Showing posts with label बचत गट. Show all posts
Showing posts with label बचत गट. Show all posts

Wednesday, October 19, 2011

'धवल' यशाचा मार्ग




कोकणातील भातशेती सामान्य शेतकरी आणि शेतमजूरांच्या उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन आहे. भातकापणीनंतर त्याच जमिनीवर पाण्याच्या उपलब्धतेनुसार भाजीपाल्याचे उत्पादन घेऊन त्यांची विक्री करायची हाच पर्याय या शेतकऱ्यांसमोर असतो. ग्रामीण भागातील महिला शेतावर मोलमजूरी करून कुटुंबासाठी अर्थार्जन करतात. शेतीच्या हंगामानंतर मात्र घरातील अर्थशास्त्राचे नियोजन करणे त्यांना जड जाते. अशा महिलांसाठी बचत गट चळवळ आधार ठरली आहे. खेड तालुक्यातील दयाळ गावातील महिलादेखील याच चळवळीच्या माध्यमातून स्वावलंबी झाल्या आहेत.

Tuesday, September 13, 2011

शेळीपालनातून हजारोची बचत !



धुळे जिल्हयातील साक्री तालुक्यातील छावडी गावात दि. २६ जानेवारी, २००८ रोजी सातपुडा सेवाभावी संस्थेचे पदाधिकारी यांच्या समवेत बैठक घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वयंसहाय्यता महिला बचत गटाची स्थापना केली. ध्येय कसे गाठावे याचे योग्य नियोजन केले. गटाच्या अध्यक्षा म्हणून श्रीमती अंजना किशन पिंपळे व सचिव म्हणून श्रीमती पुनम ओंकार पिंपळे यांची निवड करण्यात आली. स्टेट बँक ऑफ इंडिया, निजामपूर शाखेत गटाच्या नावाने खाते उघडले.

या बचत गटास खेळते भांडवल शासनाने दिलेले अनुदान याचा योग्य तो फायदा उठवत गटाने आपली यशस्वी वाटचाल करण्याचा प्रयत्न चालवला व दिलेले रुपये २५,००० कर्ज फेड वेळीच करत त्यांनी शासनाने दिलेले १ लाख रुपये एवढया रकमेचे अनुदान कायमस्वरुपी खेळते भांडवलाचा फायदा मिळवून घेतला.

Tuesday, July 5, 2011

बचतगटांच्या उत्पादन विक्रीसाठी तज्ज्ञ बाजारपेठ संस्थेची नियुक्ती - जयंत पाटील





स्वर्णजयंती ग्राम स्वरोजगार योजनेंतर्गत स्थापन झालेल्या बचतगटांच्या उत्पादनांच्या विक्रीसाठी तज्ज्ञ बाजारपेठ संस्थांची नियुक्ती करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांनी दिली.

मंत्रालयात मंगळवारी यासंबंधीचे सादरीकरण करण्यात आले. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. यावेळी ग्रामविकास विभागाचे सचिव सुधीर ठाकरे यांच्यासह वरिष्ठ शासकीय अधिकारी उपस्थित होते.

ग्रामीण भागातील दारिद्र्य रेषेखालील लोकांना स्वयंसहाय्यता बचतगटांच्या माध्यमातून संघटित करून त्यांना उपजिविकेचे साधन उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे सांगून श्री.पाटील म्हणाले की, ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत राज्याच्या ३३ जिल्ह्यात ही योजना राबविण्यात येत आहे. योजनेमध्ये एप्रिल २०११ पर्यंत २ लाख ५५ हजार ३२४ बचतगट स्थापन झाले असून त्यामध्ये २ लाख ११ हजार ६२५ बचतगट महिलांचे आहेत. ८० हजार ६४२ बचतगटांनी स्वत:चे उत्पादन सुरु केले असून त्यामध्ये महिला बचतगटांची संख्या ७१ हजार ७१३ इतकी आहे. बचतगटांच्या माध्यमातून हे लघु आणि अति लघु उद्योजक नाविन्यपूर्ण आणि दर्जेदार स्वरूपाची उत्पादने निर्माण करतात. त्यांच्या उत्पादनांना व्यापक आणि खात्रीशीर बाजारपेठ मिळावी, यासाठी त्यांना आवश्यक असलेली कौशल्ये संपादित करता यावीत या उद्देशाने शासनाने तज्ज्ञ बाजारपेठ संस्थेची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे.

