आज विज्ञानाच्या सहाय्याने शेती करण्याचे युग आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान २०१०-२०११ अंतर्गत शेतकरी शेती शाळेचे देसाईगंज तालुक्यातील मौजे डोंगरगाव हलबी येथे आयोजन करण्यात आले होते. डोंगरगाव हलबी या गावातील धान पिकावर कीड व रोगांचा जास्त प्रादुर्भाव होता. तसेच हा भाग आदिवासी असल्यामुळे येथील शेतकऱ्यांच्या अंधश्रध्दा व पारंपरिक पध्दतीची प्रगतीमध्ये अडचण येत होती. कारण आदिवासी आपली पारंपरिक पध्दत सोडण्यास सहज तयार होत नाही. याकरिता येथील शेतकऱ्यांना आधुनिक शेतीबद्दल जनजागृती करण्यात आली.
गावातील शेतकऱ्यांना शेतीशाळेची माहिती देण्यासाठी सर्वप्रथम या गावात जाहीर दवंडी देऊन शेतकऱ्यांची सभा घेण्यात आली. या सभेतून इच्छुक व प्रगतीशिल ३० शेतकऱ्यांची शेतीशाळेकरिता निवड करण्यात आली. प्रत्येकी ६-६ शेतकऱ्यांचे ५ गट पाडण्यात आले. त्यांना मित्रकीटकांचे नाव देऊन प्रत्येक गटातून १ शेतकरी संपर्क शेतकरी म्हणून नेमण्यात आला. उपस्थित सर्व शेतकरी भात उत्पादक होते.