Wednesday, September 28, 2011

डेरा आंदोलन स्थगित

Dera Protest


कोरडवाहू शेतकरी आणि प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांसाठी आमदार बच्चू कडू यांनी काढलेली अमरावती ते कराड ही यात्रा स्थगित केल्याची घोषणा आमदार बच्चू कडू यांनी केली. ही यात्रा सोमवारी विदर्भ, मराठवाड्यातून पुण्यात दाखल झाली. यावेळी बच्चू कडू, विजय जावंधिया, चंद्रकांत वानखेडे यांची मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, कृषीमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यासह चर्चा झाली.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी बच्चू कडू यांच्या मागण्या लवकरच मान्य होतील असं सांगितलं. बच्चू कडू यांच्या मागण्यांपैकी अनेक मागण्या केंद्र सरकारशी संबंधित आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री याबाबत स्वत: केंद्राकडे पाठपुरावा करणार आहेत. याबाबत एक महिनाभरात योग्य तो निर्णय घेऊ असे मुख्यमंत्र्यांनी आमदार बच्चू कडू यांना सांगितलं. त्यानंतर डेरा आंदोलन स्थगित करत असल्याचे बच्चू कडू यांनी म्हटलं.
या मागण्या महिनाभरात मान्य न झाल्यास पुन्हा आंदोलन करणार असल्याचे बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.
Starmajha.

Tuesday, September 27, 2011

वन हक्कामुळे वन निवासी आर्थिकदृष्ट्या सक्षम


जंगलावर सामुहिक वनहक्क मिळविणाऱ्या गावांना गौण वनउत्पादनाची विक्री करण्याची परवानगी आणि बांबुला गौण वनउपजाचा दर्जा देऊन ग्रामसभेला वाहतुकीचा परवाना बहाल करण्याचा ऐतिहासिक कार्यक्रम २७ मे २०११ रोजी मेंढा (लेखा ) गावात पार पडला. गडचिरोली जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यातील मेंढा लेखा हे गाव बांबुच्या वाहतुकीचा परवाना मिळविणारे देशातील पहिले गाव ठरले आहे.

अनुसूचित जमाती व परंपरागत वन निवासी कायदा २००६ व नियम २००८ अनुसार पिढ्यानपिढ्या जंगलामध्ये राहणाऱ्या अनुसूचित जमाती आणि इतर वननिवासींना केंद्र शासनाच्या वनाधिकार अधिनियमामुळे वैयक्तिक व सामुहिक वनाचा अधिकार मिळाला. मेंढालेखा या गावाला १५ ऑगष्ट २००९ रोजी सामुहिक वनहक्क देण्याची घोषणा करण्यात आली. २८ ऑगष्ट २००९ ला मेंढा (लेखा) गावाला १ हजार ८०९.६१ हेक्टरवर वन जमिनीवर सामुहिक वनहक्क देण्याबाबत स्वाक्षरी करण्यात आली आणि १५ डिसेंबर २००९ रोजी तत्कालीन राज्यपाल एस. जे. जमीर यांचे हस्ते मेंढा ग्रामसभेला अधिकारपत्र देण्यात आले.

Sunday, September 25, 2011

हिंगोलीत एक व्यक्ती दोन झाड उपक्रम


पर्यावरणाच्या संतुलनासाठी शासनाकडून विविध उपक्रम राबविले जातात. पर्यावरण संतुलित ग्राम योजनेला प्रोत्साहन मिळावे यासाठी हिंगोली पंचायत समितीच्यावतीने एक व्यक्ती दोन झाड ही संकल्पना राबविण्यास सुरुवात करण्यात आली आहे. या मोहिमेचा प्रारंभ हिंगोली तालुक्यातील बोरी शिकारी येथे करण्यात आला. ग्रामस्थांनी या योजनेचे स्वागत करुन गावाला समृध्द करण्याचा निश्चय केला आहे.

