Sunday, January 29, 2012

केशरी यश


विस्तीर्ण भूभागावर पसरलेली आंब्यांची फळबाग...बाहेरच्या बाजूस छानसा बंगला... छोटंसं कार्यालय आणि कार्यालयात संगणक आणि लॅपटॉपवर दोन शेतकरी भावंडं आंब्यांच्या विपणनाबाबत माहिती पाहून आपसात चर्चा करत आहेत... पारंपरिक 'शेतकरी' या संकल्पनेला बाजूला सारून नव्या युगातील तंत्रज्ञानाला सोबत घेऊन यशाचे अनेक टप्पे सहजपणे पार करणाऱ्या हापूस आंब्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्याच्या पावस येथील 'देसाई बंधूं'च्या फळबागेतील हे दृष्य... तंत्रज्ञानामुळे होणारे अनुकूल परिवर्तन आणि प्रक्रिया उद्योगाचे महत्त्व अधोरेखित करणाऱ्या या बंधुंपैकी आनंद देसाई यांना नुकतेच उद्यानपंडीत पुरस्काराने सन्मानित केले आहे.
पावस हे गाव स्वामी स्वरुपानंदांच्या स्पर्शाने पावन झालेली भूमी म्हणून ओळखले जाते. याच गावात आंबा उत्पादन व्यवसायात देसाई कुटुंबाची ही चौथी पिढी काम करत आहे. कै.भाऊराव देसाई यांचे कराची येथे आंब्याचे दुकान होते. मात्र एका वेळेस बोटीने आंबे उशिरा पोहचल्याने व्यवसायात झालेल्या नुकसानामुळे व्यवसाय बंद करून ते नागपूरला आले. काही काळानंतर पुणे येथे त्यांनी आंब्याची वखार काढली. वखारीत आंबा मोठ्या प्रमाणात उरल्याने त्यावर पर्यायी मार्ग म्हणून केलेल्या आंबा प्रक्रियेचा प्रयोग यशस्वी झाल्यावर त्यांनी १९७६ मध्ये आंबा कॅनिंग फॅक्टरी काढली. आनंद यांचे वडील जयंत देसाई बीकॉम नंतर सीए होण्यासाठी मुंबईला जाणार होते. मात्र स्वामी स्वरुपानंद यांच्या इच्छेनुसार ते कोकणातच स्थायिक झाले आणि इथेच आंबा व्यवसाय बहरू लागला.

आंबा व्यवसायाची परंपरा वडिलोपार्जित असली तरी आनंद यांनी त्यात विशेष लक्ष घालून या व्यवसायाला आधुनिक तंत्रज्ञान आणि विपणनातल्या उत्तम नियोजनाची जोड दिली. वडिलांनी दूरदृष्टीने आनंद यांना महात्मा फुले कृषी विद्यापीठात बीएस्सी हॉर्टीकल्चर आणि लहान भाऊ अमर यांना बँकॉक येथे बीएस्सी फूड टेक्नॉलॉजी विषयाच्या शिक्षणासाठी पाठविले. शास्त्रोक्त पद्धतीचे शिक्षण घेतल्यानंतर आनंद यांनी सुधारित पद्धतीने फळबागेचे व्यवस्थापन करण्यासाठी आपल्या ज्ञानाचा उपयोग केला आणि त्यात ते यशस्वी झाले. 

त्यांनी आंबा कलमांची लागवड करून सुमारे १५० एकर क्षेत्रावर सिंचनाची सोय करून घेतली. हवामानातील बदलाप्रमाणे कीटकनाशके आणि बुरशी नाशकांची फवारणी केल्याने औषधांचा खर्च कमी झाला. माती परिक्षणानंतर सेंद्रीय खतांचा वापर केल्याने जमिनीचा पोत सुधारण्यासही मदत झाली. त्यामुळे चांगले उत्पादन मिळू लागले. आंब्यासाठी लाकडी पेट्यांचा वापर होत असल्याने आंबा खराब होण्याबरोबर खर्चही वाढत असे. त्याऐवजी आनंद यांनी क्रेटचा वापर सुरू केला. त्यांनी १५ ते १७ प्रकारच्या आंब्याच्या जाती बागेमध्ये लावल्या. त्यात सर्वाधिक मागणी असलेला पायरीसह सुवर्णरेखा, दूधपेरा, गोवामाणपूर आदी विविध जातींचा समावेश आहे. आंबा निर्यातीसाठी आवश्यक ग्लोबल गॅप सर्टिफिकेट मिळविल्याने 'देसाई बंधूंचा' आंबा जपानमध्ये जाऊ लागला.

भावाच्या मदतीने त्यांनी आपल्या फळबागेचा विस्तार तीनशे एकरपर्यंत वाढविला आहे. आंब्याचे मोठ्या प्रमाणावर होणारे उत्पादन लक्षात घेऊन त्यांनी देसाई प्रॉडक्टस् नावाची कॅनिंग फॅक्टरी सुरू केली. सुरुवातीला असलेली पाच टन माल बनविण्याची क्षमता आता १४ टनांपर्यंत पोहोचली आहे. या फॅक्टरीत उत्तम व्यवस्थापन केल्याने त्यांना आयएसओ ९००१ आणि आयएसओ - २२००० प्रमाणपत्रदेखील मिळाले. गुणवत्तेचे निकष पाळताना मँगो पल्प, अमृत कोकम, कैरी छुंदा, कैरी पन्हे, आंबा मावा आदी विविध उत्पादने तयार करून बाजारात ते लोकप्रिय करण्यात आनंद यांना यश आले आहे.

