Showing posts with label Onion. Show all posts
Showing posts with label Onion. Show all posts

Monday, October 31, 2011

कांदा बीज निर्मितीतून रोजगार व स्वावलंबन

ग्रामीण भागातही महिला सक्षमीकरणांतर्गत महिला बचतगटांची चळवळ खोलवर रुजण्यास मोठया प्रमाणात सुरुवात झाली याचचे उदाहरण नाशिक जिल्हयात रेणुका माता महिला बचतगटांने कांदा बीज निर्मिती प्रकल्प सुरु करुन पहिल्याच हंगामात भरघोस बीज निर्मिर्ती करुन चांगल्या प्रकारे लाभ मिळविला आहे.
उदयोग सुरु करुन तो यशस्वी करण्यासाठी नियोजन हे महत्वाचे असते. हा यशाचा मूलमंत्र लक्षात घेवून नाशिक जिल्हयातील नायकवाडी या आदिवासी भागातील महिलांनी बचतगटाच्या माध्यमातून कांदा बीजची शेती करायला घेतली. या हंगामातील पाहिले पीक बचत गटाच्या हाती आले असून त्याव्दारे साधारणत: दोन ते अडीच लाखाचा निव्वळ नफा अपेक्षित आहे. शासनाच्या बचतगटाच्या स्वर्णजयंती ग्राम स्वयंरोजगार योजनेच्या अंतर्गत २००६ मध्य १२ जानेवारी ला रेणुकामाता महिला स्वयंसहाय्यता बचत गटाची स्थापना झाली आहे. मिराबाई डगळे आणि सावित्रीबाई गुबांडे यांच्या मार्गदर्शनाखाली गटातील महिला दरमहा प्रत्येंक महिन्यात शंभर रुपयांची बचत करतात.

Sunday, September 18, 2011

कांद्याच्या निर्यातीबाबत मंगळवारी केंद्रीय मंत्रिगटाच्या बैठकीत निर्णय घेणार - केंद्रीय अर्थमंत्री















कांदा पिकाच्या निर्यातीबाबत मंगळवार, दिनांक २० सप्टेंबर रोजी होणाऱ्या केंद्रीय मंत्रिगटाच्या बैठकीत सर्वांशी चर्चा करून योग्य निर्णय घेतला जाईल, असे केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी सांगितले.

केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांच्यासमवेत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राज्यातील कांदा, साखर निर्यात आणि कापूस पिकाच्या दरवाढीमुळे सूत गिरण्यांवर झालेल्या परिणामावर चर्चा करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण बैठक शनिवारी मुंबईतील सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे झाली. या बैठकीत मुख्यमंत्री चव्हाण यांनी राज्यातील कांदा, ऊस आणि कापूस या नगदी पिकांमुळे उद्भवलेल्या परिस्थितीची केंद्रीय अर्थमंत्र्यांना माहिती दिली. या बैठकीस सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ, वन मंत्री डॉ. पंतगराव कदम, कृषी मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, सहकार व पणन मंत्री हर्षवर्धन पाटील, ग्रामविकास मंत्री जयंत पाटील, वस्त्रोद्योग मंत्री नसीम खान, मुख्य सचिव रत्नाकर गायकवाड, कृषी व पणन सचिव डॉ. सुधीरकुमार गोयल, वस्त्रोद्याग प्रधान सचिव सुनील पोरवाल, सहकार सचिव राजगोपाल देवरा व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Tuesday, September 13, 2011

कांद्याच्या निर्यातीवरील बंदी तातडीने उठवावी - छगन भुजबळ



नाशिक व परिसरात मोठ्या प्रमाणात कांदा उपलब्ध असून भाव पडल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवरील बंदी तातडीने उठवावी, देशातील शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी कळकळीची मागणी महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे.