केंद्र शासनाच्या सहकार्याने मुंबईत महालक्ष्मी सरस या बचतगटांच्या वस्तुंचे प्रदर्शन भरविण्यात येते. याप्रमाणेच राज्य शासन ३३ जिल्ह्यात आणि ६ महसुली विभागात अशा वस्तुंच्या विक्री प्रदर्शनाचे आयोजन करते. विभागीय प्रदर्शनासाठी २५ लाख तर जिल्हा प्रदर्शनासाठी १० लाख रुपयांपर्यंतचा निधी राज्य शासनामार्फत देण्यात येतो. तज्ज्ञ बाजारपेठ संस्थांकडून बचतगटांच्या उत्पादनांची विक्री व्यवस्था निर्माण केल्यास बचतगटांना व्यापक आणि शाश्वत बाजारपेठ मिळतांनाच त्यांच्या आर्थिक उत्पन्नात देखील वाढ होण्यास मदत होईल, असा विश्वास श्री.पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.

Sunday, June 26, 2011

महिला बचत गटाने फुलविला भाजीचा मळा.




ग्रामीण भागातील बहुतांश महिलांचा मोठा व्यवसाय करण्याकडे कल नसतो. घरातील घरात पापड लाटणे, लोणची बनविणे, खानावळ चालविणे सारखे व्यवसाय करतात . परंतू याला अपवाद ठरला खैरे गावातील महिला बचतगट.

वाडा तालुक्यातील मानिवली मध्ये असलेल्या खैरे गावातील कल्पना पाटील यांनी ११ महिलांचा बचतगट तयार केला. गावातील परिस्थितीचा अभ्यास करून शेळीपालन आणि शेती नांगरणीसाठी भाडेतत्वावर पॉवर टिलर टॅक्टर देण्याचा व्यवसाय सुरु केला. या पॉवर टिलर टॅक्टरसाठी बॅक ऑफ महाराष्ट्रकडून ५० हजार रुपयांचे कर्ज घेण्यात आले. व्यवसाय सुरु केला पण दुदैंवाने शेळीपालन व्यवसाय हवा तसा चालना नाही. तसेच शेती नांगरणीसाठी ट्रॅक्टरला मागणी न आल्याने संपूर्ण बचतगटच अडचणीत आला.

महिलांच्या अंगी असणारी जिद्द व चिकाटीमुळे त्या डगमगल्या नाहीत. या अडचणींवर मात करून नव्या उमेदीने त्यांनी वाडयातील सामाजिक वनीकरण विभागाकडून २५ हजार रुपयांचे अनुदान मिळविले. पुढे तर बँकांकडे कर्जासाठी हात न पसरता बचतगटाच्या सर्व महिलांनी २५ ते ३० हजार रुपये खर्च करून शेती व्यवसाय सुरु केला. शेतीत त्यांनी चवळी, मका, कारली असा भाजीचा मळा फुलवला. विशेष म्हणजे या महिलांच्या घरातील सर्वच मंडळी या भाजीपाला व्यवसायात हातभार लावत आहेत. साधारणपणे या भागात ५०० किलोचे उत्पादन होते. वाडा शहरात भाजीपाल्यासाठी मोठी बाजारपेठ नसल्याने नवी मुंबईतील व्यापारी हा भाजीपाला उचलतात. त्यामुळे बाजारभावाप्रमाणे त्यांना ५ ते १० हजार रुपये मिळतात.

