Showing posts with label हरितक्रांती. Show all posts
Showing posts with label हरितक्रांती. Show all posts

Monday, July 4, 2011

सिंचन व उत्पादकता वाढवून दुसरी हरित क्रांती होण्याची गरज - मुख्यमंत्री



वाढती लोकसंख्या आणि कमी होणारे शेतीक्षेत्र ही चिंतेची बाब असून त्यावर मात करण्यासाठी सिंचन क्षेत्र व उत्पादकता वाढवून दुसरी हरित क्रांती करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.

कृषी व पणन विभागाच्या वतीने महाराष्ट्र राज्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे आयोजित शेतकरी गौरव समारंभ कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री राजेश टोपे, माजी मंत्री गणपतराव देशमुख, गोविंदराव आदिक, रणजित देशमुख, बी.जे.खताळ, शंकरराव कोल्हे, नानाभाऊ एंबडवार, अनंतराव थोपटे, हर्षवर्धन देशमुख, आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती.

हरित क्रांतीचे प्रणेते, माजी मुख्यमंत्री स्व.वसंतराव नाईक यांचा जन्मदिवस आपण कृषी दिन म्हणून साजरा करतो, कृषी विभागाने कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या माजी मंत्री, कृषी विद्यापीठाचे कुलगुरु, संशोधक, कृषी क्षेत्रात विविध पुरस्कार मिळणारे शेतकरी आणि अधिकारी यांचा गौरव केल्याबद्दल कृषी विभागाचे अभिनंदन करुन मुख्यमंत्री म्हणाले, १९६० च्या दशकात विशिष्ट राज्य व विशिष्ट पिकांमध्ये हरित क्रांती झाली होती. सध्याच्या परिस्थितीत दिवसेंदिवस शेती क्षेत्र कमी-कमी होत आहे. त्यामानाने ओलिताचे क्षेत्र म्हणावे तसे वाढलेले नाही. पंजाब, हरियाणा राज्याच्या तुलनेत आपले सिंचनक्षेत्र अत्यंत कमी आहे. त्यासाठी कोरडवाहू क्षेत्र डोळ्यासमोर ठेवून संशोधन व पाण्याचे व्यवस्थापन करण्याची गरज आहे. नवीन बियाणे, जैवतंत्रज्ञानावर आधारित असावे. शेतीला पूरक व्यवसायाची जोड द्यावी जेणेकरुन शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल. नवनवे संशोधन व आधुनिक अवजारे शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचली पाहिजेत. यावर्षी कापूस व ऊसाचे उत्पादन वाढले आहे. त्यांच्या मालाला चांगले भाव मिळण्यासाठी निर्यातीची गरज आहे.

शेतीवर येणारे नैसर्गिक संकट, हवामानातील बदल, पावसाची अनियमितता याचा उहापोह करताना मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना बँकामार्फत यावर्षी २३ हजार कोटी रुपयांचा पतपुरवठा केला असल्याचे सांगितले. नवनवे तंत्रज्ञान आत्मसात करुन शेतकऱ्यांनी काम करण्याची आवश्यकता असून शेतकऱ्याच्या हितासाठी शासन कटीबद्ध आहे. शेतकरी हा देशाच्या विकासातील आर्थिक कणा असून त्यांना मदत करणे हे आपले कर्तव्य असल्याचे त्यांनी सांगितले.

ज्येष्ठ कृषीतज्ञ खा.डॉ.एम.एस.स्वामीनाथन आपल्या अध्यक्षीय भाषणात स्व.वसंतराव नाईक यांच्या कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख करुन म्हणाले, शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञानाची ओळख होण्यासाठी एका शेतकऱ्याकडून दुसऱ्या शेतकऱ्यापर्यंत ज्ञान पोहचविण्याची आवश्यकता आहे. कृषी क्षेत्रांसमोर आव्हान असले तरी आपल्या देशातील तरुणांची संख्या ५० टक्के आहे. ही जमेची बाजू म्हणावे लागेल. या वर्गाला कृषी क्षेत्राकडे विज्ञान व तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आकर्षित करुन घेण्याची गरज आहे. शेतीतील गुणवत्ता टिकविण्यासाठी त्यांना सेवा उपलब्ध करुन द्यावी आणि शेती क्षेत्रात महिला वर्गाचे वाढते प्रमाण पाहता त्यांना अधिक प्रोत्साहन द्यावे.