नवी दिल्ली येथे विज्ञान भवनात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या बैठकीसाठी ते आले होते. या बैठकीनंतर त्यांनी पंतप्रधानाचे प्रधान सचिव टी.के.ए.नायर यांची भेट घेतली. यावेळी एक निवेदन त्यांना सादर करण्यात आले असून या प्रकरणात पंतप्रधानांनी तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी त्यांनी केली. नाशिक व परिसरात सध्या कांद्याचे भाव प्रचंड घसरले असून कांदा उत्पादक शेतकरी आंदोलनाच्या भूमिकेत असल्याची माहिती त्यांनी या बैठकीनंतर महाराष्ट्र सदनात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

Friday, July 22, 2011

गादीवाफा पद्धतीचा कांदा पिकाला फायदा


या वर्षी कांद्याला चांगला बाजारभाव मिळत असल्याने शेतकऱ्यांची नजर आता कांदा पिकाकडे वळतेय. मात्र हे पिक घेताना पारंपारिक पद्धती ऐवजी संशोधन केंद्रान शिफारस केलेल्या गादीवाफा पद्धतीने उत्पन्न घेतल्यास चांगल्या प्रतीच भरगोस कांदा उत्पादन घेता येत. याच शिफारशींचा वापर पुणे जिल्ह्यातील ओतूर भागातले अनेक शेतकरी करताना दिसत आहेत.
पिंपळवंडीच्या मंगेश वामन यांनी रब्बी कांद्याची लागवड गादी वाफा पद्धतीन सुरु केलीय. यात ठिबक सिंचनाचा वापरही त्यांनी प्रामुख्यान केलाय. यामुळं शेतमजुरी तर वाचणारच आहे. त्यासोबतच वीज भारनियमन असतानाही कांद्याला पाणी देता येणार आहे. कांद्याचं पिक या वर्षी फायदेशीर ठरताना दिसतंय. त्यामुळं मंगेश वामन यांच्या प्रमाणेच इतर शेतकरीही याच पद्धतीचा वापर करताहेत.
कांदा पिक गादी वाफ्यावर घेतल्यान रोगांचा आणि किडीचा प्रादुर्भाव कमी होतो आणि उत्पन्न चांगल्या प्रतीच मिळतं. जुन्नर तालुक्यातल्या ओतूर परिसरात मोठ्या प्रमाणावर कांदा पिक घेतलं जातं. राजगुरुनगर मधल्या कांदा, लसून अनुसंशाधन केंद्रानं शेतकऱ्यांना कांदा पिकाच्या लागवडीविषयी अद्ययावत असं तंत्रज्ञान उपलब्ध केलेलं आहे. याची माहिती शेतकऱ्यांनी देणं आवश्यक आहे. या केंद्रानेही गादी वाफ्यावरच्या लागवडीलाच शेतकऱ्यांनी प्राधान्य द्यावं असं म्हटलंय.
 गादी वाफ्यामुळं जमीन जास्त काळ भुसभुशीत राहते. जमीन तुडवली जात नाही. ही लागवड पद्धतही अगदी सोपी आहे. गादी वाफ्याची उंची ४५ सेंटीमीटर असावी आणि चर ३० सेंटीमीटर असावा. दोन गादीवाफ्या मधल अंतर १ मीटर असायला हवं. त्यावर ठिबक सिंचनाच्या दोन नळ्या अंथराव्या. ठिबक सिंचनाचा वापर केल्यानं पाण्याचा अपव्यय तर टळतोच सोबतच यातून खताची मात्राही देतायेते. यामुळं प्रत्येक रोपाला योग्य रितीन पाणी आणि खत देता येतं.

Wednesday, February 16, 2011

कशी रोखली गेली चिनी कांद्याची घुसखोरी!