महिला बचतगटाने फुलविलेल्या भाजीपाला व्यवसायातून महिलांचा आर्थिकस्तर उंचचावण्यास मदत झाली आहे. बँकेचे कर्ज वेळेत फेडणे, सामाजिक वनीकरणासाठी सहकार्य, भाजीपाला उत्पादनसारखा स्तुत्य उपक्रम राबविणे या सर्व गोष्टी लक्षात घेऊन केंद्र सरकारच्या स्वर्ण जयंती ग्रामस्वयंरोजगार योजनेंतर्गत या महिला बचतगटाला ठाणे जिल्हा आणि कोकण विभागासाठी राजमाता जिजाऊ स्वालंबन पुरस्कार देण्यात आला.

बचत गटाचे सोयाबीन.




नागरिकांचा सामूहिक आर्थिक विकास करण्‍याच्‍या उद्देशाने शासनाने बचत गटांना प्रोत्‍साहन दिले. अत्‍यल्‍प दरात या बचत गटांना उद्योगासाठी कर्ज उपलब्‍ध होत असल्‍याने अनेक बचत गटांनी आपल्‍या प्रगतीचा टप्‍पा गाठत यातील सदस्‍यांचेही जीवनमान उंचावले आहे. काम करण्‍याची जिद्द आणि परिश्रम यावर बचत गटांनी विविध प्रकल्‍प हाती घेतले असून त्‍यात त्‍यांना यशही मिळत आहे. विशेष म्‍हणजे बचत गटांचे उत्‍पादन आज दैनंदिन जीवनाचा घटक बनला आहे.

परभणी येथील कृषी विद्यापीठातील सोयाबीन प्रक्रिया केंद्र लघु उद्योजकांसह महिला बचत गटांसाठी संजीवनी ठरत आहे. विद्यापीठाच्‍या अभियांत्रीकी महाविद्यालयाअंतर्गत येणा-या सोयाबीन प्रक्रिया केंद्रातून महिलांना प्रशिक्षण दिले जात आहे. मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषी अभियांत्रीकी महाविद्यालयात २००५ पासून सोयाबीन प्रक्रिया केंद्र कार्यान्‍वीत झाले महाराष्‍ट्रात कार्यरत असलेला हा एकमेव प्रकल्‍प आहे.

सोयाबीन हे अल्‍पकालावधीत येणारे आणि हमखास बाजारभाव मिळवून देणारे नगदी पीक शेतक-यांच्‍या विश्‍वासाला पात्र ठरले आहे. अलिकडील काळात सोयाबीनच्‍या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. सोयाबीनच्‍या उत्‍पादनाच्‍याबाबतीत मध्‍यप्रदेश खालोखाल महाराष्‍ट्राचा दुसरा क्रमांक लागत आहे. देशातील एकूण उत्‍पादनाच्‍या ५० टक्‍के उत्‍पादन एकट्या मध्‍यप्रदेशात घेतले जाते.

महाराष्‍ट्र, राजस्‍थान व उत्‍तरप्रदेश या राज्‍यांमध्‍येही सोयाबीनचे पीक समाधानकारक घेतले जाते. मराठवाडा विभागात सोयाबीनचे सुधारित वाण परभणी सोना, एमएसएस-४७, जवाहर जे.एस.-३३५, समृध्‍दी एमएयूएस-७१, शक्‍ती एमएयूएस-८१ यासह प्रसाद एमएयुएस-३२, आणि एमएयुएस-६१ या वाणीची लागवड केली जाते. सोयाबीन हे कडधान्‍य व गळीत धान्‍य या दोन्‍ही प्रकारात मोडत असून त्‍यातील तेल व प्रथिने यासाठी प्रामुख्‍याने त्‍याचे उत्‍पादन घेतले जाते.

