Wednesday, January 18, 2012

रेशीम उद्योगाने दाखविली प्रगतीची वाट


परंपरागत शेतीबरोबरच रेशीमकोष निर्मितीचा नाविण्यपूर्ण उपक्रम राबवून सातारा जिल्ह्याच्या कराड तालुक्यातील शेणोली येथील तरुण शेतकरी दीपक लोंढे यांनी उत्पन्न वाढीबरोबरच शेतकऱ्यांना नवी दिशा देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी आपल्या वडिलोपार्जित शेतीत परंपरागत शेतीपद्धतीबरोबरच नव्या पद्धतीने रेशीमकोष निर्मितीत यशस्वी पुढाकार घेतला आहे. 

लोंढे हे गेल्या दहा वर्षापासून रेशीम शेतीचा यशस्वी प्रयोग करीत आहेत. त्यांनी सुरुवातीला प्रायोगिक तत्त्वावर रेशीम उद्योग उभारला. बघता-बघता यात यश मिळत गेले. या उद्योगात नाविन्यता टिकवून रेशीमकोष निर्मिती करताना सायकल पद्धतीचा अवलंब करण्यात आला. निव्वळ शेतपिके न घेता त्याला शेतीपूरक व्यवसायाची जोड देऊन शेतकऱ्यांच्या अर्थिक परिवर्तनाचा नवा विचार त्यांनी याद्वारे मांडला आहे. 
लोंढेंनी आपल्या वडिलोपार्जित माळरानाच्या चार एकर शेतीमध्ये दहा वर्षापूर्वी रेशीमकोष निर्मितीचा हा नाविण्यपूर्ण प्रयोग केला. सुरुवातीला वीस गुंठ्यांवर तुती लागवड केली. पहिल्याच वर्षी तीन लॉटमधून ४० हजारांचा निव्वळ नफा झाल्याने कोष निर्मितीसाठी एक लाखाचे स्वभांडवल खर्चून त्यांनी ३० बाय ४० आकाराचे बंदिस्त शेड बांधले. त्यानंतर २००६ पर्यंत दीड एकरावर तुती लागवड वाढवली. त्यानंतर एकूण ४० बाय ४५ या आकारात शेडचा विस्तारही केला. आता त्यांनी दोन एकरावर तुती लागवड वाढवली आहे. त्या क्षेत्रात काही दिवसांचा फरक राखून ते तुती लागवड करतात. त्याचा फायदा रेशीमकोष निर्मिती चक्राकार पद्धतीने घेण्यासाठी झाला आहे. या पद्धतीमुळे त्यांना वर्षाकाठी नऊ लॉटद्वारे रेशीमकोषांची निर्मिती करता येणे शक्य झाले आहे. 

दरवर्षी उन्हाळ्यात एकरी चार ट्रेलर शेणखताची मात्र दिलेल्या क्षेत्रावर मे अखेरीस लोंढे रेशीमकोष निर्मितीच्या तुती लागवडीची तयारी सुरु करतात. त्या शेतीची पुरेशी मशागत करतात. त्यानंतर नेहमीच्या पद्धतीने सरी सोडतात. दोन रोपात साधारण दीड फुटाचे अंतर ठेवून एकास एक सरीच्या पद्धतीने तुतीच्या कांड्यांची लावण करतात. यासाठी व्ही-१ जातीच्या तुतीचा ते वापर करतात. लागवडीनंतर शेताला उपलब्धतेनुसार एकरी ५० किलोप्रमाणे नत्रांची मात्रा देण्यात येते. पुन्हा एक महिन्यानंतर सुपर फॉस्फेट व अमोनिअम सल्फेटच्या प्रत्येकी दोन बॅगा, पोटॅशची एक व दुय्यम खताच्या दोन बॅग अशा स्वरुपात वरखतांची मात्रा ते देतात. त्याच पद्धतीने प्रत्येक छाटणीच्यावेळी ते खत व्यवस्थापन करतात. 

पाणी बचत व तुतीला पाल्याची क्वॉलिटी येण्यासाठी शेतात ठिबक सिंचन प्रणालीचा त्यांनी वापर केला आहे. तुतीच्या छाटणीनंतर ४० ते ४५ दिवसांच्या अंतराने कोष उत्पादन घेतले जाते. कोषनिर्मितीसाठी हवामानाच्या अनुकूलतेनुसार ते अंडीपुंजांची निवड करतात. उष्ण हवामानात कोल्हार गोल्ड व तेथून पुढे सीएसआर या जातीच्या अंडीपुंजांचा ते कोष उत्पादनासाठी वापर करतात. त्यांच्याकडील ४० बाय ४५ आकाराच्या शेडमध्ये ४ बाय ३० आकारांतील ५ रॅकमध्ये प्रत्येकी सहा कप्प्यात कोषांचे संगोपन केले जाते. आपल्या नाविण्यपूर्ण आणि नियोजित शेतीपद्धतीमुळे प्रत्येक लॉटला ३०० ते ३५० अंडीपुंजापासून कोष उत्पादन घेण्याची किमया लोंढे यांनी साधली आहे. इतर शेतकऱ्यांसाठी ही निश्चितच प्रगतीची वाट दाखविणारी ठरू शकेल.

Popular Keywords

“पिवळी क्रांती अंजीर अंतरपिक अन्नधान्य अन्नसुरक्षा अभियान आदिवासी आधुनिक पोल्ट्री व्यवसाय आंबा आवळा इस्त्रो उपमुख्यमंत्री उस ऊस ऊसतोडणी ऍग्रो टुरिझम कर्जमाफी कात कांदा कापूस कारले कीडनियंत्रण कुक्कुटपालन कृषि उत्पन्न बाजारसमिति कृषि योजना कृषी दिन कृषी विद्यापीठ कृषीतंत्र कृषीमंत्री केळी कोकम कोळंबी खते खरबूज गहू जमिन जलसंधारन झरा ट्रक्टर ठिबक डाळिंब डाळींब महोत्सव - 2010 ढोबळी मिरची तलाव तुर तेल्या दुग्धव्यवसाय दॅट उपकरण द्राक्ष निर्यात निलक्रांती पाणी पाणी अडवा पाणी जिरवा पान पीक पुरंदर पृथ्वीराज चव्हाण प्रक्रिया उद्योग फलोत्पादन फळबाग फायटोप्थोरा बचत गट बटाटा बागाईतदार बाजारपेठ बाजारभाव बायोगॅस बियाणांची गुणवत्ता बी-बियाणे उपलब्धता बैल पोळा उत्साहात साजरा.Indian Farmer's Unique Festival. भाजीपाला. भात भेंडी मच्छिमार मजूर मत्स्य व्यवसाय मधशाळा मधुमक्षिका पालन मराठवाडा कृषी विद्यापीठ महा-रेन महाकृषी महाराष्ट्र महाराष्ट्रातील शेती कोण पिकवतो महिको महिला अणि कृषि क्षेत्र माती परीक्षण मिरची मोसंबी यशोगाथा रेशीम रेशीम उद्योग रोग-नियंत्रण. वनराई बंधारे वीज निर्मीती वृक्षायुर्वेद शिवामृत शेडनेट हाऊस शेतकरी शेततळे. शेती शेती व्यवसाय शेतीपूरक व्यवसाय शेतीशाळा शेतीसाठी हवामानाचा सल्ला समूह शेती साखर साखर कारखाना सिंचन प्रकल्प सीताफल सेंद्रिय शेती सोनेरी हळद सोयाबीन स्ट्रोबेरी स्वाभिमानी शेतकरी संघटना हरितक्रांती हळद