विविध चिनी वस्तुंनी देशातील बाजारपेठा सजल्या असताना अलिकडेच त्यात ‘महाकाय’ कांद्याची देखील भर पडली असली तरी तो डोळ्यात अश्रु आणण्याइतपत तिखट नसल्याने त्याची भुरळ भारतीय खवय्यांना पडू शकली नसल्याचे पुढे आले आहे. देशी कांद्याच्या तुलनेत आकाराने जवळपास दुप्पट असणाऱ्या चिनी कांद्याचा ‘जायका’ भारतीयांना पसंत न पडल्याने अखेर राष्ट्रीय फलोत्पादन संशोधन व विकास प्रतिष्ठानने त्याचे स्थानिक पातळीवर उत्पादन करण्यासाठी हाती घेतलेली संशोधन प्रक्रिया गुंडाळली आहे.यानिमित्ताने किमान कांद्यापुरती का होईना, भारतीय भूमीत चीनची होणारी घुसखोरी रोखली गेल्याची चर्चा स्थानिक उत्पादकांमध्ये रंगली आहे.
जागतिक बाजारातील नेमक्या गरजा लक्षात घेऊन त्या दृष्टीने नियोजन करण्यात वाकब्गार असणाऱ्या चीनने दोन महिन्यांपूर्वी भारतात निर्माण झालेल्या टंचाईच्या पाश्र्वभूमीवर, आपल्या कांद्याचे मार्केटींग करण्याचा प्रयत्न केला होता. भारतीय कांद्याच्या तुलनेत आकाराने भलामोठा दिसणारा अन् रंगातही वेगळेपण अधोरेखीत करणाऱ्या चिनी कांद्याचे जेव्हा मुंबईच्या बाजारात आगमन झाले, तेव्हा भल्याभल्यांचे लक्ष वेधले गेले. कांदा उत्पादनात वेगवेगळे प्रयोग करणारी नाशिकस्थीत राष्ट्रीय फलोत्पादन संशोधन व विकास प्रतिष्ठान संस्थाही त्यास अपवाद राहिली नाही. उलट आकारमानामुळे जादा उत्पादनाची शाश्वती देणारा कांदा स्थानिक पातळीवर कसा उत्पादीत करता येईल, याचे संशोधन करण्याकडे संस्थेने लक्ष केंद्रीत केले होते. परंतु, वेगवेगळ्या कारणांमुळे प्राथमिक टप्प्यात हा विचार सोडून द्यावा लागल्याची माहिती प्रतिष्ठानचे संचालक आर. पी. गुप्ता यांनी ‘लोकसत्ता’ला दिली. या कांद्याचे उत्पादन स्थानिक पातळीवर शक्य असले तरी त्याचे बीज केवळ थंड प्रदेशातील हवामानात तयार होवू शकते. त्याकरिता दिवसातील १४ ते १५ तास सूर्यप्रकाशाची गरज भासते. यामुळे जम्मू काश्मीर सारख्या थंड प्रदेशात प्रथम बीज तयार करून ते महाराष्ट्रात लागवडीसाठी आणावे लागेल. ही बाब आर्थिकदृष्टय़ा किफायतशीर ठरणार नाही. शिवाय, फारसा स्वाद नसलेल्या चिनी कांद्यास पुरेसे ग्राहक नसल्याने इतका ‘द्राविडी प्राणायाम’ करून फारसे काही साध्य होणार नसल्याचा निष्कर्ष फलोत्पादन प्रतिष्ठानने काढला आहे.
स्थानिक बाजारात दाखल झालेल्या चिनी कांद्याविषयी बरीच चर्चा झाली असली तरी त्यास ग्राहकांचा प्रतिसाद मिळू शकला नाही. त्याची सौम्य चव हे त्यामागील प्रमुख कारण असल्याचे गुप्ता यांनी नमूद केले. भारतीय कांद्याप्रमाणे तो तिखट नसल्याने स्थानिक पातळीवर उत्पादन घेतले तरी ग्राहक लाभणे अवघड आहे. यामुळे प्रतिष्ठानने चिनी कांद्याच्या संशोधनास पूर्णविराम दिला आहे. दुसरीकडे पाकिस्तानी कांद्याचे नमुने तपासून ते त्रयस्थ देशातील बीजाचा वापर करत आहेत काय, याची छाननी सध्या प्रतिष्ठान करत आहे.

