Pages

Friday, July 22, 2011

यंदा अन्नधान्याचं रेकॉर्डब्रेक उत्पादन होणार

2010-11 या संपलेल्या आर्थिक वर्षात भारतात अन्नधान्याचं सर्वाधिक उत्पन्न घेण्यात आलंय. 2010-11 म्हणजे सरलेल्या वर्षातले कृषि उत्पादनाचे आकडे हे आजपर्यंतचे सर्वाधिक आहेत. यावर्षी 241.56 दशलक्ष टन एवढी अन्नधान्याचं उत्पादन घेण्यात शेतकरी यशस्वी झालेत. यामध्ये गव्हाचं उत्पादन हे तर रेकॉर्डब्रेक म्हणजे 85.93 दशलक्ष टन तर डाळीचं आजवरचं सर्वाधिक म्हणजे 18.09 दशलक्ष मेट्रिक टन झालंय.    

केंद्रीय कृषि सचिव पी.के. बसू यांनी कृषि उत्पादनाचे हे आकडे जाहीर करताना भारतीय शेतकऱ्यांनी उत्पादनवाढीची ही कमाल चांगला मान्सून आणि शेतीमालाच्या आधारभूत किमतीत वाढ केल्यामुळे झाल्याचा दावा केला. त्यांच्यामते चांगला मान्सून आणि एमएसपीच्या वाढवलेल्या किंमती यामुळे अनेक शेतकऱ्यांनी यावेळी भरपूर कष्ट करून चांगलं उत्पादन घेतलं. चांगल्या उत्पादनवाढीसाठी पाऊस आणि शेतकऱ्यांचे कष्ट सर्वाधिक महत्वाचं कारण ठरलं असलं तरी सरकारने अपेक्षेप्रमाणेच त्यामध्ये एमएसपी, शेतीसंदर्भातली सरकारची धोरणं याचाही वाटा असल्याचं सांगून स्वतःची पाठ थोपटून घेतलीय. डाळ आणि तेलबियांच्या रेकॉर्ड उत्पादनामुळे यावर्षी भारताला कमीतकमी खाद्यतेल आयात करावं लागेल, अशी आशाही बसू यांनी व्यक्त केली,     
crop
crop
toor dal
toor dal
पूर्व भारतातल्या तब्बल 90 पेक्षाही जास्त जिल्ह्यांमध्ये यावर्षी दुष्काळ असतानाही अन्नधान्याचं अवाढव्य उत्पादन घेणं शक्य झाल्याचा दावा केंद्रीय कृषि सचिवांनी केला. त्याशिवाय गुजरात आणि आंध्र प्रदेशात अतिरिक्त पावसामुळे पिकांचं नुकसान झालं, तर काही भादात किडीच्या प्रादुर्भावामुळे उत्पादनात मोठी घट झाली. म्हणजे अनेक संकटाचा सामना करूनही रेकॉर्ड ब्रेक उत्पादन भारतीय शेतकरी घेऊ शकतो, असं कृषि मंत्रालयातर्फे स्पष्ट करण्यात आलं. 2020 साठी भारताचं कृषि उत्पादन हे 280 दशलक्ष टन असायला हवं, अशी अपेक्षा पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी अलीकडेच व्यक्त केली होती. आताच्या गतीने शेतकऱ्यांनी अन्नधान्याचं उत्पादन घेतलं तर 2020 पूर्वीच आपण 280 दशलक्ष टनाचं उद्दीष्ट साध्य करू शकू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 

संपलेल्या वर्षासाठी तांदळाचं उद्दीष्ट 89.09 दशलक्ष टन एवढं उद्दीष्ट होतं, तर झालेलं उत्पादन हे तब्बल  95.32 दशलक्ष टन होतं. यामुळे आता तांदळाच्या उद्दीष्टात वाढ करून 102 दशलक्ष टन एवढं करण्यात आलंय. 

याबरोबरच ऊस, कापूस, सोयाबिन यांच्या उत्पादनातही यावर्षी भरीव वाढ झालीय.

2009-2010 साली खरीप आणि रब्बी मिळून झालेलं कृषि उत्पादन 218.11 दशलक्ष टन होतं. तर आजवर झालेलं सर्वाधिक उत्पादन 2008-2009 साली म्हणजेच 234.47 दशलक्ष टन होतं. तो विक्रमही यावर्षीच्या अन्नधान्य उत्पादनाने मोडीत निघालाय.

निसर्गाची कृपादृष्टी आणि शेतकऱ्यांचे कष्ट यामुळे यावर्षी रेकॉर्डब्रेक अन्नधान्य उक्पादन झालं असलं तरी आपल्याकडे साठवणुकीचा प्रश्न आजही बिकट आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात झालेलं उत्पादन साठवायचं कोठे ही सरकारपुढील सर्वात मोठी समस्या आहे, कारण गेल्या वर्षातल्या अन्नधान्याच्या उत्पादनामुळे सरकारची धान्य कोठारे भरून वाहत आहेत. अनेक ठिकाणी पुरेशी जागा नसल्यामुळे उघड्यावर ठेवावं लागतंय.

यामुळे एक सरकारी मंत्रालय अन्नधान्य उत्पादनातल्या वाढीमुळे आनंदात असलं तरी दुसरा विभागाची चिंता मात्र या रेकॉर्डब्रेक उत्पादनामुळे वाढलीय.

No comments:

Post a Comment