Pages

Saturday, June 11, 2011

कोल्हापूर जिल्ह्यात शेततळ्यांचे जाळे.




राज्यातील पर्जन्यावर आधारित कोरडवाहू शेतीची जलसिंचन उपलब्धता वाढविण्यासाठी रोजगार हमी योजनेंतर्गत विविध प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. पाणलोट व जलसंवर्धनाच्या माध्यमातून वैयक्तिक लाभार्थी निवडून अनुदान पध्दतीचा अवलंब करुन शासनाने शेततळ्याची योजना सुरु केली. कोल्हापूर जिल्ह्यात शेतकऱ्यांचा शेतीचा प्रश्न सोडविण्याठी शेततळ्यांचे जाळे निर्माण करण्याचा प्रयत्न प्रशासन करीत आहे.

राष्ट्रीय कृषि विकास योजना व महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गंत राबविण्यात येणाऱ्या शेततळी बांधणी कार्यक्रमात कोल्हापूर जिल्ह्यात आतापर्यंत २०७ शेततळी पूर्ण झाली आहेत. यामध्ये सर्वाधिक ५५ तळी कागल तालुक्यात पूर्ण झाली आहेत. तर शाहुवाडी तालुक्यात ५, पन्हाळा १६, हातकणंगले ३, करवीर १३, राधानगरी १६, गगनबावडा ३३, गडहिंग्लज १५, आजरा २५, भुदरगड २०, चंदगड ६ अशी शेततळी पूर्ण झाली आहेत. जिल्ह्यातील आणखी २३२ शेतकऱ्यांचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.

जिल्ह्यात या योजनेसाठी १ हजार २११ शेतकऱ्यांचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. शेतकऱ्यांसाठी शासनाकडून विविध आकाराच्या शेततळ्यांना १६ हजार ५१५ रुपयांपासून ते ८२ हजार २४० रुपयांपर्यंत अनुदान दिले जाते. जिल्ह्यात शेततळ्यांसाठी आतापर्यंत १ कोटी १९ लाख ६० हजार रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आले आहे.

गगनबावडा तालुक्यात २४ लाख ९९ हजार रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आले आहे. शाहुवाडी १ लाख ६४ हजार, पन्हाळा ८ लाख ८८ हजार, हातकणंगले १ लाख ८२ हजार, करवीर ७ लाख ५८ हजार, कागल २३ लाख ९६ हजार, राधानगरी १० लाख ५८ हजार, गडहिंग्लज ६ लाख ५४ हजार, आजरा १४ लाख ५६ हजार, भुदरगड १५ लाख ३२ हजार, चंदगड ३ लाख ७३ हजार रुपयांच्या अनुदानाचे वाटप करण्यात आले आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी कमीत कमी ०.६० हेक्टर जमीन, विहीर नसलेली जमीन, रोजगार हमी योजनेंतर्गत कुटुंबाची नोंदणी आदी अटी आहेत. जलसिंचन उपलब्धता वाढविण्यासाठी शंभर टक्के अनुदानावर ही योजना राबविण्यात येत आहे. शेततळ्यांच्या माध्यमातून जलसिंचन उपलब्धता वाढविण्यात कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी प्रयत्न करीत असल्याने भविष्यात कोरडवाहू शेतीसाठी पाणी उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. 

No comments:

Post a Comment