स्व.वसंतराव नाईक यांच्या स्मृतीला अभिवादन करुन अजित पवार म्हणाले, शेत मजुरांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. त्यावर उपाय म्हणून आधुनिक शेत अवजारे व पूरक व्यवसायाची जोड दिल्याशिवाय पर्याय नाही. ऊसाचे व कापसाचे उत्पादन वाढले आहे. उत्पादन वाढले व भाव कमी मिळाले तर शेतकऱ्यांचे नुकसान होते. त्यामुळे कृषी विद्यापीठांनी नवनवे संशोधन करुन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावे, कृषी विद्यापीठांना दरवर्षी निधी उपलब्ध करुन देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रास्ताविक भाषणात कृषीमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी शेतकरी गौरव समारंभामागील पार्श्वभूमी सांगताना सुवर्ण महोत्सवी वर्षात राजच्या कृषी विकासात योगदान देणाऱ्या शेतकरी संशोधन कृषी ‍विद्यापीठाचे कुलगुरु माजी मंत्री यांचा गौरव करणे हे आमचे कर्तव्य आहे. कृषीरत्न, कृषी भूषण, जिजामाता कृषीभूषण सेंद्रिय शेती, शेती निष्ठ, शेती मित्र व विज्ञान पंडित अशा १४२६ शेतकऱ्यांचा कृतज्ञतेच्या भावनेतून गौरव करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. या प्रदर्शनात शेतीचे आधुनिक अवजारे उपलब्ध होती.

उपस्थितांचे आभार कृषी राज्यमंत्री गुलाबराव देवकर यांनी आभार मानले. डॉ.स्वामीनाथन यांच्या इंग्रजी भाषणाचा मराठी अनुवाद कृषी विभागाचे प्रधान सचिव डॉ.सुधीरकुमार गोयल यांनी केला.

Sunday, February 27, 2011

माणिकगड पहाडावरील हरितक्रांती.




केंद्र शासन पुरस्कृत एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत सन २०१०-११ या वर्षासाठी राज्यात १६३ पाणलोट प्रकल्प मंजूर केले आहे. तर चंद्रपूर जिल्हयात तीन पाणलोट प्रकल्पांना हिरवी झेंडी मिळाली आहे. हे तीनही पाणलोट प्रकल्प आदिवासी बहुल जिवती तालुक्यात होत असून साडेबारा हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्याचा मानस आहे. त्यामुळे जिवती तालुका हरित क्रांतीच्या दिशेने वाटचाल करण्याची शक्यता बळावली आहे.

एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत राज्याच्या ग्राम विकास व जलसंधारण विभागाने ३७० पाणलोट प्रकल्पांना मान्यता प्रदान केली जाणार होती व दोन हजार तेवीस कोटी सोळा लक्ष रुपये खर्च करण्याचा प्राथमिक आराखडा तयार केला. मात्र त्यातील १६३ पाणलोट प्रकल्पांना मान्यता मिळाली असून त्यासाठी आठशे एकोण्णवद कोटी एकोणवीस लाख रुपये खर्च होणार आहे. 