या फॅक्टरीतील मँगो पल्प अमेरिका, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर आदी देशात निर्यात होत आहे. उत्तम व्यवस्थापनाद्वारे फॅक्टरीचे कामकाज चालविताना फळबाग अधिक विकसित करण्याकडे त्यांनी सातत्याने लक्ष दिले आहे. कृषी आधारित उद्योगातून त्यांनी स्थानिक पातळीवर अनेकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. आपल्या अभ्यासू वृत्तीमुळे त्यांनी आंब्याच्या विविध पैलूंची माहिती एकत्र करण्यावर सातत्याने भर दिला आहे. २००२ मध्ये चीन, जपान, तैवान आणि हाँगकाँग आदी देशांना भेट देऊन त्यांनी व्यवसायाच्या विविध पैलूंचा अभ्यास केला. या सर्व ज्ञानाचा उपयोग करून देसाई प्रॉडक्टस् नावारुपाला आणण्याची कामगिरी प्रक्रिया उद्योग क्षेत्रात काम करणाऱ्यांना प्रेरक आणि मार्गदर्शक ठरली आहे.

देसाई यांच्या कार्याची दखल देशपातळीवर घेण्यात आली आहे. त्यांना लखनऊ येथील ऑल इंडिया मँगो शो आणि कोलकाता येथील मँगो महोत्सवात अनेक विभागात पारितोषिके मिळाली आहेत. डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या आबासाहेब कुबल पुरस्काराने त्यांचा गौरव करण्यात आला आहे. हापूस आंबा उत्पादनासाठी प्रक्रियेत आवश्यक बदलाबाबत त्यांनी अनेक शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले आहे. नव्या तंत्रज्ञानाचा वापर करताना बागायतदारांनी प्रक्रिया उद्योगाकडे वळल्यास व्यवसायात अधिक लाभ होईल, असे ते सांगतात. त्यांचे अनुभव आणि परिश्रम यामुळे त्यांच्या शब्दात असणारा विश्वास त्यांच्या बोलण्यातून जाणवतो.

'देसाई बंधू आंबेवाले' असा नावलौकीक मिळविणाऱ्या देसाई कुटुंबियांच्या या यशामागे वर्षानुवर्षाचे परिश्रम आणि अभ्यास आहे. प्रत्येक कामात सूक्ष्म नियोजन केल्यास त्याचे परिणाम उत्तमच येतात, हे सूत्र देसाई बंधूंच्या यशातून समोर येते. केवळ फळबागेचा विस्तार महत्त्वाचा नाही तर उत्पादन बाजारापर्यंत पोहचून त्याद्वारे हातात त्याचा मोबदला येईपर्यंत प्रत्येक टप्प्यात नियोजन महत्त्वाचे आहे हे त्यांनी आपल्या यशातून दाखवून दिले आहे. 

Popular Keywords

“पिवळी क्रांती अंजीर अंतरपिक अन्नधान्य अन्नसुरक्षा अभियान आदिवासी आधुनिक पोल्ट्री व्यवसाय आंबा आवळा इस्त्रो उपमुख्यमंत्री उस ऊस ऊसतोडणी ऍग्रो टुरिझम कर्जमाफी कात कांदा कापूस कारले कीडनियंत्रण कुक्कुटपालन कृषि उत्पन्न बाजारसमिति कृषि योजना कृषी दिन कृषी विद्यापीठ कृषीतंत्र कृषीमंत्री केळी कोकम कोळंबी खते खरबूज गहू जमिन जलसंधारन झरा ट्रक्टर ठिबक डाळिंब डाळींब महोत्सव - 2010 ढोबळी मिरची तलाव तुर तेल्या दुग्धव्यवसाय दॅट उपकरण द्राक्ष निर्यात निलक्रांती पाणी पाणी अडवा पाणी जिरवा पान पीक पुरंदर पृथ्वीराज चव्हाण प्रक्रिया उद्योग फलोत्पादन फळबाग फायटोप्थोरा बचत गट बटाटा बागाईतदार बाजारपेठ बाजारभाव बायोगॅस बियाणांची गुणवत्ता बी-बियाणे उपलब्धता बैल पोळा उत्साहात साजरा.Indian Farmer's Unique Festival. भाजीपाला. भात भेंडी मच्छिमार मजूर मत्स्य व्यवसाय मधशाळा मधुमक्षिका पालन मराठवाडा कृषी विद्यापीठ महा-रेन महाकृषी महाराष्ट्र महाराष्ट्रातील शेती कोण पिकवतो महिको महिला अणि कृषि क्षेत्र माती परीक्षण मिरची मोसंबी यशोगाथा रेशीम रेशीम उद्योग रोग-नियंत्रण. वनराई बंधारे वीज निर्मीती वृक्षायुर्वेद शिवामृत शेडनेट हाऊस शेतकरी शेततळे. शेती शेती व्यवसाय शेतीपूरक व्यवसाय शेतीशाळा शेतीसाठी हवामानाचा सल्ला समूह शेती साखर साखर कारखाना सिंचन प्रकल्प सीताफल सेंद्रिय शेती सोनेरी हळद सोयाबीन स्ट्रोबेरी स्वाभिमानी शेतकरी संघटना हरितक्रांती हळद