Pages

Friday, November 4, 2011

मोफत मत्स्यबीज योजनेमुळे शेतकऱ्यांना दिलासा

म्हसळा तालुक्यात शेतकरी सल्ला समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांशी सल्ला मसलत करुन विविध उपक्रम राबविले जातात. या वर्षी तालुक्यात महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत खोदलेल्या शेततळ्यांना मोफत मत्स्यबीज देऊन शेतकऱ्यांना मदत करण्याचा अनोखा उपक्रम तालुक्यात केला.

हवामानामध्ये सातत्याने होणारे फेरबदल लक्षात घेऊन खरीप हंगामातील भातशेतीसोबतच अन्य शेतीपूरक व्यवसाय करुन शेतकऱ्यांना आर्थिक उत्पन्न मिळण्यासाठी तालुका कृषिविभागामार्फत सातत्याने मार्गदर्शन करण्यात येते. त्याचाच भाग म्हणून महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत १३ शेततळी पूर्ण करण्यात आली आहेत.

तालुक्यातील शेअर या सेवाभावी संस्थेने या शेतकऱ्यांना मदतीचा हात देऊन ७० अनुदानावर शेततळ्यासाठी उच्च प्रतीच्या प्लॅस्टिकने अस्तरीकरण केले आहे. आत्मा योजने अंतर्गत तालुक्यातील खामगाव येथील ५, लेप ३, मोरवणे २ तर फळसर, कुडतोडी व सकलप येथील प्रत्येकी १ अशा १३ शेतकऱ्यांना रोहू व कटला या मत्स्यजातीचे बीज नुकतेच वाटण्यात आले आहे.

मांदाटणे येथील युवा शेतकरी चंद्रकांत पवार यांच्या शेततळ्याचे जलपूजन करुन त्यात मत्स्यबीज सोडून उपस्थित शेतकऱ्यांना प्रात्यक्षिक करुन दाखविण्यात आले. तालुक्यात शेतकरी सल्ला समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या (आत्मा) कार्यक्रमाअंतर्गत भातपिक लागवड, मत्स्यपालन, कुक्कुटपालन, मधुमक्षीकापालन, कलिंगड लागवड, भाजीपाला व रोपवाटिका लागवड, शेती शाळा, शेतकऱ्यांसाठी अभ्यास दौरा असे वर्षभरात विविध उपक्रम राबविण्यात येतात, असे तालुका कृषी अधिकारी विठ्ठल सोनावणे यांनी सांगितले.