सोयाबीनचा दैनंदिन आहारात कसा वापर करावा याचे ज्ञान नसल्‍यामुळे पाहिजे तेवढ्या प्रमाणात आहारामध्‍ये सोयाबीनचा वापर होत नाही. प्रक्रिया युक्‍त सोयाबीनचा वापर आपण रोजच्‍या आहारात केल्‍यास चांगले आरोग्‍य मिळेल. गायी-म्‍हशीच्‍या दुधाइतकेच सोयाबीनचे दूध पोष्‍टीक असून १ किलो सायोबीन पासून ८ लिटर दुध मिळते. सोयाबीन प्रक्रिया केंद्राने सोयादुध व सोया पनीर याचेसुध्‍दा उत्‍पादन केले.

बचत गटाच्‍या महिला सोयाबीन वर प्रक्रिया करुन उत्‍पादनांची निर्मिती करत महिन्‍याला १० ते १५ हजार रुपये घरबसल्‍या कमवू शकतात. सोयाबीनवर आधारित प्रक्रिया प्रशिक्षण दोन दिवसाच्‍या कालावधीत लघु उद्योजकांसह महिला बचत गटांना देण्‍यात आले आहे. सोयाबीन प्रक्रिया केंद्र हे महाराष्‍ट्रातील एकमेव प्रक्रिया केंद्र आहे. सोयाबीन पासून मिळणा-या प्रथिनांची गुणवत्‍ता चांगली आहे

सध्‍या बाजारात सहजपणे काही प्रमुख प्रचलित असलेले पदार्थ म्‍हणजे सोयातेल, सोयापीठ व सोयादुध. या पदार्थावर पुन्‍हा प्रक्रिया केल्‍यास अनेक खाद्य पदार्थ सोयाबीनपासून तयार होऊ शकतात. सोयाबीन हे इतर कुठल्‍याही कडधान्‍याच्‍या तेलबियांच्‍या किंवा वनस्‍पतीजन्‍य इतर कोणत्‍याही अन्‍नपदार्थाच्‍या पोषणमुल्‍यांच्‍या बाबतीत आघाडीवर आहे. सोयाबीन पासून मिळणा-या प्रथिनांचे प्रमाण डाळी, शेंगदाणे. मांस व मासे यांच्‍या तुलनेत दुप्‍पट, अंड्याच्‍या तिप्‍पट व दुधाच्‍या १० पट इतके आहे.

जेव्‍हा सोयाबीन इतर कडधान्‍यासोबत वापरले जाते तेव्‍हा त्‍या पदार्थ्‍यांचे पोषणमुल्‍य वाढते. सोयाबीनपासून पुर्ण स्‍निग्‍धांशयुक्‍त सोयापीठ तयार करता येते. याचा वापर बेकरी, उत्‍पादनात केक, मर्फीन्‍स, बिस्‍किटे, ब्रेड तसेच पारंपारिक पदार्थामध्‍येसुध्‍दा करता येतो. दुग्‍धजन्‍य उत्‍पादनामध्‍ये सोयादुध, सोयापनीर, सोयादही, सोयाताक, सोया लस्‍सी, सोया आईस्‍क्रीम यासह पूर्ण सोयाबीनवर प्रक्रिया केल्‍यास मुख्‍यत्‍वे सोयायुक्‍त, सोजी व पोहे बनविता येतात. सोयपीठाचा वापर पारंपारिक पदार्थामध्‍ये करुन लाडू, चकली, शेव तसेच बेकरीच्‍या विविध पदार्थांसह सोयापीठाच्‍या वापरातुन ढोकळा, खाकरा, इडली, डोसा व अन्‍य पारंपारिक पदार्थ बनविता येतात.

महाराष्‍ट्रात एकमेव असलेला कृषी विद्यापीठातील सोयाबीन प्रकल्‍पातून बचतगटाच्‍या महिलांनी प्रशिक्षण घेऊन नागरिकांना सुध्‍दा सोया उत्‍पादने देण्‍याबरोबरच स्‍वत:ची आर्थिक स्‍थितीसुध्‍दा सुधारली आहे.