आभार-लोकसत्ता. 

Monday, December 20, 2010

हिवरेबाजारचा कांदाचाळ पॅटर्न



अहमदनगर जिल्ह्यातील हिवरेबाजार व तेथील सरपंच पोपटराव पवार यांचे जलसंधारणाचे व ग्रामविकासाचे कार्य राष्ट्रीय स्तरावर पोहोचले आहे. जलसंधारण व ग्रामविकासाबरोबरच सामुदायिक शक्तीचे बळ एकत्रित करुन हिवरेबाजारच्या गावकर्‍यांनी कृषी क्षेत्रातही आपली वेगळी छाप पाडली आहे. 

कांदा हे शेतकर्‍याचे बेभरवशाचे पीक आहे. कांद्याचे भाव चढले की, त्यावर्षी शेतकरी जिवाची मुंबई करतो आणि कांद्याचे भाव गडगडले की कर्जबाजारी होतो. पण भारतीय शेतकर्‍याचे कांदा पीक घेण्याचे आकर्षण काही कमी होत नाही. तो दरवर्षी दोन्ही हंगामात कांदा पीक घेण्यासाठी पुढे सरसावत असतो. हिवरेबाजारच्या पोपटराव पवारांनी शेतकर्‍यांची ही नाडी ओळखली आणि कांदा अभियान सुरु केले. 

शेतकर्‍यांनी कांदा पीक घेऊ नये असे न सांगता उत्पादित केलेला कांदा जास्त दिवस कसा टिकवता येईल याचा गुरुमंत्र शेतकर्‍यांना दिला. त्यांनी राष्ट्रीय फलोत्पादनातून पारंपरिक कांदा पिकविणार्‍या शेतकर्‍यांचा समूह तयार केला. कांदा पिकविणार्‍या १७ शेतकर्‍यांना एकत्रित करुन त्यांना कांदा चाळी उभारण्यासाठी प्रवृत्त केले.

सतरा शेतकर्‍यांपैकी बबन माधव ठाणगे याने ५० मेट्रिक टन क्षमता असलेली कांदा चाळ बांधण्याचा निर्णय घेतला. तर इतर १६ शेतकर्‍यांनी २५ मेट्रिक टन कांदा साठवण चाळी बांधण्याचे ठरविले आणि हिवरेबाजार परिसरात एका वेळी ४५० मेट्रिक टन कांदा साठवण करणार्‍या चाळी उभ्या राहिल्या. कांदा चाळ उभारणीसाठी १७ लाभार्थी शेतकर्‍यांना ४ लाख ५० हजार रुपयांचे अनुदान कृषी विभागाने दिले तर कृषी पणन मंडळानेही रुपये ५०० प्रती मेट्रिक टन प्रमाणे एकूण २ लाख २५ हजार रुपयांचे अनुदान दिले.

कांदा साठवणीची क्षमता निर्माण झाल्यामुळे काढणी पश्चात लागणार्‍या तंत्रज्ञानाचा वापर शेतकर्‍यांना करता आला. या कांदा चाळीचे डिझाईन राष्ट्रीय कांदा व लसूण संशोधन केंद्र, राजगुरुनगर पुणे यांनी तयार करुन दिले असल्यामुळे साठवणुकीची गुणवत्ता चाळीमध्ये तयार झाली आहे. या सुधारित डिझाईनला महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाकडून मान्यता मिळालेली आहे. 