चंद्रपूर जिल्हयातील जिवती तालुक्यात तीनही प्रकल्प मंजूर झाले आहेत. यात ५३ सूक्ष्म पाणलोटांची संख्या असून १२ हजार ४६६ हेक्टर क्षेत्रफळ समाविष्ट केले जाणार आहे. यासाठी १४ कोटी ९५ लाख ९० हजाराचा खर्च अपेक्षित आहे. शासनाने जिवती तालुक्यातील आंबेझरी, नंदप्पा, मरकोंदी, शेणगाव, बोईसापूर, सोदेकसा, पिट्टीगुडा-१, पिट्टीगुडा-२ या आठ आदिवासी ग्राम पंचायती अंतर्गत येणा-या ११ गावांना एका प्रकल्पाचा फायदा होणार आहे. यात ५ हजार १९ हेक्टर क्षेत्रफळ समाविष्ठ आहे. तर बाबापूर, शेडवाही, भारी, राहापल्ली बु. मराई पाटन, राहापल्ली खू. हिमायतनगर आणि टेकामांडवा या आठ ग्रामपंचायतीमधील ४ हजार १३६ हेक्टर शेती सिंचनाखाली येणार आहे. 

तिस-या प्रकल्पात ३ ग्रामपंचायती अंतर्गत येणारे ८ गावे समाविष्ठ असून त्यात चिखली, पाठण, खडकी, हिरापूर यासोबतच जनकापूर टाटाकोहाड, टिरवी, डोंगरगाव, गोविंदपूर या गावांचा समावेश आहे. या गावांसाठी ३ कोटी ९७ लाख ३४ हजार रुपये उपलब्ध केले असून ३ हजार ३११ हे क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. या तीनही प्रकल्पासाठी पाणलोट विकास कार्यक्रमांत १४ कोटी ९५ लक्ष ९० हजाराचा निधी शासनाने मंजूर केला आहे. या प्रकल्पामुळे डोंगराळ जिवती तालुका हिरवाकंच बनेल आणि त्यामुळे आदिवासी बांधवाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
'महान्यूज'

Popular Keywords

अंजीर अंतरपिक अन्नधान्य अन्नसुरक्षा अभियान आंबा आदिवासी आधुनिक पोल्ट्री व्यवसाय आवळा इस्त्रो उपमुख्यमंत्री उस ऊस ऊसतोडणी ऍग्रो टुरिझम कर्जमाफी कांदा कात कापूस कारले कीडनियंत्रण कुक्कुटपालन कृषि उत्पन्न बाजारसमिति कृषि योजना कृषी दिन कृषी विद्यापीठ कृषीतंत्र कृषीमंत्री केळी कोकम कोळंबी खते खरबूज गहू जमिन जलसंधारन झरा ट्रक्टर ठिबक डाळिंब डाळींब महोत्सव - 2010 ढोबळी मिरची तलाव तुर तेल्या दुग्धव्यवसाय दॅट उपकरण द्राक्ष निर्यात निलक्रांती पाणी पाणी अडवा पाणी जिरवा पान पीक पुरंदर पृथ्वीराज चव्हाण प्रक्रिया उद्योग फलोत्पादन फळबाग फायटोप्थोरा बचत गट बटाटा बागाईतदार बाजारपेठ बाजारभाव बायोगॅस बियाणांची गुणवत्ता बी-बियाणे उपलब्धता बैल पोळा उत्साहात साजरा.Indian Farmer's Unique Festival. भाजीपाला. भात भेंडी मच्छिमार मजूर मत्स्य व्यवसाय मधशाळा मधुमक्षिका पालन मराठवाडा कृषी विद्यापीठ महा-रेन महाकृषी महाराष्ट्र महाराष्ट्रातील शेती कोण पिकवतो महिको महिला अणि कृषि क्षेत्र माती परीक्षण मिरची मोसंबी यशोगाथा रेशीम रेशीम उद्योग रोग-नियंत्रण. वनराई बंधारे वीज निर्मीती वृक्षायुर्वेद शिवामृत शेडनेट हाऊस शेतकरी शेततळे. शेती शेती व्यवसाय शेतीपूरक व्यवसाय शेतीशाळा शेतीसाठी हवामानाचा सल्ला समूह शेती साखर साखर कारखाना सिंचन प्रकल्प सीताफल सेंद्रिय शेती सोनेरी हळद सोयाबीन स्ट्रोबेरी स्वाभिमानी शेतकरी संघटना हरितक्रांती हळद “पिवळी क्रांती