शेती व्यवसाय हा पुरूषांपुरता मर्यादित राहिलेला नसून महिलांनीदेखील मातीतून मोती पिकविल्याची अनेक उदाहरणे आहेत. जमिनीची मशागत करण्यापासून कृषी उत्पादनांच्या प्रक्रिया उद्योगापर्यंत महिलांनी झेप घेतली आहे. ग्रामीण भागात रूजलेल्या बचत गट चळवळीच्या माध्यमातून या प्रयत्नांना आणखी बळ मिळाले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात खेड तालुक्यातील जागृती महिला बचत गटाने शेती क्षेत्रातील यशस्वी महिलांकडून प्रेरणा घेऊन भाजीपाला उत्पादनात चांगली प्रगती केली आहे.
महिला आर्थिक विकास महामंडळाच्या सहकार्याने २००४ मध्ये एकत्र येऊन या बचत गटाची स्थापना करण्यात आली. प्राथमिक स्वरुपाची बचत करून महिलांनी गटाच्या कार्याला सुरुवात केली. महिलांनी पारंपरिक व्यवसाय न करता कृषी कार्यावर आधारित भाजीपाला व्यवसाय सुरू करण्याचे निश्चित केले. प्रारंभी परसबागेच्या स्वरुपात या कामाची सुरुवात झाली. नंतरच्या काळात गटाच्या अध्यक्षा दिप्ती उसरे यांनी दिलेल्या एक गुंठा जागेत भाजीपाल्याची लागवड करणे सोईचे झाले. महिलांना २००५ मध्ये शेतीकामासाठी २५ हजारांचे कर्ज मिळाले. त्यातून शेतीची काही साधने खरेदी करण्यात आली.