एकीचे बळ हे नेहमीच मोठे असते. या बळातून सर्वसामान्य माणसेसुध्दा सहजपणे एखादे मोठे काम करतात. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कट्टा, ता. मालवण येथील सात मित्रांनी एकत्र येत या एकीच्या बळावरच हिरवाई नर्सरी फुलविली आहे.
कट्टा येथील विकास म्हाडगुल, किशारे शिरोडकर, शरद बोरसकर, दीपक पावसकर, राघो गावडे, महेंद्र माणगावकर व नारायण बिडये हे बालमित्र. लहानपणापासून एकत्र खेळले, बागडले. महाविद्यालयीन शिक्षणही एकत्रित पूर्ण केले. एकदुसऱ्याच्या सुखदु:खात सहभागी झाले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर जो-तो पोटापाण्यासाठी नोकरीच्या शोधात वेगवेगळ्या ठिकाणी गेलं. सुदैवाने सर्वांनाच चांगली नोकरीही मिळाली. लौकिक अर्थाने प्रत्येकजण आपल्या संसारात रममाण झाला.