नाशवंत कांदा उत्पादनास साठवणुकीची सोय उपलब्ध झाल्यामुळे ज्या बाजारपेठेत कांद्याला चांगला भाव आहे, तेथे कांदा विक्रीसाठी नेण्याची सोय झाली. तसेच कांद्याच्या भावात घसरण होते, तेव्हा कांदा विक्रीसाठी न काढता चांगला भाव येईपर्यंत साठवणूक करणे सोपे झाले. त्यामुळे हिवरेबाजारचा शेतकरी खर्‍या अर्थाने आपल्या मर्जीचा राजा झाला. पोपटराव पवारांनी घालून दिलेली शीस्त सर्वजण पाळत आहेत व त्यांच्या सल्लामसलतीने एकत्रित बसून निर्णय घेतला जात आहे.

कांदा साठवणुकीचा चांगला गुरुमंत्र पोपटराव पवारांनी आपल्या शेतकरी बांधवांना दिला. तसेच शासनाने आणि कृषी पणन मंडळाने आर्थिक सहकार्याचा सामुहिक चाळी बांधण्याच्या निर्णयास पाठिंबा दिला. त्यामुळे हिवरेबाजारच्या कांदा उत्पादक शेतकर्‍यांना साठवणुकीमुळे रुपये ८ ते १० प्रती किलो जादा दर प्राप्त झाला आणि कांद्याची दरवर्षी कडू - गोड होणारी कहाणी हिवरेबाजारपुरती समाप्त झाली आहे. आज चाळ बांधणारे सतरा शेतकरी कांदा पिक घेतल्यामुळे पस्तावले नाहीत, तर कांदा साठवून ठेवून योग्यवेळी बाजारपेठेत आणण्याचे तंत्र अवगत झाल्यामुळे सुखी आहेत. 


  • मेघश्याम महाले 

    'महान्यूज'मधील मजकूर 
  • Popular Keywords

    अंजीर अंतरपिक अन्नधान्य अन्नसुरक्षा अभियान आंबा आदिवासी आधुनिक पोल्ट्री व्यवसाय आवळा इस्त्रो उपमुख्यमंत्री उस ऊस ऊसतोडणी ऍग्रो टुरिझम कर्जमाफी कांदा कात कापूस कारले कीडनियंत्रण कुक्कुटपालन कृषि उत्पन्न बाजारसमिति कृषि योजना कृषी दिन कृषी विद्यापीठ कृषीतंत्र कृषीमंत्री केळी कोकम कोळंबी खते खरबूज गहू जमिन जलसंधारन झरा ट्रक्टर ठिबक डाळिंब डाळींब महोत्सव - 2010 ढोबळी मिरची तलाव तुर तेल्या दुग्धव्यवसाय दॅट उपकरण द्राक्ष निर्यात निलक्रांती पाणी पाणी अडवा पाणी जिरवा पान पीक पुरंदर पृथ्वीराज चव्हाण प्रक्रिया उद्योग फलोत्पादन फळबाग फायटोप्थोरा बचत गट बटाटा बागाईतदार बाजारपेठ बाजारभाव बायोगॅस बियाणांची गुणवत्ता बी-बियाणे उपलब्धता बैल पोळा उत्साहात साजरा.Indian Farmer's Unique Festival. भाजीपाला. भात भेंडी मच्छिमार मजूर मत्स्य व्यवसाय मधशाळा मधुमक्षिका पालन मराठवाडा कृषी विद्यापीठ महा-रेन महाकृषी महाराष्ट्र महाराष्ट्रातील शेती कोण पिकवतो महिको महिला अणि कृषि क्षेत्र माती परीक्षण मिरची मोसंबी यशोगाथा रेशीम रेशीम उद्योग रोग-नियंत्रण. वनराई बंधारे वीज निर्मीती वृक्षायुर्वेद शिवामृत शेडनेट हाऊस शेतकरी शेततळे. शेती शेती व्यवसाय शेतीपूरक व्यवसाय शेतीशाळा शेतीसाठी हवामानाचा सल्ला समूह शेती साखर साखर कारखाना सिंचन प्रकल्प सीताफल सेंद्रिय शेती सोनेरी हळद सोयाबीन स्ट्रोबेरी स्वाभिमानी शेतकरी संघटना हरितक्रांती हळद “पिवळी क्रांती