Saturday, June 11, 2011

धवलक्रांतीतून उन्नती.




सिंधुदुर्ग जिल्हयातील गोवरी येथील सत्पुरूष महिला बचत गटाने खाद्यपदार्थ , हॉटेल व्यवसाय , भाजीपाला दुग्धव्यवसायाच्या माध्यमातून आर्थिक उन्नती साधली आहे. सत्पुरूष महिला बचत गटांची स्थापना ५ एप्रिल २००३ मध्ये करण्यात आली.गोवरी स्थळकरवाडीतील महिलांनी व पुरूषांनी एकत्ररित्या गृहपयोगी खाद्यपदार्थ , भाजीपाला, हॉटेल व्यवसाय दुग्धव्यवसाय निवडले.

बँक ऑफ बडोदा, शाखा कुडाळ तसेच जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा व गोमुखच्या सहकार्याने प्रथम २००५ साली २० हजार रूपये, खेळते भांडवल देण्यात आले.या निधीतून गटातील महिलांनी आणि पुरूषांनी एकत्रित रित्या गृहपयोगी खाद्यपदार्थ भाजीपाला , हॉटेल व्यवसाय सुरू केला. व्यवसायाच्या माध्यमातून २००५ साली देण्यात आलेले २० हजार रू एका वर्षात व्याजासहित फेडण्यात यशस्वी ठरल्या.

गटाच्या प्रगतीचा वाढता आलेख पाहून २७ एप्रिल २००८ रोजी बँक ऑफ बडोदा, शाखा कुडाळ यांचेकडून २ लाख ५० हजार रू.दुग्धव्यवसायाकरिता मंजूर करण्यात आले.सदर गटातील महिला व पुरूष यांनी मिळून सुमारे १३ म्हशी खरेदी करून दुग्धव्यवसायाच्या माध्यमातून आपल्या उत्पन्नाचे स्त्रोत वाढवत आहेत.

या गटातील सर्व सदस्य शेतकरी कुटुंबातील असून भाजीपाला व शेतीच्या माध्यमातून म्हशी पालनाचे काम सहजपणे करू शकतात. शेतात असलेला हिरवा चारा, सुका चारा सहज उपलब्ध होऊ शकतो.त्यामुळे दुग्धव्यवसाय करणे किफायतशीर ठरत असल्याने स्थानिक ग्राहकांना परिसरातील व कुडाळ बाजारपेठमध्ये दुध विक्री करण्यास मिळेल.अशा गोष्टींचा विचार विनिमय करून या गटाने अडीच लाख रू.मधून १३ म्हशी खरेदी करून दुग्धव्यवसायाच्या माध्यमातून आपल्या उत्पन्नाचे स्त्रोत वाढवत आहेत

केवळ चूल आणि मूल एवढया पुरते मर्यादीत न राहता बचत गटाच्या माध्यमातून सत्पुरूष महिला बचत गटातील महिलांनी व पुरूषांनी एकत्रितरित्या व्यवसाय करून इतर बचत गटापुढे आदर्श निर्माण केला आहे.

या दुग्धव्यवसायाला जोडधंदा म्हणून तूप, लोणी, ताक असे विविध प्रकारचे दुधापासून बनविण्यात येणारे पदार्थ तयार करून विक्रीसाठी नेत असतात.दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून दर महिन्याला सुमारे चार ते पाच हजार रूपयांचा फायदा होत असतो. या गटाला १३ म्हशीकडून रोज मिळणारे दूध गोबरी परिसरातील स्थानिक लोकांना कुडाळ शहरात फिरती करून विक्री करण्याचे काम गावेरी येथील लक्ष्मण गावडे यशस्वीरित्या करतात.दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून बॅकेतून घेतलेले २ लाख ५० हजार मधून १ लाख ९५ हजार व्याजासहित फेड केले आहेत.

