Pages

Thursday, June 16, 2011

सांगलीच्या पानाला मुंबईत मागणी.




सांगली जिल्ह्यातील चिकुर्डे गावचे अनिल व दिलीप खांबे या दोघा बंधुंनी एक नवा आदर्श घालून दिला आहे. तरुणांनी व्यावसायिक शेती कशी करावी याचे हे उत्तम उदाहरण म्हणता येईल. केवळ तीस गुंठा जमिनीवर त्यांनी आपला हा पानमळा फुलविला आहे. माल नसतानाही आपल्या एका जीवलग मित्राचा सल्ला घेऊन त्यांनी हा पानमळा फुलवला आहे. आपल्या गावातील अन्य शेतकरीही सुखाने नांदावा यासाठी ते प्रयत्न करीत आहेत.

मजुरांच्या कमतरतेमुळे अलिकडे पानमळे कमी होत चालले आहेत. अशाही परिस्थितीत केवळ नोकरीच्या मागे न लागता कायमस्वरुपी उत्पन्न देणारे पीक घ्यावे या उद्देशाने चिकुर्डे येथील या युवकांनी माळरानावर ३० गुंठ्यात पानमळा घेऊन दरवर्षी चार लाखांहून अधिक उत्पन्न घेण्याचा विक्रम केला. त्यांच्या पानाला येथील पाणी व जमिनीच्या कसामुळे एक वेगळी चव आहे. यामुळे पुण्या- मुंबईतील बाजारपेठेत त्यांच्या पानाला प्रचंड मागणी आहे.

अनिल यशवंत खांबे यांचे केवळ दहावीपर्यंत शिक्षण झाले आहे. शिक्षण घेतलेल्या इतर मुलांची होत असलेली परवड पाहून नोकरीच्या मागे न लागता आपले बंधू दिलीप खांबे यांच्याबरोबर शेती करण्याचे ठरवून आपल्या माळरान जमिनीवर सुरुवातीला टोमॅटोचे उत्पन्न घेतले. परंतु हे उत्पन्न केवळ तीन महिनेच मिळू शकते. यामुळे नजीकच्या गावचे बाळासाहेब पाटील यांचा सल्ला घेऊन बारमाही उत्पन्न मिळणाऱ्या पानमळ्याची लागवड करण्याचे त्यांनी ठरविले.

श्री. खांबे म्हणाले की, चार वर्षापूर्वी स्नेही बाळासाहेब पाटील यांच्या पानमळ्यातील तीन हजार शेंडे आणून या तीस गुंठ्यात हा पानमळा उभा केला. यासाठी नऊ ट्रॉली शेणखत, तेरा ट्रॉली माती खणून जमिनीत भर घातली. या मळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे कोणतेही रासायनिक खत या पानमळ्यासाठी वापरले नाही त्यामुळे पहिल्या वर्षी जेमतेम उत्पन्न मिळाले. दुसऱ्या वर्षी खर्च वजा जाता गुंठ्याला १५ हजार प्रमाणे जवळ जवळ चार लाखाचे उत्पन्न आम्हाला मिळत आहे. शिवाय पुण्या-मुंबई सारख्या शहरात आमच्या सांगली जिल्ह्याचे पान आवडीने खाल्ले जात आहे याचे समाधान आहे.

बाराही महिने उत्पन्न मिळत असल्याने पानमळा व्यावसायिकदृष्ट्या समाधानकारक आहे. पानमळ्यातून उत्पन्न मिळतेच तसेच यासोबत भाजीपाला व दुग्धव्यवसाय सारखे जोडधंदेही करता येतात. आम्ही येथे केळी, शेवग्याच्या शेंगा यासारख्या भाजीपाल्यापासून उत्पन्न मिळवतो. घरातील जनावरांसाठी वैरणही आम्हाला मिळते.

अशा प्रकारचा फायदा मिळविण्यासाठी शेतकऱ्यांनी पारंपरिक पध्दतीने पिके घेण्याचे सोडून पानमळ्यासारख्या पिकांकडे वळणे आवश्यक आहे, असेही त्यांनी आपल्या शेतकरी बांधवांना सल्ला दिला आहे. एक पानमळा उभारल्यानंतर सात ते आठ वर्षे उत्पन्न घेता येते. दरवर्षी पावसाळ्यात डास, चिलटांचा त्रास होतो. यावेळी एक किटकनाशक फवारावे लागते. वेलीवरती रोगराई होऊ नये म्हणून घरचा उपाय म्हणून मी गोमूत्र फवारतो. सुरुवातीस हा मळा उभारताना जे काही परिश्रम आम्ही घेतले आहे त्याचे आता आम्हाला फळ मिळत आहे. आता पुढील आठ वर्षे आम्ही बाराही महिने उत्पन्न घेऊ. ज्या कोणा तरुणांना व्यावसायिक शेती करावयाची असेल त्यांनी पानमळा सारख्या शेतीकडे वळावे, अशी विनवनीही ते करतात.

No comments:

Post a Comment