'जिवंत सात-बारा मोहीम'


सात-बारा' हा शेतक-यांच्या शेतीवरील मालकी आणि हक्काची एक प्रकारची सनदच! हाच 'सात-बारा' शेतक-यांसाठी अतिशय महत्वाचा Property Record ही समजला जातोय.सात-बारा म्हणजे शेतीचं क्षेत्र, पिक,सीमा, शेतीचा मालक याबरोबरच पिक-कर्ज यांची माहिती देणारा शासकीय दस्तावेज....हाच सात-बारा कृषी संस्कृती आणि जीवनाचा अविभाज्य घटकही समजला जातोय. हाच सात-बारा उतारा शेतक-याला अद्ययावत करुन मिळाला तर त्याच्या आनंदाला पारावार उरणार नाही हीच नेमकी गोष्ट हेरुन अकोला जिल्हा महसूल प्रशासनाने जिवंत सात-बारा मोहिमे बरोबरच अभिनव अशी योजना गेल्या १ तारखेपासून सुरु केली आहे. अद्ययावत अभिलेख अधिकार अभियान अकोल्याचे नूतन जिल्हाधिकारी परिमल सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली हे नवीन अभियान हाती घेण्यात आले आहे.

जिथे राबती हात, तेथे श्रीहरी


जिथे राबती हात, तेथे श्रीहरी या विचाराने काळयामातीची सेवा करीत सुधारीत तंत्रज्ञानाचा अवलंब करुन प्रगतीशिल शेतकरी दत्तात्रय गुंडावार यांनी शेटनेट मधून ५५ क्विंटल काकडीचे उत्पन्न घेतले. काकडीच्या उत्पादनातून गुंडावार यांनी खर्च वगळता निव्वळ ८२ हजार रुपये नफा मिळवला आहे. शेतीमध्ये विविध प्रयोगाव्दारे उत्पादन वाढीचा उच्चांक गाठणा-या गुंडावार यांच्या उत्कृष्ठ कामगीरीची दखल स्वयंसेवी संस्थासह शासनाने घेतली आहे. २०१० चा शेतकरी गौरव पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले आहे.

तेंदुपत्ता संकलनात गडचिरोली राज्यात अग्रेसर


जिल्हयातील दुगर्म, अतिदुर्गम भागातील आदिवासी मजुरांसाठी वर्षभराची जमापुंजी मिळवून देणारा रोजगार म्हणून ओळखल्या जाणा-या तेंदुपत्ता संकलनाच्या कामास प्रारंभ झाला आहे. त्यामुळे अनेक बेरोजगाराच्या हाताला काम मिळाले.

यावर्षी एकटया गडचिरोली वनवृत्तातून २ लाख ९७ हजार ७७० स्टॅडर्ड बॅग तेदुपत्ता संकलन करण्यात आले. हंगामी रोजदाराच्या माध्यमातून बेरोजगारांना काम व राज्य शासनाला कोटयावधी रुपयांचा महसूल मिळतो. गावांना आर्थिकदृष्टया सक्षम करण्याच्या उद्देशाने पहिल्यांदा शासनाने यावर्षी तेंदूपत्ता संकलनाचे कंत्राट गावातील ग्रामपंचयातीनाच देण्याचे ठरविले. मात्र त्यानंतर काहीच निर्णय झाला नाही. अखेरीस दरवर्षी प्रमाणे याही वर्षी कंत्राटदाराच्या मार्फतीनेच तेंदूपत्ता संकलनाचे काम करण्यात येईल, असे शासनातर्फे जाहिर करण्यात आले. त्यानंतर तेंदू युनिटची खरेदी केली. त्यानंतर जिल्हयात तेंदूपत्ता संकलनाच्या कामास प्रारंभ करण्यात आला आहे.

