Pages

Tuesday, July 19, 2011

महा-रेन प्रणाली




दैनंदिन पर्जन्यमानाची मोजणी ही अत्यंत क्लिष्ट व वेळखाऊ प्रक्रिया आहे. या प्रक्रियेसाठी अतिरिक्त मनुष्यबळ व वेळही अधिक लागतो आणि चूकाही होऊ शकतात. मानवी चुका व वेळ वाचविण्यासाठी महा-रेन या संकेतस्थळाची निर्मिती ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी ए.एल.ज-हाड यांच्या मार्गदर्शनाखाली मॅग्नम ओपस यांच्या तांत्रिक सहकार्याने करण्यात आली आहे. या संकेतस्थळाच्या नाविण्यपूर्ण निर्मितीमध्ये ठाणे जिल्हयाने राज्यात प्रथम मान मिळविला आहे.

पावसाच्या आकडेवारीचा उपयोग विविध योजना राबविण्यासाठी, सांख्यिकीय माहितीसाठी तसेच आपत्ती व्यवस्थापनाच्या धोरण अंमलबजावणीसाठी केला जातो. कृषि आणि तत्सम क्षेत्रासाठी जेथे पीक पध्दती पावसावर अवलंबून आहे तेथे ही आकडेवारी अत्यंत उपयुक्त ठरते. म्हणून पर्जन्यमानाची आकडेवारी अचूक असणे आवश्यक आहे. यावर उपाय योजना करण्याच्या उद्देशाने नवीन संकेतस्थळ निर्मितीची संकल्पना पुढे आली आणि ती साकारही झाली. संकेतस्थळाचा शुभारंभ राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे हस्ते मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानात नुकताच करण्यात आला. 


ठाणे जिल्हयातील सर्व तहसिलदारांकडून केवळ एक एसएमएसद्वारे दररोज पर्जन्यविषयक माहिती पर्जन्य मोजणीकरीता घेतली जातो. त्याद्वारे जिल्हयाच्या पावसाची सरसरी आकडेवारी तयार केली जाते. ही आकडेवारी जिल्हा, विभाग व राज्य स्तरावरील संबंधित आधिका-यांना महा-रेन या संकेतस्थळावर ऑनलाईन पाहता येते. त्याचबरोबर ही माहिती संबंधिताना ई-मेल व एसएमएस द्वारे पाठविता येते. केवळ एक एसएमएस तहसिलदारांनी पाठविल्यानंतर सर्व अहवाल महा-रेन सॉफ्टवेअर प्रणाली तयार करते. हे या महा-रेन प्रणालीचे मुख्य वैशिष्ट आहे. ही प्रणाली राज्यस्तरावर स्विकारली गेली, तर मंत्रालयात सकाळी ९ वाजेपर्यंत राज्यातील सर्व तालुक्यातील माहिती उपलब्ध होईल तसेच जनतेलाही या माहितीचा उपयोग होणार आहे.

सध्या पावसाची आकडेवारी सर्व तहसिलदार दररोज दूरध्वनी, फॅक्स, ई-मेल आदी माध्यमाद्वारे जिल्हाधिकारी नियंत्रण कक्षाला कळवित असतात ही माहिती कित्येक वेळा वेळेत येत नाही. त्यामुळे जिल्हयाच्या पावसाची सरासरी गणना करण्यास वेळ लागतो त्यामुळे वरिष्ठ कार्यालयांना अहवाल देताना विलंबही होतो. या सर्व बाबी विचारात घेवून यावर मात करण्यासाठी ई-प्रशासन व गतीमान प्रशासन याचा एकत्रित वापर करुन महा-रेन निर्मिती जिल्हाधिकारी ठाणे व मॅग्नम ओपस यांच्या तांत्रिक सहकार्याने तयार केलेली आहे. 

तहसिलदार कार्यालया तर्फे दररोज सकाळी ८.०० वाजता फक्त एक एसएमएस पाठवायचा असतो तो एसएमएस प्राप्त होताच उर्वरित सर्व कामे ही प्रणाली करते त्यामुळे अनावश्यक दूरध्वनी, फॅक्स खर्च व कर्मचा-यांचा वेळ ही वाचू शकतो प्रणालीमुळे पारदर्शकता वाढते चुका टळतात आणि वेळेत माहिती व अहवाल मिळतो.

संकेतस्थळावर तात्काळ माहिती उपलब्ध झाल्याने समाजातील सर्व घटकांबरोबर प्रसारमाध्यमांना शेतक-यांना आपत्ती व्यवस्थापन अधिका-यांना सर्व संबंधित शासकीय कर्मचारी, कार्यालयांनाही महत्वाची माहिती लगेच व बिनचूक उपलब्ध होऊ शकते. या संकलित माहितीचा अभ्यास करुन योग्य निर्णय घेणे व सूचना देणेही सुलभ होते अशी ही महा-रेन प्रणाली सर्वांना उपयुक्त आहे. 

No comments:

Post a Comment