Saturday, January 29, 2011

हरितक्रांतीच्या स्वप्नपूर्तीसाठी दिग्रस बंधारा




महाराष्ट्राच्या वाटय़ाचे आंध्रप्रदेशात वाहून जाणारे गोदावरी नदीचे पाणी अडविणार्‍या परभणी जिल्ह्यातील दिग्रस उच्च पातळी बंधार्‍याचे जलपूजन नुकतेच झाले. पैठणच्या नाथसागर जलाशयापासून महाराष्ट्र राज्याच्या सीमेपर्यंत गोदावरी खोर्‍याच्या महाराष्ट्र राज्यासाठी उपलब्ध पाण्याचा पुरेपूर व गतीने उपयोग करुन घेण्यासाठी शंकररावजी चव्हाण विष्णुपुरी प्रकल्प भाग-२ म्हणून गोदावरी नदीवरील बंधार्‍याची शृंखला कार्यान्वित होत आहे. भूजल पातळीतील वाढीबरोबरच नदीपात्रातील पाणीसाठा हे या योजनांचे वैशिष्ट्य आहे.

दक्षिणेतील गंगा म्हणून गोदावरीला ओळखले जाते. पौराणिक आणि ऐतिहासिकदृष्टय़ा या नदीला महत्त्व असून जनसामान्यांमध्ये भक्तीची भावना दिसून येते. सामान्य माणसाचे जीवनमान उंचावून या नदीकाठी समृध्द अशी संस्कृती विकसित झालेली आहे. महाराष्ट्रात ही नदी त्र्यंबकेश्वरजवळ उगम पावून नाशिक, अहमदनगर तसेच मराठवाडय़ातील औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, नांदेड हे जिल्हे पावन करीत पुढे आंध्रप्रदेशात प्रवेश करते.

गोदावरी पाणी तंटा लवादाने महाराष्ट्राला मुख्य गोदावरी नदीवरील पैठण धरणाखाली, पूर्णा नदीवरील सिध्देश्वर धरणाखाली आणि मांजरा नदीवरील निजामसागर धरणाखाली व आंध्रप्रदेशच्या पोचमपाड धरणापर्यंतच्या भागात दिनांक ६ आक्टोबर, १९७५ नंतर बांधण्यात येणार्‍या नवीन प्रकल्पांना ६० टीएमसी (दशलक्ष घन मीटर) प्रती वर्ष पाणी वापरास मुभा दिली आहे. विष्णुपुरी प्रकल्पाच्या मूळ प्रशासकीय मान्यतेनुसार प्रकल्पाचा पाणीवापर ११.४० द.ल.घ.मी. इतका आहे.

शंकररावजी चव्हाण विष्णुपुरी प्रकल्पस्थळी उपलब्ध होणार्‍या येव्याच्या सखोल अभ्यासाअंती मूळ बंधारास्थळी ४.१० दलघमी पेक्षा अधिक पाणी उपलब्ध होऊ शकत नाही. त्यामुळे मंजूर ११.४० दलघमी पैकी ७.३० दलघमी एवढे पाणी वापराविना गोदावरी नदीतून महाराष्ट्राच्या सीमेच्यापुढे आंध्र प्रदेशातून वाहून जाते. सदर ७.३० टीएमसी पाणी वापराच्या मर्यादेत गोदावरी नदीवर १२ बॅरेजेस (बंधारे) घेण्यात आले. बाभळी बंधार्‍यावरील बाजूस ४०० कि.मी. अंतरामध्ये बांधण्यात येत असलेले सदर बारा बंधारे हे ६० दलघमी मंजूर पाणी वापराच्या मर्यादेतच आहेत.

गोदावरी नदीवरील बंधार्‍यांच्या शृंखलेतील दिग्रस बंधारा हा सर्वात मोठा बंधारा आहे. हा बंधारा परभणी जिल्ह्यातील पालम या तालुक्याच्या ठिकाणापासून उत्तरेस ११ कि.मी. अंतरावर आहे. पूर्णा तालुक्यातील महागाव, बानेगाव, कळगाव, धानोरा (काळे), मुंबर, गोलेगाव, देऊळगाव, देवठाणा, वझूर आणि खरबडा या गावांची १०६३ हेक्टर जमीन सिंचनाखाली येते. परभणी तालुक्यातील धसाडी, अंगलगाव, नागठाणा या गावांची ५७१ हेक्टर, पालम तालुक्यातील दिग्रस, फरकंडा, फळा, सोमेश्वर, आरखेड, उमरदरी, रावराजुरा या गावांची १३०८ हेक्टर आणि गंगाखेड तालुक्यातील सावंगी, मरुला, पिंप्री झोला व गंगाखेड या गावांची ६७६ हेक्टर जमीन सिंचनाखाली येते.