Saturday, September 24, 2011

सहकारातून रोजगार


सहकार चळवळीचा विकास पश्चिम महाराष्ट्रात वेगाने झाला. कोकणात मात्र सहकाराचा प्रसार तेवढ्या प्रमाणात झाला नाही. या भागात सहकाराच्या माध्यमातून कोकणातील काजू उत्पादकांना एकत्रित करण्याचा चंग जयवंत विचारे यांनी २००३ मध्ये बांधला. त्यावर्षी काजू उत्पादकांची सहकारी संस्था सुरू करण्यात आली. त्यानंतर सतत सहा वर्ष केलेल्या प्रयत्नांना यश येऊन अखेर रत्नागिरी कृषि प्रक्रिया सहकारी संस्था २००९ मध्ये लांजा तालुक्यातील गवाणे गावात उभी राहिली. या संस्थेच्या माध्यमातून १५० महिलांना रोजगार उपलब्ध झाला आहे.

शेतीशाळा प्रशिक्षणामुळे उत्पादनात वाढ


गडचिरोली जिल्ह्याची दर हेक्टरी भात पिकाची उत्पादकता इतर जिल्ह्याच्या तुलनेत फारच कमी आहे. त्याचे प्रमुख कारण म्हणजे शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड न देता पारंपरिक पध्दतीचा अवलंब करणे होय. या बाबीचा विचार करुन सुधारित लागवड तंत्राचा वापर केल्यास भात पिकाची सरासरी उत्पादकता वाढविण्यास मदत होईल. हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून कृषि विभागामार्फत सन २००९-२०१० या वर्षी आत्मा अंतर्गत भात पिक प्रात्याक्षिकामध्ये चारसुत्री पध्दतीने भात पिकाची लागवड करुन भात पिकाखालील उत्पादन वाढविण्याकरीता काही शेतकऱ्यांच्या शेतावर प्रात्याक्षिके आयोजित करण्यात आली. त्याकरीता कृषी विभागातील कर्मचाऱ्यांनी चांदाळा येथे सभा आयोजित केली. शेतकऱ्यांशी संपर्क करुन त्यांना चारसुत्री पध्दतीने भात पिकांची लागवड कशी करावयाची हे पटवून दिले.

आंतरपिकाने फुलविला शेतमळा


शेतीला लळा लावल्याशिवाय शेतमळा पिकत नाही असे म्हणतात. ही बाब सत्यात उतरवून दाखविली आहे यवतमाळ जिल्ह्यातील मुळावा येथील प्रयोगशील शेतकरी अमोल विजय डुब्बेवार यांनी. जिद्द आणि चिकाटीला श्रमाची जोड देऊन डुब्बेवार यांनी उसात बटाट्याचे आंतरपिक घेउन तीन महिन्यात एकरी ६२ हजार रुपयांचा नफा मिळविला आहे. त्यांच्याकडे ११ एकर जमीन आहे. माळरानाजवळ असलेली त्यांची जमीन प्रथम त्यांनी सपाटीकरण केली व त्यानंतर पाण्याची व्यवस्था करुन घेतली. या शेतीमध्ये ते दरवर्षी वेगवेगळी पिके घेतात.

Sunday, September 18, 2011

कांद्याच्या निर्यातीबाबत मंगळवारी केंद्रीय मंत्रिगटाच्या बैठकीत निर्णय घेणार - केंद्रीय अर्थमंत्री















कांदा पिकाच्या निर्यातीबाबत मंगळवार, दिनांक २० सप्टेंबर रोजी होणाऱ्या केंद्रीय मंत्रिगटाच्या बैठकीत सर्वांशी चर्चा करून योग्य निर्णय घेतला जाईल, असे केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी सांगितले.

केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांच्यासमवेत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राज्यातील कांदा, साखर निर्यात आणि कापूस पिकाच्या दरवाढीमुळे सूत गिरण्यांवर झालेल्या परिणामावर चर्चा करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण बैठक शनिवारी मुंबईतील सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे झाली. या बैठकीत मुख्यमंत्री चव्हाण यांनी राज्यातील कांदा, ऊस आणि कापूस या नगदी पिकांमुळे उद्भवलेल्या परिस्थितीची केंद्रीय अर्थमंत्र्यांना माहिती दिली. या बैठकीस सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ, वन मंत्री डॉ. पंतगराव कदम, कृषी मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, सहकार व पणन मंत्री हर्षवर्धन पाटील, ग्रामविकास मंत्री जयंत पाटील, वस्त्रोद्योग मंत्री नसीम खान, मुख्य सचिव रत्नाकर गायकवाड, कृषी व पणन सचिव डॉ. सुधीरकुमार गोयल, वस्त्रोद्याग प्रधान सचिव सुनील पोरवाल, सहकार सचिव राजगोपाल देवरा व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Tuesday, September 13, 2011

कांद्याच्या निर्यातीवरील बंदी तातडीने उठवावी - छगन भुजबळ



नाशिक व परिसरात मोठ्या प्रमाणात कांदा उपलब्ध असून भाव पडल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवरील बंदी तातडीने उठवावी, देशातील शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी कळकळीची मागणी महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे.

नवी दिल्ली येथे विज्ञान भवनात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या बैठकीसाठी ते आले होते. या बैठकीनंतर त्यांनी पंतप्रधानाचे प्रधान सचिव टी.के.ए.नायर यांची भेट घेतली. यावेळी एक निवेदन त्यांना सादर करण्यात आले असून या प्रकरणात पंतप्रधानांनी तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी त्यांनी केली. नाशिक व परिसरात सध्या कांद्याचे भाव प्रचंड घसरले असून कांदा उत्पादक शेतकरी आंदोलनाच्या भूमिकेत असल्याची माहिती त्यांनी या बैठकीनंतर महाराष्ट्र सदनात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

शेळीपालनातून हजारोची बचत !



धुळे जिल्हयातील साक्री तालुक्यातील छावडी गावात दि. २६ जानेवारी, २००८ रोजी सातपुडा सेवाभावी संस्थेचे पदाधिकारी यांच्या समवेत बैठक घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वयंसहाय्यता महिला बचत गटाची स्थापना केली. ध्येय कसे गाठावे याचे योग्य नियोजन केले. गटाच्या अध्यक्षा म्हणून श्रीमती अंजना किशन पिंपळे व सचिव म्हणून श्रीमती पुनम ओंकार पिंपळे यांची निवड करण्यात आली. स्टेट बँक ऑफ इंडिया, निजामपूर शाखेत गटाच्या नावाने खाते उघडले.

या बचत गटास खेळते भांडवल शासनाने दिलेले अनुदान याचा योग्य तो फायदा उठवत गटाने आपली यशस्वी वाटचाल करण्याचा प्रयत्न चालवला व दिलेले रुपये २५,००० कर्ज फेड वेळीच करत त्यांनी शासनाने दिलेले १ लाख रुपये एवढया रकमेचे अनुदान कायमस्वरुपी खेळते भांडवलाचा फायदा मिळवून घेतला.

रावडीखुर्दच्या शेतकऱ्याने फुलवली फळबाग



सातारा जिल्ह्याच्या फलटण तालुक्यातील रावडी खुर्द येथील गोविंद गणपत रायकर या शेतकऱ्याने ओसाड असणाऱ्या नऊ एकर क्षेत्रात अथक कष्ट, जिद्द आणि कृषी विभागाच्या सहाय्याने फळबाग लागवडीचा यशस्वी प्रयोग करुन अन्य शेतकऱ्यांसमोर नवा आदर्श निर्माण केला आहे.

