Monday, May 30, 2011

आधुनिक कृषी तंत्रज्ञानाव्दारे भरघोस उत्पन्न.




उसाचे उत्पादन घेणार्‍या शेतकर्‍यांची संख्या काही कमी नाही. मात्र, कमी पाणी, कमी खर्चात जादा उत्पन्न घेणारे शेतकरी अभावानेच सापडतात. फलटण तालुक्यातील शिंदेवाडी येथील तरुण शेतकरी अभयसिंह वसंतराव जाधव यांनी सात एकर क्षेत्रावर कोईमतूर ८६०३२ या जातीचे उसाचे पीक घेतले आहे. हे पीक अवघ्या सात महिन्यांत १५ ते १६ कांडय़ावर आले असून या पिकापासून त्यांना एकरी १०० टनांपेक्षा जास्त उत्पन्नाची अपेक्षा आहे. 


मुळातच आजचा शिकलेला शहरी किंवा ग्रामीण भागातील तरुण शेती व्यवसायाकडे पाठ फिरविताना दिसत आहे. त्याला या व्यवसायात फारसा रस नाही. तो शेतीपेक्षा नोकरीकडे आकर्षित होताना दिसत आहे. मात्र, १९९६-१९९७ मध्ये कृषी पदवीधर झालेले अभयसिंह जाधव नोकरीच्या मागे न लागता फलटण-खुंटे रस्त्यालगत शिंदेवाडी हद्दीत असलेली आपली वडिलोपार्जित २५ एकर शेती पिकविण्यात धन्यता मानू लागले. पदवीच्या शिक्षणानंतर त्यांना सहज एखादी छोटी-मोठी नोकरी मिळाली असती, परंतु त्यापेक्षा त्यांनी शेती व्यवसाय करण्याचा धाडसी निर्णय घेतला. त्या निर्णयाबद्दल ते आजअखेर समाधानी असल्याचे आवर्जून सांगतात. आज ते स्वत: लक्ष देऊन २५ एकर शेती पिकवीत आहेत. श्री. जाधव यांनी शेतीमध्ये आधुनिक कृषी तंत्रज्ञानाव्दारे शेतीची मशागत, पेरणी, पीकपध्दतीचा अवलंब करुन आधुनिक शेतीचा नवा आदर्श जोपासला आहे. शेती ते फक्त पिकवीत आहेत, असे नव्हे तर कमी खर्चात आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरत भरघोस उत्पन्न घेण्याचा विक्रमही त्यांनी नोंदविला आहे.

श्री. जाधव यांनी आपल्या २५ एकर बागायती क्षेत्रापैकी सात एकर क्षेत्रावर ऊस, सात एकर क्षेत्रावर गहू तर उरलेल्या क्षेत्रावर इतर पिके घेतली आहेत. या शेतीक्षेत्रापैकी सात एकर क्षेत्रावर कोईमतूर ८६०३२ या ऊस जातीची लागवड केली आहे. कोईमतूर जातीचे बियाणे त्यांनी बारामती येथील कृषी प्रतिष्ठान येथून आणून त्याची लागवड केली. टप्प्याटप्प्याने त्यांनी स्वत: बियाणे बनविण्याची माहिती घेऊन घरचे बियाणे तयार केले आहे. आज सात एकर क्षेत्रावर कोईमतूर जातीच्या उसाची लागवड करण्यात ते यशस्वी ठरले आहेत. कोईमतूर जातीच्या बियाणांची लागवड करण्याबरोबरच या पिकाची शास्त्रशुध्द पध्दतीने निगा राखून कमी खर्चात अधिक शेती उत्पादन करण्याचा इतिहास श्री. जाधव यांनी नोंदविला आहे. कृषि अधिकार्‍यांनीही त्यांच्या या प्रयोगशील शेतीचे मुक्तकंठाने कौतुक केले आहे.

कोईमतूर जातीचं पीक खरे तर सात महिन्यांत जेमतेम चार ते पाच कांडय़ांवर येत असते. मात्र, श्री. जाधव यांची ऊस शेती पिकविण्याची हातोटी व आजअखेरचा अनुभव आणि कृषीक्षेत्रातील प्रगत तंत्रज्ञान येथे खर्‍या अर्थांने त्यांनी उपयोगात आणले आहे. हे पीक सात महिन्यांत १६ ते १७ कांडय़ांवर आणण्यात त्यांना यश आले असून, कमी कालावधीत या पिकाची एवढी जोमदार वाढ हा किमान फलटण तालुक्यातीलच नव्हे तर जिल्ह्यातील ऊस पिकासंबंधीचा एक विक्रमच म्हणावा लागेल.

श्री. जाधव यांनी आधुनिक शेतीची कास धरली असून शेतीक्षेत्रातील प्रगत ज्ञान, माहिती आणि अनुभवानुसार पीक पध्दती आणि शेती उत्पादनात त्यांनी पुढाकार घेतला आहे. सुरुवातीला ऊस लागवड करावयाच्या क्षेत्रात शेण खत वापरले, बियाणे प्रक्रिया करुन नऊ इंचावर डोळा ठेवून मग ऊस लागवड केली. त्यानंतर विद्यापीठाच्या शिफारशीनुसार संतुलित खतांचा वापर केला गेला. हे सर्व क्षेत्र विहीर व कालवा बागायती आहे, तरी सुध्दा या ऊस शेतीला साधारणपणे वातावरणानुसार १५ दिवसांनी पाणी देण्याची पध्दत अवलंबिण्यात आली आहे. जमिनीची मशागत, पिकांची लागवड आणि त्यांना आवश्यकतेनुसार खतांची आणि किटकनाशकांची मात्रा देण्याच्या शास्त्रशुध्द पध्दतीही जोपासली आहे. पाणी व खतांचा संतुलित वापर करण्यातही त्यांनी नियोजनपूर्वक काम केले आहे, तसेच लागवडीनंतर अवघ्या २० दिवसांनी व नंतर ७५ दिवसांनी त्यांनी तणनाशकाचा वापर करुन तणांवरचा मोठा खर्च कमी केला. यामुळे पिकातला तणांचा अडसर दूर होऊन पीकाची वाढही जोमदार झाली.