गोदावरी नदीकाठच्या दोन्ही तीरावरील अंदाजे १ किमी रुंदीच्या पट्टयातील सुमारे ३६१८ हेक्टर शेतीस उपसा सिंचन योजनेव्दारे सिंचनाचा लाभ होणार आहे. या बंधार्‍यामुळे नांदेड शहराच्या पिण्याच्या पाण्यासाठी ४० द.ल.घ.मी. पाणीसाठा उपलब्ध होईल.

कालवाविरहित प्रकल्प असल्याने देखभाल दुरुस्ती खर्च अत्यल्प असणार आहे. बंधार्‍याच्या वरील बाजूस गोदावरी नदीपात्रात सुमारे ४८ कि. मी. लांबीत ६३.८५ द.ल.घ.मी. पाणीसाठा निर्माण करण्याचे नियोजन आहे. या बंधार्‍यामुळे नदीकाठच्या २५ गावांना पिण्याचे पाणी उपलब्ध होणार आहे.

दिग्रस बंधार्‍याच्या प्रकल्पाची प्रशासकीय किंमत २ अब्ज १ कोटी २१ लक्ष इतकी आहे. बंधार्‍याचे १४ दरवाजे टाकून आक्टोबर २०१० मध्ये पाणीसाठा निर्मिती करण्यात आलेली आहे. या बंधार्‍यामुळे या भागातील बळीराजाचे हरितक्रांतीचे स्वप्न पूर्ण होण्यास निश्चितच मदत होणार आहे.




No comments:

Post a Comment

Popular Keywords

“पिवळी क्रांती अंजीर अंतरपिक अन्नधान्य अन्नसुरक्षा अभियान आदिवासी आधुनिक पोल्ट्री व्यवसाय आंबा आवळा इस्त्रो उपमुख्यमंत्री उस ऊस ऊसतोडणी ऍग्रो टुरिझम कर्जमाफी कात कांदा कापूस कारले कीडनियंत्रण कुक्कुटपालन कृषि उत्पन्न बाजारसमिति कृषि योजना कृषी दिन कृषी विद्यापीठ कृषीतंत्र कृषीमंत्री केळी कोकम कोळंबी खते खरबूज गहू जमिन जलसंधारन झरा ट्रक्टर ठिबक डाळिंब डाळींब महोत्सव - 2010 ढोबळी मिरची तलाव तुर तेल्या दुग्धव्यवसाय दॅट उपकरण द्राक्ष निर्यात निलक्रांती पाणी पाणी अडवा पाणी जिरवा पान पीक पुरंदर पृथ्वीराज चव्हाण प्रक्रिया उद्योग फलोत्पादन फळबाग फायटोप्थोरा बचत गट बटाटा बागाईतदार बाजारपेठ बाजारभाव बायोगॅस बियाणांची गुणवत्ता बी-बियाणे उपलब्धता बैल पोळा उत्साहात साजरा.Indian Farmer's Unique Festival. भाजीपाला. भात भेंडी मच्छिमार मजूर मत्स्य व्यवसाय मधशाळा मधुमक्षिका पालन मराठवाडा कृषी विद्यापीठ महा-रेन महाकृषी महाराष्ट्र महाराष्ट्रातील शेती कोण पिकवतो महिको महिला अणि कृषि क्षेत्र माती परीक्षण मिरची मोसंबी यशोगाथा रेशीम रेशीम उद्योग रोग-नियंत्रण. वनराई बंधारे वीज निर्मीती वृक्षायुर्वेद शिवामृत शेडनेट हाऊस शेतकरी शेततळे. शेती शेती व्यवसाय शेतीपूरक व्यवसाय शेतीशाळा शेतीसाठी हवामानाचा सल्ला समूह शेती साखर साखर कारखाना सिंचन प्रकल्प सीताफल सेंद्रिय शेती सोनेरी हळद सोयाबीन स्ट्रोबेरी स्वाभिमानी शेतकरी संघटना हरितक्रांती हळद