गोविंद रायकर यांनी रावडी खुर्द येथील त्यांच्या ओसाड शेतील कष्टातून नवनवे प्रयोग करण्याचा संकल्प केला. परंतु थोड्याच दिवसांत त्यांच्या लक्षात आले की, या क्षेत्रात साधे गवतही उगवू शकत नाही, एवढे तेथे चुनखडीचे प्रमाण आहे. माती परीक्षण अहवाल तर हे क्षेत्र पिकविण्यायोग्य नाही असाच होता. त्यानंतर दहा वर्षे हे शेत पडून होते. मात्र, म्हणून हे क्षेत्र पिकविण्याच्या विचारापासून रायकर अजिबात बाजूला गेलेले नव्हते. विविध माध्यमातून या विषयावर संवाद साधत हे क्षेत्र हाताखाली आणण्याची त्यांची धडपड सुरूच होती. त्यातूनच त्यांना ही क्षारपड शेती पिकविण्याची दिशा मिळाली. मात्र हे क्षेत्र हाताखाली आणण्यासाठी त्यांची तीन वर्षे खर्ची पडली. आज अनेक अडचणींवर मात करीत या शेतीत फळपिके उभी केली आहेत व ती चांगल्या स्थितीत आहेत.

Monday, September 12, 2011

पूर्व विदर्भातील गोंडकालीन सिंचन व्यवस्था


नुकताच भंडारा, गोंदिया जिल्हयात बैठकीच्या निमित्ताने जाण्याचा योग आला. पावसाचे दिवस, काठोकाठ भरलेल्या बोडया व तलाव पाहून मन हर्षभरीत झाले. घनदाट जंगलात छोटया, मोठया तलावांना वेढून असलेली वृक्षराजी, उंचच उंच डोंगर पाहून आपण वेगळया प्रदेशात तर नाही ना ? असा भास झाला. मोठया प्रमाणात असलेले तलाव पाहून असे वाटले, या परिसरात तलावांचेच अधिराज्य आहे. नव्हे ते या जिल्हयाचे अनभिषिक्त सम्राट आहे. फार पुर्वी झालेल्या राजांनी आपल्या पाऊलखुणा कायमच्या टिकून राहाव्या म्हणूनच की काय या तालावांची निर्मिती केली. तलावांमुळे जैविक वृक्षराजी जगली. नुसती जगलीच नव्हे तर फुलली. मोठया डोंगरांवर गालिचा सारखी पसरली. या वनराजीत निसर्गावर प्रेम करणारी ग्रामीण जनता, गाई, म्हशी, शेळया, वन्यप्राणी सुखनैव जगत आहे. म्हणूनच नवेगाव बांध परिसराला अतिसंवेदनशील वनपरिसर जाहीर केले आहे. या निमित्ताने तलावांचा इतिहासही माहिती करुन घेता आला.

Wednesday, September 7, 2011

समन्वयीत कृषि विकास प्रकल्प


पावसावर अवलंबितता, अल्प भूजलसंधारण, जमिनीचा घटत चाललेला उपजावूपणा, एक पिक पध्दती, खते व किटकनाशकांचा अतिरीक्त वापर, संकरित बियाणे व प्रतिकुल विपणन पध्दती इ. बाबींमुळे विदर्भातील अकोला, अमरावती, बुलडाणा, वर्धा, वाशीम आणि यवतमाळ या सहा जिल्ह्याची लोकसंख्या सुमारे ११२ लाख असून त्यापैकी ४५ टक्के लोकसंख्या दारिद्र्यरेषेखाली आहे. या जिल्ह्यांमध्ये एकूण १४ लाख शेतकरी असून त्यांची जमीन धारणा सरासरी २.६ हेक्टर आहे. निम्म्यापेक्षा जास्त शेतकरी अत्यल्प अथवा अल्प भूधारक असून त्यांची जमीन धारणा सरासरी २.० हेक्टरपेक्षा कमी आहे. या जिल्ह्यांमधील दारिद्र्यरेषेखाली असलेल्या ग्रामीण लोकसंख्येपैकी दोन तृतियांश लोकसंख्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व इतर मागासवर्ग आहे.यापैकी, योग्य व पुरेशा अन्नपोषणापासून वंचित असलेल्या जनसमुदायाचे प्रमाण अंदाजे २७ टक्के आहे. एकूण दारिद्र्यरेषेखालील कुटुंबापैकी अंदाजे ७५ टक्के भूमीहीन असून अंदाजे १४ टक्के कुटुंबांकडे सरासरी १.० हेक्टरपेक्षा कमी शेतजमीन आहे.