सत्पुरूष महिला बचत गटातील सर्व सदस्य दारिद्रयरेषेखाली असून दर महिन्याच्या १ तारखेला सभा लावण्यात येते. मासिक बचत ३० रूपये प्रमाणे ३९० रू जमा करण्यात येते.या गटाच्या प्रत्येक बैठकीत गटातील समस्या सोडविण्याचा व गटाची उत्तरोत्तर प्रगती साधण्यासाठी गटाचे उपाध्यक्ष यशस्वी प्रयत्न करीत असतात.

सत्पुरूष महिला बचत गटाचा सन २००८-०९ मध्ये तालुकास्तरीय तृतीय क्रमांकाचा राजमाता जिजाऊ स्वावलंबन पुरस्कार प्रदान करून गटातील सर्व सदस्यांचा शासनाच्या वतीने गौरव करून प्रशस्तीपत्रक व ट्रॉफी देवून सन्मानित करण्यात आले आहे.

या गटाने दुग्ध व्यवसायाबरोबर भाजीपाला उत्पादनातून लालभाजी, मुळा भाजी, दोडकी, वांगी, मिरच्या, चिबूड, काकडी अशा विविध प्रकारची भाजीपाला लागवड केली, उत्पादीत केलेली भाजी, गोवरी, वाडीवरवडे, पिंगुळी, कुडाळ, वालावल, आदी ठिकाणच्या बाजारपेठा विक्रीसाठी काबीज केल्या आहेत.


Tuesday, February 1, 2011

गुणवत्ता असेल तर बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ अमर्याद आहे.

वस्तूची गुणवत्ता चांगली असेल तर त्याला कुठेही बाजारपेठ मिळू शकते.याची प्रचिती नचिकेत बचतगटाला आली आहे.कोपरगांव,नगर,नाशिक,पुणे,मुंबई असे करता या गटाने तयार केलेली आवळा कॅन्डी आता थेट अमेरिकेत झेप घेऊ पहात आहे.

गटाच्या अध्यक्षा प्रीती कुलकणी व हरहुन्नरी आहेत त्या त्यांच्या मैत्रिणी मंदाकिनी टेंभर (उपाध्यक्षा) उज्वला नाईकवाडे,ज्योती अरगडे,सुमन आढावा,विद्या औताडे,संगीता देवकर,मंगल गवळी,अश्विनी धोंडे, सुनिता निकुंभ,वंदना नाईकवाडे,संध्या दहे,कल्पना दंडवते,विनीता कदम,मीना भंडारी (सचिव) संगमनेर येथे आयोजित करण्यात आलेले कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी गेल्या होत्या.तिथेच त्यांना आवळयापासून तयार केलेले विविध पदार्थ पहावयास मिळाले.ते कसे करायचे याची पुस्तिकाही बघायला मिळाली. इतके त्यांच्यासाठी पुरेसे होते.कोपरगांवमधीलच संजीवनी बचत गट मार्गदर्शन केंद्राच्या संपर्कात त्या सर्वजणी होत्याच.फावल्या वेळात घरबसल्या लघुउद्योग सुरु करुन तुम्हीही प्रपंचाला हातभार लावू शकता हा श्रीमती स्नेहा कोल्हे यांचा सल्ला त्यांनी प्रत्यक्षात आणण्याचा निर्णय घेतला.

फक्त पंधराशे रुपये एवढेच त्यांचे सुरुवाताचे भांडवल होते.त्यातूनच त्यांनी आवळे आणले अन्य साहित्य जमा केले व आवळा सरबत,आवळा मुरांबा आणि आवळा कॅन्डी तयार केली.तयार झालेला माल त्यांनीच घरोघरी जाऊन विकला. मग एकातून दुसरी,दुस-यातून तिसरी अशा ऑर्डर मिळत गेल्या.