विभागीय कृषी अधिकारी रघुनाथ सरतापे, तालुका कृषी अधिकारी नितीन फुलसुंदर, मंडल कृषी अधिकारी पी. एस. बिचुकले, कृषी पर्यवेक्षक अजित जगताप, कृषी सहाय्यक यांचे वेळोवेळी मिळत गेलेल्या मार्गदर्शनामुळे आज ते या पिकाकडून मोठय़ा अपेक्षा बाळगून आहेत. जे पीक लागवडीपासून १२० दिवसांच्या आसपास बांधणीला येते, ते पीक अवघ्या ६५ दिवसांत बांधणीला आणण्यात श्री. जाधव यांना यश आल्याने या क्षेत्रातील तज्ज्ञांनाही अचंबित करुन सोडत आहे. त्यामुळे या पिकाकडून त्यांना एकरी १०० टनांपेक्षा जास्त उत्पन्नाची अपेक्षा आहे. 

ऊसपीक घेण्यापूर्वी श्री. जाधव यांनी आपल्या शेतात काकडी, कलिंगड, भेंडी या सारखी पिके घेऊन त्यामधून चांगले उत्पन्न घेण्यात यश मिळविले आहे. या पिकाबरोबरच त्यांनी आपल्या शेतातील उसापासून लोकांना दर्जेदार आणि आकर्षित करणार्‍या एक किलो गुळाच्या ढेपा तयार केल्या. श्री. जाधव यांनी तयार केलेल्या एक किलोच्या गुळाच्या ढेपांना परदेशातही मोठी मागणी लाभली. ऊस शेतीबरोबरच त्यांनी दूध व्यवसायावरही लक्ष केंद्रीत केले. सध्या त्यांच्याकडे १५ म्हैशी असून आगामी काळातही दुग्धव्यवसाय हा शेतीपूरक उद्योग म्हणून वाढविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. दुग्धव्यवसाय या शेतीपूरक उद्योगापासून आर्थिक लाभाबरोबरच मिळणार्‍या इतर फायद्यांमध्ये शेणखताचा मोठा फायदा आहे. शेणखताचा शेतीतील उत्पन्नवाढीसाठी चांगला फायदा होत आहे. सध्या प्रत्येक वर्षी पाच एकर क्षेत्राला पुरेल एवढे शेणखत त्यांना उपलब्ध होत आहे. आगामी काळात संपूर्ण शेती सेंद्रिय पध्दतीने करण्याचा त्यांचा मानस असून त्यादृष्टीने श्री. जाधव यांनी शेती आणि दुग्धव्यवसायाचे नियोजन चालविले आहे.

No comments:

Post a Comment

Popular Keywords

“पिवळी क्रांती अंजीर अंतरपिक अन्नधान्य अन्नसुरक्षा अभियान आदिवासी आधुनिक पोल्ट्री व्यवसाय आंबा आवळा इस्त्रो उपमुख्यमंत्री उस ऊस ऊसतोडणी ऍग्रो टुरिझम कर्जमाफी कात कांदा कापूस कारले कीडनियंत्रण कुक्कुटपालन कृषि उत्पन्न बाजारसमिति कृषि योजना कृषी दिन कृषी विद्यापीठ कृषीतंत्र कृषीमंत्री केळी कोकम कोळंबी खते खरबूज गहू जमिन जलसंधारन झरा ट्रक्टर ठिबक डाळिंब डाळींब महोत्सव - 2010 ढोबळी मिरची तलाव तुर तेल्या दुग्धव्यवसाय दॅट उपकरण द्राक्ष निर्यात निलक्रांती पाणी पाणी अडवा पाणी जिरवा पान पीक पुरंदर पृथ्वीराज चव्हाण प्रक्रिया उद्योग फलोत्पादन फळबाग फायटोप्थोरा बचत गट बटाटा बागाईतदार बाजारपेठ बाजारभाव बायोगॅस बियाणांची गुणवत्ता बी-बियाणे उपलब्धता बैल पोळा उत्साहात साजरा.Indian Farmer's Unique Festival. भाजीपाला. भात भेंडी मच्छिमार मजूर मत्स्य व्यवसाय मधशाळा मधुमक्षिका पालन मराठवाडा कृषी विद्यापीठ महा-रेन महाकृषी महाराष्ट्र महाराष्ट्रातील शेती कोण पिकवतो महिको महिला अणि कृषि क्षेत्र माती परीक्षण मिरची मोसंबी यशोगाथा रेशीम रेशीम उद्योग रोग-नियंत्रण. वनराई बंधारे वीज निर्मीती वृक्षायुर्वेद शिवामृत शेडनेट हाऊस शेतकरी शेततळे. शेती शेती व्यवसाय शेतीपूरक व्यवसाय शेतीशाळा शेतीसाठी हवामानाचा सल्ला समूह शेती साखर साखर कारखाना सिंचन प्रकल्प सीताफल सेंद्रिय शेती सोनेरी हळद सोयाबीन स्ट्रोबेरी स्वाभिमानी शेतकरी संघटना हरितक्रांती हळद