संघर्षाने मिळवली डाळिंबाला बाजारपेठ


सोलापूर जिल्ह्यातील आधुनिक तंत्रज्ञानाला मेहनतीची जोड मिळाल्यानंतर काय किमया होऊ शकते, याची प्रचिती मोहोळ तालुक्यातील वडाचीवाडी येथील विठ्ठल कारंडे या तरुण शेतक-याने डाळिंब शेतीतून दाखवून दिली आहे. सध्या राज्यातील अनेक शेतकरी बाजार पेठेप्रमाणे पीकपध्दतीत बदल करताना दिसत आहेत. विशेषत: डाळिंबासारखे नगदी पीक काही शेतक-यांना खुणावताना दिसत आहे. मात्र, या पिकामध्ये रोगाची समस्या वाढली असल्याने शेतक-यांना बाजारपेठ मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. अर्थात, सर्व समस्यांवर मात करुनही हे पीक यशस्वी करणारे शेतकरीही पाहण्यास मिळतात.

सोलापूर - पुणे राष्ट्रीय महामार्गावर मोहोळ तालुक्यात वडाचीवाडी हे गाव आहे. येथील विठ्ठल कारंडे हे त्यापैकीच एक उदाहरण म्हणावे लागेल. २००४ मध्ये पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यांतर नोकरीपेक्षा घरच्या शेतीलाच त्यांनी पसंती दिली. परंतू तेच तेच करण्यापेक्षा शेतीत नवे काही करण्याची जिद्द त्यांच्यात होती. त्यातूनच त्यांच्या परिसरातील अरण येथील प्रयोगशील शेतकरी हणमंत गाजरे यांची डाळिंबाची शेती त्यांनी पाहिली. प्रयोगासाठी प्रेरणा मिळाली आणि सुरु झाला विठ्ठल यांचा डाळिंब शेतीतील प्रवास. त्यातच सोलापूरच्या कृषि विज्ञान केंद्राच्या शास्त्रज्ञांशी त्यांचा संवाद वाढला. कृषी विज्ञान केंद्राने मध्ये मृग बहार तेल्या रोग व्यवस्थापन अंतर्गत प्रात्यक्षिक घेतले.या प्रात्यक्षिकामध्ये विठ्ठल हे लाभार्थी होते. त्यानंतर केंद्राचे प्रमुख समन्वयक प्रा. लालासाहेब तांबडे, विषय विशेषज्ञ प्रा. सय्यद शाकिर अली, किरण जाधव यांनी त्यांना सातत्याने मार्गदर्शन केले.

भारतीय कृषी संशोधन परिषदेचे(आयसीएआर) महासंचालक डॉ.एस.अय्यप्पन यांनी सोलापूर दौ-यात आवर्जून विठ्ठलच्या बागेला भेट दिली. त्या वेळी बागेची घेतलेली काळजी पाहून अय्यप्पन यांनी त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. त्यानंतर थोडी- थोडकी नव्हे, तर तब्बल सहा एकर क्षेत्रावर डाळिंबाची लागवड केली. माढा तालुक्यातील तेल्या रोगाच्या प्रादुर्भावामुळे डाळिंबाचे नुकसान झाले. मात्र, त्यानंतर झालेल्या चुका सुधारतानाच नव्याने काही नियोजन केले. पुण्यासह कोलकत्याच्या बाजारपेठेतही डाळिंबे पाठविली. तिथे ८७ ते १४५ रुपयांपर्यंत प्रति किलो भाव मिळाला. त्यातूनच त्यांनी दोन वर्षात १ लाख २० हजार रुपये निव्वळ नफा मिळवला. नैसर्गिक आपत्तीवर मात करीत आणि संघर्षाने बाजारपेठ मिळवित विठ्ठलने एक नवा आदर्श शेतक-यांपुढे ठेवला आहे.