मागणी वाढली तसे भांडवल अपुरे पडू लागले.फक्त बचतीच्या रकमेवर गरज भागेना. त्यांना मग श्रीमती अनिता मुरकुटे यांनी मार्गदर्शन केले.जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे गटाने कर्ज प्रस्ताव दिला.तो मंजूर झाला.दहा हजार रुपये कर्ज मिळाले.त्याचा वापर करुन गटाने उत्पादन वाढविले.आज गटाच्या आवळा उत्पादनांची उलाढाल ३० हजार रुपयांपेक्षा अधिक आहे.

अलीकडेच कोपरगाव येथे जेष्ठ नेते शंकरराव कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त कृषी प्रदर्शन झाले.त्यात या गटाची उत्पादने होती.स्वत: श्री कोल्हे यांनी त्यांच्या स्टॉलला भेट दिली.उत्पादनांची,उत्पादन प्रक्रियेची माहिती घेतली व सर्व सदस्यांचे कौतूकही केले.श्रीमती कुलकर्णी यांच्या भगिनी अमेरिकेत असतात.त्यांच्या माध्यमातून तिथे काही प्रतिसाद मिळतो का ? यांचा प्रयत्न सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.फक्त आवळा कॅन्डीवरच अवलंबून न ाहता या महिलांनी आता गटाच्या माध्यमातून चांगल्या प्रतीच्या साडया,लहान मुलांचे कपडे मोठया प्रमाणावर आणून त्यांचीही विक्री सुरु केली आहे.त्यालाही चांगला प्रतिसाद मिळत आहे.



'महान्यूज'

Popular Keywords

अंजीर अंतरपिक अन्नधान्य अन्नसुरक्षा अभियान आंबा आदिवासी आधुनिक पोल्ट्री व्यवसाय आवळा इस्त्रो उपमुख्यमंत्री उस ऊस ऊसतोडणी ऍग्रो टुरिझम कर्जमाफी कांदा कात कापूस कारले कीडनियंत्रण कुक्कुटपालन कृषि उत्पन्न बाजारसमिति कृषि योजना कृषी दिन कृषी विद्यापीठ कृषीतंत्र कृषीमंत्री केळी कोकम कोळंबी खते खरबूज गहू जमिन जलसंधारन झरा ट्रक्टर ठिबक डाळिंब डाळींब महोत्सव - 2010 ढोबळी मिरची तलाव तुर तेल्या दुग्धव्यवसाय दॅट उपकरण द्राक्ष निर्यात निलक्रांती पाणी पाणी अडवा पाणी जिरवा पान पीक पुरंदर पृथ्वीराज चव्हाण प्रक्रिया उद्योग फलोत्पादन फळबाग फायटोप्थोरा बचत गट बटाटा बागाईतदार बाजारपेठ बाजारभाव बायोगॅस बियाणांची गुणवत्ता बी-बियाणे उपलब्धता बैल पोळा उत्साहात साजरा.Indian Farmer's Unique Festival. भाजीपाला. भात भेंडी मच्छिमार मजूर मत्स्य व्यवसाय मधशाळा मधुमक्षिका पालन मराठवाडा कृषी विद्यापीठ महा-रेन महाकृषी महाराष्ट्र महाराष्ट्रातील शेती कोण पिकवतो महिको महिला अणि कृषि क्षेत्र माती परीक्षण मिरची मोसंबी यशोगाथा रेशीम रेशीम उद्योग रोग-नियंत्रण. वनराई बंधारे वीज निर्मीती वृक्षायुर्वेद शिवामृत शेडनेट हाऊस शेतकरी शेततळे. शेती शेती व्यवसाय शेतीपूरक व्यवसाय शेतीशाळा शेतीसाठी हवामानाचा सल्ला समूह शेती साखर साखर कारखाना सिंचन प्रकल्प सीताफल सेंद्रिय शेती सोनेरी हळद सोयाबीन स्ट्रोबेरी स्वाभिमानी शेतकरी संघटना हरितक्रांती हळद “पिवळी क्रांती