोग करीत असतात. अशाच कष्टाळू शेतकर्‍यांमध्ये जालिंदर जमादार यांचा समावेश होतो. आपल्या केवळ अर्धा एकर जमिनीवर अधिक पिकाचा ताण येत असतानासुद्धा त्यांनी प्रयासाने आतरपीक घेऊन आपल्या शेतकरी मित्रांसमोर एक आदर्श ठेवला आहे.

याबाबत माहिती देताना श्री. जमादार म्हणाले, आपल्या द्राक्ष बागेत आंतरपीक घेण्याचे मी ठरवताच, माझ्या मित्रांनी, नातलगांनी याबाबत मला प्रोत्साहनच दिले. माझ्या बागेसाठी ढबू व लवंगी मिरचीची उच्च प्रतिची रोपे मी आणली. प्रत्येकी १० गुंठय़ामध्ये मी ढबू आणि लवंगीची लागवड केली आणि मग द्राक्ष व या रोपांसाठी मी ठिबक सिंचनाची व्यवस्था केली. २०१० मध्ये जूनच्या शेवटच्या आठवडय़ात ही सर्व लागवड मी केली.

आंतरपीक घेताना वेगवेगळे खत देण्याचे प्रयोग मी केले. सर्वप्रथम शेण व मलमूत्र आणि फॉस्फेटची अर्धा लिटर आळवणी घालून नियोजनानुसार पाणी, खते आणि औषधांचा वापर केला. त्यामुळे रोपांची चांगलीच वाढ झाली. या बरोबर डीएपी/एमओपी/युरिया/१०:२६:२६, १०:२०:२० नर्मदा कॅन, करंजी व लिंबोळी पेंडेचीही मात्रा दिली. ही खते देत असताना रिंग पद्धतीचा वापर करुन प्रत्येकी चार दिवस दोन तास भरपूर पाणी दिले.

या सर्वांचा परिणाम आता दृष्टीस पडतो आहे. या महिनाअखेर ढबूचे मी दहा टन तर लवंगीचे सात टन उत्पन्न घेतले आहे. माझी ही ढबू व लवंगी मिरची पुण्या-मुंबईला जात आहे. ढबूला २०० रुपये तर लवंगीला १५० रुपये प्रती १० किलो भाव मिळत आहे. आता दुसर्‍या २० गुंठय़ामध्ये आपण कोबीची याच तर्‍हेने लागवड केली असल्याचे त्यांनी आवर्जुन सांगितले.

आताचे हे हवामान शेतीला पोषक नाही. आपल्या द्राक्षबागेची जोपासना हवामानाचा अंदाज घेऊन मी करत आलो आहे. सध्या आकाशवाणी, दूरदर्शन तसेच मोबाईलवर येणारे एसएमएस पाहून त्याप्रमाणे मी उपाययोजना करत असतो. गेली तीस वर्षे द्राक्षबागेचा प्रयोग आपण करत आहोत. या अनुभवाचा उपयोग केल्याने माझ्या बागेवर अवकाळी पावसाचा परिणाम झाला नाही. हवामानाचा अंदाज घेत सर्व कामे आपण वेळीच केली. थंडीचे वातावरण असूनही कोणताही रोग अथवा प्रादूर्भाव आपल्या बागेवर झाला नाही, असे त्यांनी आत्मविश्वासाने सांगितले.

मिरचीचे विक्रमी उत्पन्न घेऊनही द्राक्षाच्या उत्पन्नावर कोणताही परिणाम झालेला नाही, याची खात्री त्यांची बाग पहात असताना येत होती. एका वेलीवर २५ ते ३० घड लटकताना दिसत होते. फळांचा आकारही चांगलाच दिसत होता. स्वत: जमादार हे मजुरांबरोबर शेतात उन्हामध्ये राबत असतात. पोटच्या मुलाप्रमाणे या बागेची काळजी त्यांनी घेतली आहे. त्यांच्या या प्रयोगाची दखल कृषी विभाग, प्रगतीशील शेतकरी, कृषी शास्त्रज्ञ यांनी घेतली आहे. 'अधिक धान्य पिकवा' अशा घोषणा देताना श्री. जमादारांचा हा प्रयोग आपणाला बरेच काही सांगून जातो.



'महान्यूज'

No comments:

Post a Comment