मत्स्यबीजोत्पादनात सातारा आघाडीवर..


सातारा जिल्ह्याने मत्स्यबीजोत्पादनात पुणे विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये आघाडी घेतली आहे. मार्च अखेर संपलेल्या आर्थिक वर्षात ३ कोटी १२ लाख मत्स्यबीजांचे उत्पादन केवळ सातारा जिल्हयात झाले असून, ३०० मे.टन मत्स्योत्पादन करण्यात आले आहे. मत्स्योत्पादनामुळे १९ लाख ६० हजार ६२८ रुपयांचा महसूल जिल्हयाला मिळाला आहे.

पावसाळ्यात जून-जूलै महिना माशांच्या प्रजोत्पादनाचा (ब्रिडिंग) हंगात आहे. जिल्ह्यातील धोम मत्स्यबीज केंद्रात मत्स्य विभागाच्या वतीने माशांना इंजेक्शन देण्यात येते. त्यानंतर हे मासे अंडी घालतात व त्यापासून तयार होणारी मत्स्यबीजे धरून ती धोम तलावात साठवून त्यापासून बोटुकली व मत्स्योत्पादन घेतले जाते. धोम धरणाजवळील या मत्स्यबीज केंद्रात वर्षभरात ३ कोटी १२ लाख मत्स्यबीजांचे उत्पादन झाले असून, १० लाख ५७ हजार ९३८ रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. सन २००९-१० मध्ये ८ लाख ६६ हजार एवढा महसूल मिळाला होता. जिल्ह्यातील तलावाच्या ठेक्याद्वारे ८ लाख ६२ हजार ७२१ रूपये, मासेमारी परवान्याद्वारे २८०० रूपये व इतर ३६ हजार रूपये असे मिळून एकूण १९ लाख ६० हजार ६२८ इतका महसूल वर्षभरात प्राप्त झाला.

Saturday, September 3, 2011

पॉवर टिलरने साधली

शेतीवर जीवापाड प्रेम आणि शासन योजनेचा आधार घेऊन रेमडे डोंगराच्या पायथ्याशी वसलेल्या आरे गावातील शेतकरी संतोष भिसे यांनी वडिलोपार्जित लाल मातीत शासन योजनेतून मिळालेल्या पॉवर टिलरच्या माध्यमातून योग्य मशागतीद्वारे सोन्यासारखं पीक निर्माण केलं आहे. पडिक जमीन असल्याने पूर्वी भिसे यांना इतरांच्या शेतावर मोलमजुरी करुन दिवसाकाठी सव्वाशे रुपयांची मजूरी मिळत असे. मात्र, पॉवर टिलरच्या माध्यमातून आज भिसे दिवसाला ३६०० रुपयांची मजुरी मिळवत आहेत. ही क्रांती केवळ शासन योजनेच्या माध्यमातून झाल्याचे स्पष्ट मत संतोष भिसे यांनी व्यक्त केले.

शेतीच्या विकासातून आर्थिक परिवर्तन करण्याच्या ध्येयाने प्रेरित होवून सातारा तालुक्यातील आरे गावचे शेतकरी संतोष भिसे यांनी वडिलोपार्जित ३ एकर शेतीचा शासन योजनांचा लाभ घेवून खऱ्या अर्थाने विकास घडविला आहे. दोन वर्षपूर्वी पडिक असणाऱ्या त्यांच्या ३ एकर जमिनीमध्ये जवाहर विहीर योजनेतर्गत विहीर घेवून पाण्याची उपलब्धता केली. पाण्यापाठोपाठ त्यांनी शेतीमशागतीसाठी सामाजिक न्याय विभागाकडून पॉवर टिलर मिळवून आधुनिक शेतीचं नव पर्व निर्माण केलं आहे.

