Pages

Thursday, October 6, 2011

जलसंधारणामुळे लोधवड्यात पाणीच पाणी


केवळ अभियानांमध्ये क्रमांक मिळविण्यापेक्षा गावाच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटविण्यासाठी केलेले श्रम आता फलदायी ठरल्याचे समाधान लोधवडेकरांच्या चेहऱ्यावर पाहावयास मिळत आहे. यंदा माणमध्ये पावसाने हुलकावणी दिल्याने भविष्यात पाणीटंचाईची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. मात्र, जलसंधारणांच्या कामांमुळे लोधवडे परिसरात पाण्याची चिंताच उरलेली नाही.

उन्हाळ्यात लोधवडेकरांच्या पाण्यासाठी टँकरची प्रतीक्षा करावी लागत असे, ही स्थिती बदलायला हवी हे समजत होते, पण त्यासाठी काय करावे हेच गावकऱ्यांना उमजत नव्हते. याच दरम्यान गावचे सुपुत्र व सध्याचे कृषि सचिव प्रभाकर देशमुख यांच्या प्रयत्नातून इंडोजर्मन प्रकल्पाचे फादर रॉबर्ट डिकोस्टा यांनी गावाला भेट दिली आणि लोधवडेकरांच्या भाग्योदयास सुरवात झाली. या प्रकल्पाची सुरवात गावात करण्यात आल्याने अनेकांना रोजगराही मिळाला. सुरवातीला लोकांनी श्रमदानातून काम करून इंडोजर्मनच्या परीक्षेत ग्रामस्थांनी बाजी मारली.

लोकांमधील एकजूट व श्रमाची तयारी पाहून पुणे येथील सर्वांगीण व अधिवासी विकास संस्थेच्या माध्यमातून स्वित्झर्लंडमधील रोनाल्ड फूटिंग यांनी गावाच्या विकासाला हातभार लावला. या संस्थेच्या माध्यमातून गावालगतच्या डोंगर परिसरात जलसंधारणांचीही कामे करण्यात आली आहेत. डोंगर उतारावरील सुमारे १५० हेक्टर क्षेत्रात समतल चरी खोदण्यात आल्या आहेत, तसेच डोंगर माथ्यावर एक मीटर रुंद व खोली असलेला १३ हजार मीटरचा वॅट खोदण्यात आला आहे. यामध्ये वर्षभरात सुमारे ७.५० लाख लिटर पाणीसाठी होण्याची क्षमता आहे. समतल चरींलगतच वृक्ष लागवडही करण्यात आली आहे. याशिवाय गतिमान पाणलोट कार्यक्रमांतर्गतही सीताफळ, आवळा, चिंच, काशीद, खैर,लिंब,ग्रिडिशियल आदी सुमारे दोन लाखांहून अधिक झाडांची लागवड करण्यात आली आहे.

गावात ४९३ हेक्टर क्षेत्रात बांध बंदिस्त करण्यात आले आहेत. याशिवाय लोकसहभागातून व श्रमदानातून तीन गॅब्रियन बंधारे व एक भूमिगत बंधारा बांधण्यात आला आहे. तसेच गावालगत २८ नालाबंडिंग, दोन शेततळी, ६० अनगड बांध, ४४ लहान नालाबांध व २४ ओघळ नियंत्रण कट्टे बांधण्यात आले आहेत. गावालगत पाटबंधारे विभागाचा एक तलाव असून, दोन मोठे पाझर तलावही आहेत. त्यामुळे गावालगतच्या सर्वच भागांत पाण्याचा साठा होण्यास मदत झाली आहे.

मूलस्थानी मृद व जलसंधारण अभियानातही लोधवड्याने अव्वल क्रमांक मिळविला आहे. या अभियानाद्वारेही काम करण्यात आल्याने शेतकऱ्यांना भरीव मदत झाली आहे. गावाच्या एकूण १२३३ हेक्टर क्षेत्रामध्ये विविध योजनांच्या माध्यमातून जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात झाल्याने परिसरात सुमारे ४० कोटी ३८ लाख लिटर पाण्याचा साठा करण्यात ग्रामस्थांनी यश मिळविले आहे.

No comments:

Post a Comment