प्रयोगशील शेतकरी


पुरंदर तालुक्यातील साकुर्डे हे गाव ! गावातील प्रयोगशील शेतकरी सुरेश सस्ते यांनी स्वत:ची शेती विकसित करताना गावातील अन्य शेतकऱ्यांपर्यंत सुधारित तंत्रज्ञान शेताच्या बांधावर पोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. श्री. सस्ते म्हणतात, २००५ मध्ये पुण्यातील कृषी महाविद्यालयातील तज्ज्ञांकडून शेतकरी-शास्त्रज्ञ मंचातर्फे राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती झाली. शेती सुधारण्यासाठी या मंचाचा सदस्य झालो. त्यातून पीक प्रात्यक्षिके, फळबाग व्यवस्थापन, जल-मृद संधारणाचे उपाय, प्रयोगशील शेतकऱ्यांच्या शेतीला भेटी, राहूरीमध्ये शिवारफेरी अशा उपक्रमांतून शेतीतील बदल समजले स्वत:च्या शेतीमध्ये त्यांचे अनुकरण सुरु केले. त्याचवेळी बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्रातील तज्ज्ञांचेही मार्गदर्शन मिळू लागले.

Popular Keywords

“पिवळी क्रांती अंजीर अंतरपिक अन्नधान्य अन्नसुरक्षा अभियान आदिवासी आधुनिक पोल्ट्री व्यवसाय आंबा आवळा इस्त्रो उपमुख्यमंत्री उस ऊस ऊसतोडणी ऍग्रो टुरिझम कर्जमाफी कात कांदा कापूस कारले कीडनियंत्रण कुक्कुटपालन कृषि उत्पन्न बाजारसमिति कृषि योजना कृषी दिन कृषी विद्यापीठ कृषीतंत्र कृषीमंत्री केळी कोकम कोळंबी खते खरबूज गहू जमिन जलसंधारन झरा ट्रक्टर ठिबक डाळिंब डाळींब महोत्सव - 2010 ढोबळी मिरची तलाव तुर तेल्या दुग्धव्यवसाय दॅट उपकरण द्राक्ष निर्यात निलक्रांती पाणी पाणी अडवा पाणी जिरवा पान पीक पुरंदर पृथ्वीराज चव्हाण प्रक्रिया उद्योग फलोत्पादन फळबाग फायटोप्थोरा बचत गट बटाटा बागाईतदार बाजारपेठ बाजारभाव बायोगॅस बियाणांची गुणवत्ता बी-बियाणे उपलब्धता बैल पोळा उत्साहात साजरा.Indian Farmer's Unique Festival. भाजीपाला. भात भेंडी मच्छिमार मजूर मत्स्य व्यवसाय मधशाळा मधुमक्षिका पालन मराठवाडा कृषी विद्यापीठ महा-रेन महाकृषी महाराष्ट्र महाराष्ट्रातील शेती कोण पिकवतो महिको महिला अणि कृषि क्षेत्र माती परीक्षण मिरची मोसंबी यशोगाथा रेशीम रेशीम उद्योग रोग-नियंत्रण. वनराई बंधारे वीज निर्मीती वृक्षायुर्वेद शिवामृत शेडनेट हाऊस शेतकरी शेततळे. शेती शेती व्यवसाय शेतीपूरक व्यवसाय शेतीशाळा शेतीसाठी हवामानाचा सल्ला समूह शेती साखर साखर कारखाना सिंचन प्रकल्प सीताफल सेंद्रिय शेती सोनेरी हळद सोयाबीन स्ट्रोबेरी स्वाभिमानी शेतकरी संघटना हरितक्रांती हळद